आजकाल, (विशेषतः लॉकडाऊनच्या काळात करण्यासारखं फारसं काही नसल्यामुळे) फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप किंवा इतरही समाजमाध्यमांद्वारे विविध विषयांवर चर्चा घडत असतात. काही विषय गंभीर, आणि विचार करायला प्रवृत्त करणारे असतात. क्वचित, कुणा राजकीय पुढाऱ्याचा किंवा एखाद्या वलयांकित परिवाराचा कुणीतरी उदोउदो करतो. मग त्या विचारांचे समर्थक आणि विरोधक शाब्दिक हाणामारी करत बसतात. काही चर्चांमध्ये तर, सरसकट एखाद्या विशिष्ट धर्म अथवा जातीविषयी टीकाटिप्पण्या आणि उलट-सुलट मते प्रदर्शित केली जातात.
प्रत्येक भाषा, ही इतर भाषांमधले शब्द कळत-नकळत स्वीकारत राहते आणि काळानुरूप बदलत जाते. तरीदेखील, एखाद्याने उच्चारलेला किंवा लिहिलेला शब्द जर आज आपल्या स्वतःच्या मते अशुद्ध असला तर आपल्याला खटकतो हेही खरेच. मग काही लोक, "हा शब्द असा नाहीये, असा-असा आहे" असे त्या व्यक्तीला समजावतील. काही लोक, "छ्या, एवढी साधी गोष्ट माहीत नाही?" असे विचारून हिणवतील. तर काही लोक नुसतेच नाक मुरडून तिसऱ्याच्या कानात कुजबुजतील, "अरे, वो इतना भी नहीं जानता!"
टेबल, शर्ट, पँट हे मराठीमध्ये सर्रास वापरात आलेले इंग्रजी शब्द आज आपल्याला खटकत नाहीत, कारण ते आता 'आपलेच' झालेले आहेत. त्याचप्रमाणे, 'गरज' आणि 'अक्कल' हे शब्द आपण फारसीमधून उचलले, याचा अर्थ असा नव्हे की आपण 'गरजवंत' होतो आणि आपल्याला 'अक्कल' नव्हती. हा केवळ बोली (आणि लेखी) भाषेच्या उत्क्रांतीचा भाग आहे. अनेक परकीय लोक आपल्या भूमीवर आले आणि आपल्या भाषेत हे शब्द रूढ करून गेले. अशा सर्व शब्दांना मराठीमध्ये प्रतिशब्द नाहीत असे नाही. शिवाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना मराठी पर्यायी शब्द नव्याने उपलब्धही करून दिले आहेत.
पण, रोजच्या व्यवहारात आपली मातृभाषा जेंव्हा आपण वापरतो, तेंव्हा 'शुद्ध भाषा म्हणजे नेमकी कोणती आणि अशुद्ध कशाला म्हणायचं' असा आपला गोंधळ उडतोच. 'एखाद्याची भाषा गावठी आहे म्हणून अशुद्ध आहे' असे जर तुम्ही म्हणाल तर, त्यो पावना पुलंच्या 'ती फुलराणी' मधला ड्वायलाग मारून तुमची विकेट काढायची शक्यता नाकारता येत नाही -- "जर 'नव्हतं' शुद्ध हाय, तर मंग 'व्हतं' अशुद्ध कसा?"
अशा भाषाविषयक चर्चांमध्ये, नकळतच, भाषेचा संबंध जात-धर्माशीही जोडला जातो. "अमुक जातीचा असूनही त्याची भाषा इतकी अशुद्ध कशी?", किंवा "तो मनुष्य मुस्लिम (किंवा ख्रिश्चन) असूनही किती छान मराठी बोलतो नाही?" असे प्रश्न अभावितपणेच, पण विचारले जातात खरे. भाषेचा संबंध भौगोलिक प्रांताशी आहे, जाती-धर्माशी नव्हे, हे आपण बरेचदा विसरतो.
या बाबतीत मला आलेले एक-दोन अनुभव डोळ्यात अंजन घालणारे आहेत.
एकदा पुण्यामध्ये कॅम्पातल्या 'फॅशन स्ट्रीट' नावाच्या गल्लीत सपत्नीक शॉपिंगला गेलो होतो. एकंदर शॉपिंगमध्ये माझे यथातथाच लक्ष होते. तेवढ्यात, त्या गाळाधारकाचे शब्द कानावर आले, "अहो ताई, तुम्ही अगदी निश्चिन्तपणे घेऊन जा. मी खात्री देतोय ना! कपड्याचा रंग गेला तर खुशाल परत या, मी बदलून देईन, किंवा तुम्ही पैसे परत घेऊन जा. मग तर झालं? मी इथेच असतो आणि गेली ३० वर्षे या व्यवसायात आहे."
अस्सल आणि शुद्ध 'पुणेरी' मराठी बोलणारा हा कोण 'सदाशिवपेठी' मनुष्य कॅम्पात गाळा टाकून व्यवसाय करतोय? असा विचार करत मी पुढे झालो. पाहतो तो काय? डोक्यावर गोल टोपी घातलेला, झब्बा-लुंगीवाला एक दाढीधारी मुस्लिम विक्रेता होता तो!
"अरेच्या, असं कसं काय बुवा?" असा टिपिकल संकुचित विचार माझ्याही मनात आला. पण, लगेच मी स्वतःच्या डोक्यात टप्पल मारून घेतली, आणि "यात आश्चर्य का वाटावं?'' असं मनाशी म्हटलं.
स्वतःला टप्पल मारून घेण्याकरता सबळ कारण होतं ते म्हणजे, काही वर्षांपूर्वी माझी झालेली फजिती!
मी आर्मी सर्व्हिसमध्ये असताना, एकदा माझे एक केरळी सहकारी, कर्नल जोसेफ यांच्यासोबत मी गप्पा मारत बसलो होतो. त्यांच्या धर्मानुसार चाललेला त्यांचा ४० दिवसांचा उपवासाचा काळ (Lent period) संपत आला होता. लवकरच, येशू ख्रिस्ताचा महानिर्वाण दिवस, म्हणजेच 'गुड फ्रायडे', आणि मग पाठोपाठ ईस्टर संडेची मेजवानी असणार होती. आम्ही बोलत असतानाच, त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला.
त्यांचे बोलणे संपल्यावर मी कर्नल जोसेफना अगदी सहजच म्हटले, "सर, तुम्ही तर अतिशय भाविक ख्रिश्चन आहात. मग तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'आकाश' कसे काय ठेवले?"
माझा प्रश्न नीटसा न कळल्याने कर्नल जोसेफ म्हणाले, "आकाश हे नाव आम्हाला चांगलं वाटलं म्हणून. पण असं का विचारतो आहेस?"
"काही नाही. आकाश हे हिंदू नाव आहे म्हणून जरा आश्चर्य वाटलं."
कर्नल जोसेफ अत्यंत मृदुभाषी होते. माझ्याकडे शांत आणि सुहास्य मुद्रेने पाहत ते म्हणाले, "आनंद, हाऊ इज आकाश ए हिंदू नेम? आकाश मीन्स द स्काय. स्काय इज द सेम फॉर यू अँड फॉर मी. डू यू थिंक वुई लिव्ह अंडर ए डिफरंट स्काय दॅन युवर्स ?"
त्यांच्या बोलण्यात हेटाळणी अजिबात नव्हती. त्यांनी अतिशय शांतपणे मला एक मूलभूत प्रश्न केला होता, आणि माझा भोटमपणा त्याच क्षणी माझ्या लक्षात आला होता. किती नकळतपणे मी भाषा आणि धर्माची गल्लत केली होती! त्यांचे बोलणे ऐकून मी इतका खजील झालो होतो की मी तो प्रसंग आजही विसरू शकत नाही.
म्हणूनच जेंव्हा-जेंव्हा एखाद्या भाषाविषयक चर्चेमध्ये, भाषेचा संबंध जात-धर्माशी जोडला जातो, किंवा एखादा Stereotyped, संकुचित विचार व्यक्त होतो, तेंव्हा-तेंव्हा, मी स्वतः तर लगेच सावध होतोच, पण इतरांनाही सावध करायला चुकत नाही.