शनिवार, ३० एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १६

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग १५ नंतर पुढे चालू...)

३० ऑक्टोबर १९४७ रोजी राजा हरिसिंगाने शेख अब्दुल्लांना राज्याचे 'मुख्य कार्यकारी प्रशासक' नेमले. पंतप्रधान मेहेरचंद महाजन व उपपंतप्रधान रामलाल बात्रा हे आपापल्या पदांवर विराजमान राहिले, परंतु, सर्व राज्यकारभार शेख अब्दुल्ला आणि त्यांनी स्वतः निवडलेले मंत्री व अधिकाऱ्यांच्या हाती गेला. विशेष म्हणजे, हे मंत्रिमंडळ विधानसभेसारख्या कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या सभेला उत्तरदायी नव्हते. थोडक्यात, राजा हरिसिंगाऐवजी, शेख अब्दुल्ला स्वतःच राज्याचे 'सर्वेसर्वा' झाले होते आणि मनमानी करायला मोकळे होते.
जम्मू-काश्मीरचे भारतामध्ये विलीनीकरण होण्यासाठी शेख अब्दुल्लांनी आपला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तसे करण्यामागे त्यांचे तीन मुख्य उद्देश होते. डोग्रा राजवटीचा अंत व्हावा आणि स्वतःच्या हातात जम्मू-काश्मीरची सत्ता यावी, हा त्यांचा मुख्य हेतू होता. पण, आपल्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांना भारत सरकारकडून दोन सुप्त अपेक्षा होत्या. त्यापैकी एक म्हणजे, विलीनीकरण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असावे आणि नंतरच्या काळातही त्याचे स्वरूप आपल्या इच्छेनुसार ठरवता यावे. दुसरी गोष्ट म्हणजे, जम्मू-काश्मीरचे भारतातील स्थान इतर राज्यांपेक्षा वेगळे आणि विशेष असावे. ही दोन्ही हुकमाची पाने स्वतःच्या अस्तनीत ठेवूनच शेख अब्दुल्ला नेहरूंसोबत चर्चा करीत होते. 

विलीनीकरण झाले तेंव्हा लॉर्ड माउंटबॅटनकडून हे स्पष्ट करण्यात आले होते की, जम्मू-काश्मीरच्या जनतेचा कौल मिळाल्यानंतरच विलीनीकरणाला पूर्णत्व येईल. हीच भूमिका पंडित नेहरूंनीही वेळोवेळी आपल्या पत्रांमधून आणि जाहीर भाषणांमधून मांडली होती. पण, जम्मू-काश्मीरमध्ये जनमतचाचणी घेण्याच्या बाबतीत, माउंटबॅटन व नेहरू, या दोघांचीही आपापली भूमिका वेगवेगळी होती. 

लॉर्ड माऊंटबॅटनचा विचार कदाचित असा होता की, बहुसंख्य जनतेची इच्छा जर पाकिस्तानसोबत जाण्याची असेल तर, जम्मू-काश्मीर पाकिस्तानातच विलीन व्हावे. त्यामुळे, दोन गोष्टी साध्य झाल्या असत्या. एक म्हणजे, 'आझाद काश्मीर' आणि गिलगिट प्रांत जम्मू-काश्मीरपासून तोडून पाकिस्तानच्या ताब्यात देण्यामागे जो ब्रिटिशांचा अदृश्य हात होता, तो अदृश्यच राहिला असता. दुसरे व त्याहून महत्त्वाचे म्हणजे, 'न्यायप्रिय' ब्रिटिशांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अबाधित राहिली असती.

जनमत घेण्याचे जाहीर केले गेल्याने नेहरू-पटेल विचलित झाले असल्यास नवल नव्हते. काही वर्षांपासूनच जम्मूमधील मुस्लिमबहुल भागांमध्ये आणि नंतर काश्मीर खोऱ्यामध्येही मुस्लिम लीगच्या विचारांचा प्रभाव पडू लागलेला होता. विशेषतः, जम्मू-काश्मीर राज्य पाकिस्तानमध्ये सामील करण्यासाठी, चौधरी गुलाम अब्बास व मिरवाईझ मुहम्मद युसूफ शाह यांच्या नेतृत्वाखालील 'मुस्लिम कॉन्फरन्स' उघडपणे प्रचार करू लागली होती. त्याचा फायदा घेऊनच 'आझाद काश्मीर' आंदोलन सुरु झाले होते, व त्यासाठीच काश्मिरी मुस्लिम सैनिकांना व पोलिसांना भडकवले गेले होते. 

या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये जनतेचा कौल घेतला गेल्यास तो भारताच्या बाजूने येण्याच्या बाबतीत सरदार पटेल स्वतःच साशंक होते. पण तो कौल भारताच्या बाजूने लागणे अत्यावश्यक होते. कारण त्यायोगेच, जम्मू-काश्मीरचे भारतात झालेले विलीनीकरण परिपूर्ण होणार होते. त्याशिवाय, एका मुस्लिमबहुल राज्यातील जनतेने स्वखुषीने भारतामध्ये राहण्यास प्राधान्य दिले तर, जिन्नांच्या द्विराष्ट्रवादाचा फोलपणा जगापुढे उघडा पडणार होता, आणि नेहरूंना ते हवेच होते. नेहरूंची काहीशी चुकीची, पण पक्की धारणा होती की संपूर्ण राज्यातील जनता शेख अब्दुल्लांच्या पाठीशी आहे. त्यामुळे, नेहरूंना असे वाटत होते की, शेख अब्दुल्लांना खूष ठेवले तर जम्मू-काश्मीरमधील जनतेचा कौल भारताच्या बाजूने मिळवता येईल.  नेहरूंच्या या गैरसमजामुळेच, शेख अब्दुल्ला हे भारत सरकारचे, आणि विशेषतः नेहरूंचे, 'अति लाडावलेले बाळ' होऊन बसले.       

प्रत्यक्षात, शेख अब्दुल्लांचा प्रभाव बऱ्याच अंशी काश्मीर खोऱ्यापुरताच मर्यादित होता. शेख अब्दुल्ला स्वतःदेखील हे जाणून होते. त्यांच्या विरोधात एक मोठा मतप्रवाह राज्यात तयार झालेला होता. त्या प्रवाहातले अनेक लोक स्वतंत्र काश्मीरचे समर्थक होते. भारतामध्ये विलीनीकरणाला पाठिंबा देणारे शेख अब्दुल्ला त्यांना दुटप्पी वाटत होते. तसेच, काही लोक पाकिस्तानसमर्थक होते आणि विलीनीकरणाच्या विरोधात त्यांचाही जोरदार प्रचार चालू होता. 

अशा सर्वच राजकीय शत्रूंपासून शेख अब्दुल्लांना धोका होता. सत्तेच्या वाटेतील हे काटे दूर करण्यासाठी त्यांना एकीकडे भारत सरकारच्या पाठबळाची नितांत निकड तर होती, पण भारताच्या हातातले बाहुले बनण्याची त्यांना अजिबात इच्छा नव्हती. दुसरीकडे, जनमतचाचणी घेतल्यास आपले पितळ उघडे पडेल ही भीतीही त्यांना होती. त्यामुळे, नोव्हेंबर १९४७ पासूनच अनेकदा त्यांनी स्वतःच जनमतचाचणीच्या विरोधात जाहीर वक्तव्य नोंदवले होते. फेब्रुवारी १९४८ मध्ये युनोमध्ये केलेल्या भाषणात तर त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये जनमतचाचणी घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण जम्मू-काश्मीरचे भारतामध्ये झालेले विलीनीकरण संपूर्ण आणि अपरिवर्तनीय आहे.  

राजा हरिसिंग, आणि त्याचे पंतप्रधान व उपपंतप्रधान, हे शेख अब्दुल्लांचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू होते. त्यामुळे, सत्ता हातात येताच, त्या तिघांच्याविरुद्ध जाहीर अपप्रचाराचे आणि भारत सरकारकडे त्यांच्या कागाळ्या करण्याचे सत्र शेख अब्दुल्लांनी सुरु केले. आपल्या इतर राजकीय शत्रूंना राज्यातून हद्दपार करण्याचा किंवा स्थानबद्ध करण्याचाही त्यांनी सपाटा लावला. त्यासोबतच, जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःचे राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी शेख अब्दुल्लांनी काही धडाकेबाज निर्णय घेऊन जनतेला खूष करण्याचा प्रयत्न केला. जहागीरदारांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या जमिनी राज्य सरकारच्या ताब्यात घेणे, त्या जमिनींवर सामूहिक शेतीचा उपक्रम राबवणे, अशी काही साम्यवादी विचारसरणीची पाऊले त्यांनी उचलली. 

लोकप्रियता मिळवण्यासाठी शेख अब्दुल्लांनी घेतलेल्या या  निर्णयांमुळे, त्यांच्याविरोधात आणखी एक मतप्रवाह  तयार झाला. ब्रिटन, अमेरिका आणि भारताच्याही गुप्तहेर यंत्रणांनी, आपापल्या सरकारला स्वतंत्रपणे सादर केलेल्या अहवालांमध्ये असा निष्कर्ष नोंदवला की, शेख अब्दुल्लांचे साम्यवादी रशियासोबत घनिष्ट संबंध असावेत. परिणामतः, ब्रिटनप्रमाणेच साम्यवादाच्या विरोधात असलेला अमेरिकादेखील आता जम्मू-काश्मीरमध्ये लक्ष घालू लागला. त्याउलट, सोविएत रशियाने जगभर असा प्रचार चालवला की गिलगिटमार्गे रशियावर आक्रमण करण्याचा डाव, अमेरिका व ब्रिटन रचत आहेत, व त्यासाठी ते पाकिस्तानचा वापर करणार आहेत. याच सुमाराला जम्मू-काश्मीरमधील भारत-पाक युद्धाचा प्रश्न भारताने युनोमध्ये नेला होता. मुख्यत्वे अमेरिकेच्या प्रभावाखालीच काम करत असलेल्या युनोच्या माध्यमातून, जम्मू-काश्मीरमध्ये दखल देण्यासाठी अमेरिकेला आयते कारणच मिळाले. अशा प्रकारे, काश्मीर प्रश्न आपोआपच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला. 

काश्मीर प्रश्न युनोमध्ये गेल्याने जगाचे मत भारताच्या बाजूने अनुकूल होईल ही भारत सरकारची वेडी आशा होती. उलटपक्षी, तो प्रश्न भारतासाठी अधिकच बिकट होऊन बसला. पाकिस्तानला जे हवे होते तेही घडले नाही, आणि काश्मिरी जनतेची अवस्था मात्र, 'ना घर का, ना घाट का' अशी होऊन बसली. 

अनेक अधिकारी व सैनिकांची प्राणाहुती देऊन, भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये निकराने लढत होते. पण त्या सबंध काळात, भारत व पाकिस्तान या दोन्ही सैन्यदलांचे सेनाध्यक्ष, सरसेनापती आणि त्यांचे कर्ते-करविते ब्रिटिशच असल्याने, या युद्धामध्ये, अंतस्थपणे, ब्रिटिशांनी काही कुटिल खेळी खेळल्या होत्या असे मानायला वाव आहे. सपशेलपणे पाकिस्तानची बाजू न घेता, भारताला मात्र निर्विवाद विजयापासून रोखण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या वाद-प्रवादामध्ये आज न पडता,  इतके निश्चितच म्हणता येईल, की काश्मीरमध्ये भारतीय रक्त सांडूनदेखील, काश्मीरचे अश्रू वाहणे काही थांबले नाही. 

१९४७ ते १९५३ या पाच-साडेपाच वर्षांत, भारतात आणि काश्मीरमध्ये अतिशय महत्वाच्या घडामोडी झाल्या. 

मार्च १९४८ मध्ये काश्मीरचे पंतप्रधान मेहेरचंद महाजन यांचे उच्चाटन होऊन, शेख अब्दुल्लांच्या हातात काश्मीरची अमर्याद सत्ता आली. १ जानेवारी १९४९ पासून काश्मीरमध्ये युनोने युद्धबंदी जाहीर केली. त्याआधी, १३ ऑगस्ट १९४८ रोजी, काश्मीरसंबंधात एक महत्वाचा ठराव युनोमध्ये पारित करण्यात आला होता. त्या ठरावातील तीन महत्वाचे मुद्दे असे होते : -

१. काश्मीरमध्ये युद्धबंदी होताच, सर्वप्रथम, पाकिस्तानने आपले संपूर्ण सैन्य पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधून काढून घ्यावे.
२. पाकिस्तानी सैन्य जम्मू-काश्मीरमधून संपूर्णपणे काढले गेल्यानंतर, भारतानेही आपले बहुतांश सैन्य क्रमाक्रमाने काढून घ्यावे, व शांतिप्रक्रियेसाठी आवश्यक असलेले थोडे सैन्य युनोच्या देखरेखीखाली जम्मू-काश्मीरमध्ये ठेवावे.
३. जम्मू-काश्मीरमध्ये शान्ति प्रस्थापित झाल्यानंतर, भारत व पाकिस्तान यांनी परस्पर सहमतीने जम्मू-काश्मीरमध्ये जनमतचाचणी घडवून आणावी आणि जनतेचा जो कौल असेल त्याप्रमाणे जम्मू-काश्मीरचे भवितव्य ठरवावे.

१९५० साली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. घटनेच्या पहिल्या अनुच्छेदानुसार जम्मू-काश्मीर हे भारताचे एक अविभाज्य घटक-राज्य मानले गेले. परंतु, अनुच्छेद ३७० अन्वये, काश्मीरसाठी अस्थायी स्वरूपाच्या काही विशेष तरतुदी केल्या गेल्या. यातील महत्वाची तरतूद अशी होती की संरक्षण, परराष्ट्रव्यवहार, आणि दळणवळण हे तीन विषय वगळता, भारतीय संसदेने पारित केलेला कोणताही अधिनियम, काश्मीर राज्य सरकारची सहमती असल्याशिवाय, काश्मीरमध्ये  लागू होणार नाही. श्री. नरसिंह गोपालस्वामी अय्यंगार यांनी शेख अब्दुल्लांसोबत चर्चा करून, अनुच्छेद ३७० चा मसुदा तयार केला होता. 
[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या अनुच्छेदाला विरोध होता असे म्हटले जाते. परंतु, या मुद्द्यावर इतिहासकारांमध्ये दुमत आहे.]

भारतामध्ये विलीन झालेल्या इतर राज्यांनी आपापल्या राज्याची स्वतंत्र राज्यघटना न करता, भारतीय राज्यघटनाच प्रमाण मानली. परंतु, काश्मीर राज्याने मात्र, अनुच्छेद ३७० च्या आधारे, आपल्या राज्यासाठी एक निराळी राज्यघटना १९५६ साली अमलात आणली. काश्मीरमध्ये भारताच्या ध्वजासोबतच काश्मीरचा ध्वज फडकावण्याची मुभा होती. भारतीय दंडविधान १८६० (IPC) ऐवजी, काश्मीरमध्ये, रणबीर दंडविधान १९३२ (RPC) लागू होते.
[अल्पसंख्याक आयोग, शिक्षणाचा अधिकार, माहिती अधिकार, भूमी अधिग्रहण, इत्यादि विषयांसंबंधीचे केंद्रीय अधिनियम काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० च्या तरतुदींमुळे लागू होऊच शकले नव्हते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी, अनुच्छेद ३७० रद्दबातल झाल्यानंतर हे कायदे जम्मू-काश्मीरमध्येही लागू करण्यात आले आहेत.]

१९५४ साली,  अनुच्छेद ३७० च्याच आधारे भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करून, '३५अ' हा अनुच्छेद भारतीय राज्यघटनेमध्ये  सामील करण्यात आला. या अनुच्छेदानुसार, कोणतीही व्यक्ती 'जम्मू-काश्मीरचा नागरिक' आहे अथवा नाही याची व्याख्या करण्याचा अधिकार जम्मू-काश्मीर विधानसभेला दिला गेला. त्या व्याख्येचा वापर करूनच राज्य सरकारने, 'जम्मू-काश्मीरच्या नागरिकां'साठी विशेषाधिकार बनवले. त्यानुसार 'जम्मू-काश्मीरचा नागरिक' नसलेल्या कोणत्याही भारतीयाला तेथे जमीन खरेदी करण्याचा अधिकार नव्हता.
[भारतीय राज्यघटनेमधील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यामुळे अनुच्छेद ३५अ देखील आपोआप संपुष्टात आला.] 

सुरुवातीला जम्मू-काश्मीर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हटले जात असे. १९५१ साली, राजाऐवजी, राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल नेमले गेले आणि त्यांना 'सद्र-ए-रियासत' असे नाव होते. १९६०च्या दशकामध्ये भारत सरकारने ही प्रथा बंद केल्यानंतर इतर राज्यांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही मुख्यमंत्री व राज्यपाल ही पदे अस्तित्वात आली.  

हळूहळू, पंडित नेहरूंना, काश्मीरमधले त्यांचे 'अति लाडावलेले बाळ' खूपच डोईजड होऊ लागले. ९ ऑगस्ट १९५३ रोजी शेख अब्दुल्लांचे सरकार नेहरूंनी तडकाफडकी बरखास्त केले, आणि अब्दुल्लांचेच वरिष्ठ सहकारी, बक्षी गुलाम मुहम्मद यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. 

मुघल काळापासून, ते ब्रिटिश साम्राज्य अस्ताला जाईपर्यंत, जम्मू-काश्मीरचा कारभार दिल्लीतूनच चालत आलेला होता, आणि काश्मीरचे अश्रू वाहण्याचे ते एक मुख्य व ऐतिहासिक कारण होते. म्हणूनच, जम्मू-काश्मीरवर दिल्लीकरांच्या अधिपत्याची ही पहिली वेळही नव्हती आणि दुर्दैवाने, ही शेवटची वेळही ठरली नाही.  पुढील सात दशकांमध्ये अनेक वेळा याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत राहिली.    

(क्रमशः)
(भाग १७ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

काश्मीरचे_अश्रू : भाग १५

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग १४ नंतर पुढे चालू...)

भारतीय सशस्त्र सेनादलांचे सर्वोच्च नेते, गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी काश्मीरमध्ये सेना पाठवण्याचे आदेश २६ ऑक्टोबर रोजी जारी केले. काश्मीरमधील परिस्थिती अशी होती की, काही तासांच्या आतच सेनेच्या जमतील तितक्या तुकड्या श्रीनगरला पाठवाव्या लागणार होत्या. 

त्यावेळी, दिल्लीच्या जवळ गुडगांव येथे १६१ इन्फंट्री ब्रिगेडचे मुख्यालय होते. परंतु, त्या ब्रिगेडच्या अनेक तुकड्या दिल्लीच्या आसपास आणि पूर्व पंजाबच्या काही भागांमध्ये शरणार्थी शिबिरांचे नियोजन आणि दंगलग्रस्त भागांमध्ये गस्त घालण्याचे काम करीत होत्या. लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांच्या अधिपत्याखाली शीख रेजिमेंटची पहिली बटालियन मात्र गुडगांवमध्येच तैनात होती. सर्वप्रथम तीच बटालियन श्रीनगरला पाठवण्याचे नक्की झाले. 

'१ शीख' बटालियनला जेंव्हा युद्धासाठी तयार होण्याचे आदेश मिळाले, तेंव्हा पाकिस्तानी टोळीवाले श्रीनगरपासून जेमतेम १०० किलोमीटरवर होते आणि पक्क्या रस्त्यावरून बसगाड्यांमध्ये प्रवास करीत होते. त्याउलट, दिल्ली ते श्रीनगरपर्यंत ८०० किलोमीटर रस्त्याचा अर्धाअधिक भाग कच्चा आणि डोंगराळ भागातून जाणारा होता. अर्थातच, सर्व हत्यारे आणि युद्धसामग्री ट्रक्समध्ये भरून श्रीनगरला जाण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. विमानानेच जाणे क्रमप्राप्त होते. श्रीनगरची धावपट्टी कच्ची, आणि लांबीला खूप कमी होती. आणि भारतीय सेना विमानाने श्रीनगरला पोहोचण्यापूर्वी जर ती धावपट्टीही शत्रूच्या ताब्यात गेली असती तर सर्व काही संपल्यातच जमा होते. 

स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताच्या वायुदलाकडे स्वतःची विमाने होतीच. पण त्याशिवाय, बऱ्याच खाजगी विमान कंपन्यांकडे दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली डाकोटा विमाने होती. भारत-पाकिस्तान दरम्यान स्थलांतरित होणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याचे काम ही विमाने त्या काळी करीत होती. अशी सुमारे १०० विमाने ताब्यात घेऊन, भारत सरकारने  वायुदलाला उपलब्ध करून दिली, तरीदेखील विमाने कमीच पडत होती. २७ ऑक्टोबरच्या सकाळी, लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांच्याबरोबर '१ शीख' बटालियनची पहिली तुकडी श्रीनगर विमानतळावर उतरताच,  त्यांनी तातडीने विमानतळाच्या चारी बाजूंनी नाकेबंदी उभारली.

२७ ऑक्टोबरनंतरचे काही दिवस, श्रीनगर विमानतळावरून एक विमान परत दिल्लीकडे उड्डाण करते न करते तोच, त्यापाठचे विमान उतरत होते. संपूर्ण धावपट्टीवरील आकाशात दिवसभर नुसते धुळीचे लोट उठत असत. तशा प्रतिकूल परिस्थितीतही, वायुदलाच्याच नव्हे तर सर्व खाजगी कंपन्यांच्या सिव्हिलियन वैमानिकांनीही जीवावर उदार होऊन, आणि एकही अपघात न होऊ देता, ही कामगिरी पार पाडली! (ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईकांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री, श्री. बिजू पटनाईक, हे या वैमानिकांपैकी एक होते!)

२७ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत संपूर्ण '१ शीख' बटालियन श्रीनगर विमानतळावर पोहोचली होती. या बटालियनवर केवळ विमानतळाच्या सुरक्षेची कामगिरी सोपवली गेली होती. लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांनी जम्मू-काश्मीर सैन्याची काही वाहने वापरासाठी मिळवली. तसेच, त्यांना ही खबरदेखील मिळाली की हल्लेखोर अजूनही बारामुल्लापर्यंत पोचले नव्हते. 

कर्नल राय यांच्या लगेच लक्षात आले की, त्यांनी जर शत्रूला बारामुल्लापर्यंतच रोखून धरले, तर पाठोपाठ दिल्लीहून येणाऱ्या इतर बटालियन्सना मोठाच फायदा होणार होता. परंतु, सेना मुख्यालयातून तसे आदेश मिळवणे कठीण होते, कारण, दिल्लीशी संपर्क साधण्यासाठी टेलीफोन किंवा रेडिओ यंत्रणाही त्यावेळी त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत, एका सेनाधिकाऱ्याने जे करायला हवे तेच लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांनी केले. विमानतळाच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेवढीच तुकडी त्यांनी मागे ठेवली, आणि उरलेल्या सर्व जवानांना सोबत घेऊन ते श्रीनगरहून बारामुल्लाच्या दिशेने निघाले.

बारामुल्लाच्या २ किलोमीटर अलीकडे असलेल्या टेकड्यांवर त्यांनी जवानांच्या तुकड्या अशा प्रकारे तैनात केल्या की, बारामुल्ला-श्रीनगर रस्ता त्यांच्या दृष्टीच्या व बंदुकीच्या टप्प्यात राहील. स्वतः कर्नल राय जीपमध्ये एक छोटी तुकडी घेऊन बारामुल्ला गावाकडे निघाले. परंतु, तोपर्यंत शत्रू बारामुल्लापर्यंत पोहोचलेला होता आणि टोळीवाले बारामुल्ला लुटण्यामध्ये दंग होते.

कर्नल राय बारामुल्लाच्या जवळ पोहोचतात न पोहोचतात तोच, त्यांच्या जीपवर शत्रूची मिडीयम मशीनगन आग ओकू लागली. काही शीख सैनिक जखमी झाले आणि जीपही निकामी झाली. आपल्या जखमी जवानांना घेऊन शेतांमधून वाट काढत, टेकडीच्या दिशेने परतणाऱ्या कर्नल राय यांच्या चेहऱ्यावर मिडीयम मशीनगनच्या फैरी लागल्या आणि ते तेथेच धारातीर्थी पडले. १९४७-४८ साली काश्मीरच्या रक्षणासाठी लढल्या गेलेल्या त्या युद्धात भारताने पहिली आहुती दिली होती. 

काश्मीर खोऱ्यात शिरलेले टोळीवाले, जम्मू भागात आक्रमण करणारे 'आझाद काश्मीर'चे सैनिक आणि या सर्वांच्या पाठीशी छुप्या रीतीने घुसलेले पाकिस्तानी सैन्य, या सर्वांसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्य युद्धात उतरले. २७ ऑक्टोबरनंतरचे पाच दिवस, श्रीनगर विमानतळावर एकामागून एक विमानांच्या फेऱ्या अव्याहत चालू होत्या. पायदळाच्या बटालियन्स, त्यांची हत्यारे आणि इतर सामग्री काश्मीरमध्ये पोचत राहिली. 

बारामुल्ला आघाडी सांभाळण्यासाठी '१ शीख'बरोबर आणखी दोन बटालियन्स, आणि त्या तिन्ही बटालियन्सचे मुख्यालय, म्हणजेच १६१ इन्फन्ट्री ब्रिगेड तैनात केले गेले. ब्रिगेडियर लायोनेल प्रोतिप सेन, उर्फ 'बोगी' सेन यांनी पुढील वर्षभर त्या मुख्यालयाची धुरा सांभाळली. हळूहळू युद्धाची व्याप्ती वाढत गेली, आणि भारतीय सैन्यातील अनेक धुरंधर सेनानींनी युद्धात आपले योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य काश्मीरसाठी प्राणपणाने लढले. फील्ड मार्शल करिअप्पा, जनरल थिमय्या, जनरल श्रीनागेश, जनरल गोपाळ गणेश बेवूर, यांसारखे सेनाधिकारी काश्मीरमध्ये शौर्य गाजवल्यानंतर, पुढे भारताचे सेनाध्यक्षही बनले.  

भारतीय सैन्य हवाईमार्गे श्रीनगरमध्ये उतरल्याची बातमी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिन्नांना समजताच, काश्मीरवर उघडपणे आक्रमण करण्याचे आदेश त्यांनी पाकिस्तानचे सेनाध्यक्ष, जनरल फ्रॅंक मेसर्व्ही यांना दिले. मात्र, जनरल मेसर्व्हीनी जिन्नांना सांगितले की भारत-पाक सैन्याचे सरसेनापती फील्ड मार्शल ऑकिनलेक यांची परवानगी असल्याशिवाय त्यांना तसे करता येणार नाही. फील्ड मार्शल ऑकिनलेकनी जिन्नांना स्पष्टपणे सांगितले की, काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनलेला असल्याने, पाकिस्तानी सैन्य तेथे पाठवायचे झाले, तर पाकिस्तानी सैन्यातील सर्व ब्रिटिश अधिकारी तातडीने काढून घेण्यात येतील. त्या काळात, पाकिस्तानचे बहुसंख्य सेनाधिकारी ब्रिटिश होते. तेच निघून गेले असते तर पाकिस्तानी सैन्य लुळे पडणार होते. आपला आदेश मागे घेऊन, हात चोळत बसण्यापलीकडे अन्य पर्याय जिन्नांच्या हाती उरला नाही. 

वरिष्ठांकडून कोणतेही आदेश नसताना, बारामुल्लाच्या रक्षणासाठी, लेफ्टनंट कर्नल राय यांनी केलेली कारवाई, आणि त्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही. भारतीय सैन्य युद्धात उतरलेले पाहताच हल्लेखोरांचे मनोधैर्य खचले. त्यानंतर, ते बारामुल्लाच्या पुढे येऊ शकले नाहीत, आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर काबीज करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही. 

हुतात्मा लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय हे स्वतंत्र भारताचे पहिले महावीरचक्रविजेते ठरले. यापुढील काळातही परमवीरचक्रविजेते मेजर सोमनाथ शर्मा, महावीरचक्रविजेते ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान, यांसारख्या अनेक अधिकारी व जवानांनी काश्मीरसाठी हौतात्म्य पत्करले. जिवंतपणी परमवीरचक्राने सन्मानित केले गेलेले महाराष्ट्राचे सुपुत्र, मेजर रामराव राघोबा राणे यांचे असामान्य साहस तर अविस्मरणीय होते. 
[वरील संपूर्ण माहितीचा मुख्य संदर्भस्रोत  : "Slender  was  the  Thread" - लेखक : लेफ्टनंट जनरल लायोनेल प्रोतीप ("बोगी") सेन ]

जम्मू-काश्मीरच्या रक्षणासाठी २७ ऑक्टोबर १९४७ ला सुरु झालेले घमासान युद्ध, पुढे १ जानेवारी १९४९ पर्यंत लढले गेले. 

दुसरीकडे, राजधानी श्रीनगरमध्ये, नवी राजकीय समीकरणे आकार घेऊ लागली होती. 


(क्रमशः)
(भाग १५ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १४

 #काश्मीरचे_अश्रू 

(भाग १३ नंतर पुढे चालू...)

२२ ऑक्टोबर १९४७ ला काश्मीर खोऱ्यामध्ये अचानक सुरु झालेल्या टोळीवाल्यांच्या आक्रमणाने राजा हरिसिंगासोबतच भारत सरकारलादेखील हादरवून सोडले. परंतु, हे संकट खरोखरच अचानक ओढवले होते का? काश्मीरमध्ये किंवा भारतामध्येही कोणालाच याची काहीही पूर्वकल्पना नव्हती, असे म्हणता येईल का? 

काश्मीरचे अश्रू वारंवार वाहत राहण्याचे कारण हेच आहे की, सामान्य काश्मीरी मनुष्य अंधारात असताना, इतर अनेक लोकांना मात्र, काश्मीरवर वेळोवेळी कोसळणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना होती. इतकेच नव्हे तर, त्यातील काही जणांचा त्यामध्ये सक्रिय सहभागदेखील होता, आणि त्यांना सामान्य काश्मिरी जनतेबद्दल काहीही सोयर-सुतक नव्हते. १९४७ साली अशा लोकांच्या यादीमध्ये मुख्यत्वे ब्रिटिश राज्यकर्ते व सेनाधिकारी सामील होते. पण दुर्दैवाने, राजा हरिसिंगाचे नावदेखील त्या यादीत जोडावे लागेल.   

फाळणीच्या आधीपासून आणि नंतरही, पाकिस्तानात विलीन होण्यासाठी राजा हरिसिंगावर दबाव होता. भारताकडून तसा प्रत्यक्ष दबाव नसला तरी प्रयत्न नक्कीच केले जात होते. ऑगस्ट-सप्टेंबर १९४७ पासून पूंछमधील जनआंदोलनाची आणि पाकिस्तानी सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीची माहिती राजा हरिसिंगाला होती. त्याने त्याविरुद्ध काही तुटपुंजी उपाययोजना करण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्याने भारत सरकारला ही माहिती कळवली नव्हती.
[संदर्भ : "Slender  was  the  Thread" - लेखक : लेफ्टनंट जनरल लायोनेल प्रोतीप ("बोगी") सेन ] 

पाकिस्तानातून डोमेलमार्गे काश्मीरमध्ये आलेल्या काही हिंदू व शीख निर्वासितांनी १५ ऑक्टोबर १९४७ रोजी, काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान श्री. मेहेरचंद महाजन यांची श्रीनगरमध्ये भेट घेतली. त्या निर्वासितांनी सांगितले की, पाकिस्तानातील अबोटाबाद व मनशेहरा या गावांजवळ बरेच अफगाणी टोळीवाले लोक एकत्रित झालेले त्यांनी पाहिले होते. त्यांनी अश्या अफवाही ऐकल्या होत्या की ते टोळीवाले काश्मीरवर चालून येण्याच्या तयारीत होते. राजा हरिसिंगाने ब्रिटनचे पंतप्रधान, क्लेमेंट ऍटली, यांना तारेने ही माहिती कळवली. परंतु, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. भारताचे पंतप्रधान, पंडित नेहरूंना मात्र ही माहिती कळवली गेली नाही. 

१८ ऑक्टोबर १९४७ रोजी राजा हरिसिंगाने पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल जिन्ना आणि पंतप्रधान लियाकत अली खान यांना पत्रे लिहून, पाकिस्तानातून होणारी घुसखोरी, काश्मिरी मुस्लिम सैनिकांना फितवण्याचे पाकिस्तान्यांकडून होणारे प्रयत्न आणि त्यांच्या  देशाकडून होणारे 'जैसे थे' कराराचे उल्लंघन, याबद्दल तक्रार केली. परंतु, १९ ऑक्टोबरला लियाकत अली खान यांनी लिहिलेल्या उत्तरामध्ये, काश्मीरमधील बहुसंख्य मुसलमानांच्या होणाऱ्या 'गळचेपी'बद्दल उलट राजालाच जाब विचारला. पाकिस्तानी पंतप्रधानांनी अशा 'उलट्या बोंबा' मारल्यानंतर, २० ऑक्टोबर रोजी जिन्नांनी राजाला पत्र लिहून, पंतप्रधान महाजनांना शांतिचर्चेसाठी लाहोरला पाठवण्याची सूचना केली. अर्थातच, राजा हरिसिंगाने जिन्नांची ही सूचना स्वीकारली नाही.

काश्मीरमध्ये सुट्टीसाठी येऊन राहिलेल्या ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या परिवारांना १८ ऑक्टोबर रोजी अचानकच आदेश मिळाले की त्यांनी तातडीने काश्मीर सोडावे. १९ ऑक्टोबरला रावळपिंडी व पेशावर येथून अनेक ट्र्क व बसगाड्या काश्मीरमध्ये आल्या आणि सर्व ब्रिटिश नागरिकांना सुखरूप काश्मीरमधून बाहेर काढण्यात आले. काश्मीरवर होऊ घातलेल्या आक्रमणाची पूर्वकल्पना काही ब्रिटिश लोकांना असल्याशिवाय ब्रिटिश नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशी कारवाई तडकाफडकी केली गेली नसती. 
[संदर्भ : "Kashmir's Untold Story: Declassified"  - लेखक:  इकबाल चंद मल्होत्रा आणि मारूफ रझा]

काश्मीरमध्ये घडणाऱ्या या सर्व घटनांबद्दल नवनियुक्त भारत सरकार मात्र पूर्णतः अनभिज्ञ होते. भारतीय गुप्तहेरखात्याचे सर्व तत्कालीन अधिकारी ब्रिटिश होते, ही वस्तुस्थिती पुरेशी बोलकी आहे. मेजर ओंकारसिंग कालकट यांनी २४ ऑक्टोबर रोजी दिलेली 'ऑपरेशन गुलमर्ग'संबंधीची खबर, गुप्तहेर खात्याच्या याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ऐकूनही कानाआड टाकली असणार यात शंका नाही. 

२४ ऑक्टोबर १९४७ रोजी उरीमधील पूल उध्वस्त झाल्यामुळे टोळीवाल्यांचे आक्रमण तात्पुरते थंडावले होते. त्याच दिवशी, जम्मूमधील पल्लान्द्री नावाच्या गावी, बंडखोरांचे नेते सरदार मुहम्मद इब्राहिम खान यांनी 'आझाद काश्मीर' चे हंगामी सरकार अस्तित्वात आल्याची घोषणा केली. त्याच सुमारास, गिलगिटमध्येही काही छुप्या घडामोडी घडू लागल्या होत्या. 

१९३५ साली ब्रिटीश सरकारने राजा हरिसिंगासोबत ६० वर्षांचा करार करून, गिलगिट एजेन्सी  भाडेपट्ट्याने ताब्यात घेतलेली होती. मात्र, भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केल्यानंतर, अशा प्रकारचे सर्व करार रद्द करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. त्यानुसार, १ ऑगस्ट १९४७ रोजी गिलगिट एजेन्सीचा ताबा पुन्हा काश्मीरच्या राजाकडे सुपूर्द केला गेला. काश्मिरी लष्करी अधिकारी, ब्रिगेडियर घनसारा सिंग यांनी गिलगिटच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्याच वेळी त्यांना असे समजले की, 'गिलगिट स्काउट्स'मध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी 'गिलगिट स्काउट्स' मधून बाहेर पडून पाकिस्तानी सैन्यदलामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे. ब्रिगेडियर घनसारा सिंग आणि राजा हरिसिंगाना या बातमीने धक्काच बसला. परंतु, ब्रिटिश सेनेमधून आधीच राजीनामा देऊन बाहेर पडलेले मेजर विलियम ब्राऊन मात्र, 'गिलगिट स्काउट्स'च्या सेवेतच राहिले. 

२४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान, मेजर ब्राऊन यांना वायव्य सरहद्द प्रांतातील पेशावरमधून, कर्नल बेकन यांचे रेडिओ संदेश वरचेवर येऊ लागले. अनेक महिन्यांपूर्वी आखले गेलेले 'ऑपरेशन दत्ता खेल' कार्यान्वित करण्याची वेळ आता आली होती, आणि या दोन्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा त्यामध्ये मोठा सक्रिय सहभाग होता. २८ ऑक्टोबरला मेजर ब्राऊनना समजले की वायव्य सरहद्द प्रांतातील चित्राल राज्याचा नवाब मेहतर, आणि स्वात खोऱ्याचा मुख्य वली या दोघांच्याही सेना गिलगिट एजेन्सीच्या सीमेवर, ब्रिटिशांच्या मदतीसाठी पूर्ण तयारीनिशी उभ्या आहेत. 

गिलगिटभोवतीची सगळी व्यूहरचना पूर्ण झाल्यावर, आणि कर्नल बेकन यांच्याकडून 'आगे बढो' चा रेडिओ संदेश मिळताच, ३० ऑक्टोबर रोजी मेजर ब्राऊनने गिलगिटचे गव्हर्नर ब्रिगेडियर घनसारा सिंग यांना भेटून त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवले. एक पर्याय होता की, गव्हर्नरांनी पदावरून पायउतार होऊन 'गिलगिट स्काउट्स'च्या हातात सत्ता सोपवावी, व सुखरूप श्रीनगरला निघून जावे. दुसरा पर्याय असा होता की, संपूर्ण गिलगिट प्रांतामध्ये जनमतचाचणी करावी, आणि स्थानिक जनता ज्या देशामध्ये सामील होण्याचे ठरवेल त्याप्रमाणे करावे. राजाशी एकनिष्ठ असलेले ब्रिगेडियर घनसारा सिंग यांनी दोन्ही पर्याय धुडकावून लावल्यानंतर, मेजर ब्राऊनने 'ऑपरेशन दत्ता खेल' कार्यान्वित केले. 

३१ ऑक्टोबरच्या रात्री, ब्रिगेडियर घनसारा सिंग यांच्या घराला 'गिलगिट स्काउट्स'च्या जवानांनी वेढा घातला. १ नोव्हेंबरला, गिलगिट एजेन्सी सर केल्याचा संदेश मेजर ब्राऊनने कर्नल बेकन यांना पाठवला. त्यांच्याच पुढील आदेशानुसार, ४ नोव्हेंबर १९४७ रोजी मेजर ब्राऊनने गिलगिटच्या गव्हर्नर कार्यालयावर पाकिस्तानचा झेंडा फडकावला. अशा तऱ्हेने, रक्ताचा एक थेंबही न सांडता, काश्मीरकडून गिलगिट हिरावून पाकिस्तानने आपल्या घशात घातले!

लष्करी मदतीसाठी काश्मीरने भारताला केलेली विनंती तात्काळ मान्य झाली नाही. लॉर्ड माउंटबॅटन, पंतप्रधान नेहरू, आणि गृहमंत्री सरदार पटेल यांच्या एकमताने असे ठरले की, काश्मीर राज्य जर भारतात विलीन झाले तरच अशी मदत दिली जावी. भारत सरकारच्या संरक्षण समितीचे प्रतिनिधी म्हणून, काश्मीरमधील स्थितीची पाहणी करण्यासाठी, २५ ऑक्टोबरला सरदार पटेलांचे स्वीय सचिव सर व्ही. पी. मेनन श्रीनगरला पोहोचले. काश्मीरच्या विलीनीकरणासंबंधीचा भारत सरकारचा प्रस्ताव त्यांनी राजासमोर मांडला. 

काश्मीरच्या विलीनीकरणामागची गुंतागुंत समजण्यासाठी, विलीनीकरण कराराचे नियम व अटी काय होत्या, हे जाणणे आवश्यक आहे. तसेच, या नाट्यातील एकेका पात्राची काश्मीरच्या बाबतीत काय भूमिका होती हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. 

सर्व संस्थानांसोबत केल्या गेलेल्या विलीनीकरण करारानुसार, त्या-त्या संस्थांनाचे परराष्ट्रसंबंध, संरक्षण, आणि दळणवळण, अशी तीन खाती भारत सरकारच्या अख्त्यारीमध्ये जाणारच होती. त्याव्यतिरिक्त इतर विषय, तसेच भारतीय संविधान आणि भारतीय दंडविधान यांच्या बाबतीत भारताचे स्वामित्व स्वीकारणारी संस्थाने भारतामध्ये संपूर्णपणे विलीन होणार होती. जवळजवळ सर्वच संस्थाने या प्रकारे भारतामध्ये विलीन झाली होती. 

काश्मीरची सेना व पोलीसदलातील फितुरी, आणि परकीय आक्रमणामुळे त्रस्त झालेल्या राजा हरिसिंगाला आपल्या राज्याच्या रक्षणासाठी भारताची लष्करी मदत तर हवी होती. परंतु, राज्यावरची पकड सोडण्याची त्याची तयारी नव्हती. त्यामुळे, विलीनीकरण करार झाल्यानंतर, काश्मीर राज्यामध्ये राजाला 'मर्यदित' स्वातंत्र्य असावे अशी हरिसिंगाची इच्छा होती.

काश्मीरमधील डोग्रा राजवट संपावी आणि लोकशाही यावी, असे शेख अब्दुल्लांना वाटत होते. परंतु, भारतामध्ये समाविष्ट झाल्यानंतर काश्मीरची स्वतंत्र ओळख, अर्थात 'काश्मिरीयत' टिकून राहावी, अशीही त्यांची इच्छा होती. याच कारणासाठी, भारताचा अविभाज्य भाग झाल्यानंतर काश्मीरला एक विशेष दर्जा असावा असा त्यांचा आग्रह होता. 

पंडित नेहरूंचा परिवार मूलतः काश्मिरी असल्याने, तसेच भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे, काश्मीर राज्य भारतात सामील व्हावे यासाठी नेहरू प्रयत्नशील होते. परंतु, मुस्लिम-बहुल काश्मीर राज्य भारतात विलीन झाल्यामुळे, धर्माच्या आधारावर जिन्नांनी मांडलेला 'द्विराष्ट्रवाद' सिध्दांत मुळापासून खोडून काढला जावा अशीही पंडित नेहरूंची इच्छा होती. शेख अब्दुल्ला व त्यांच्या 'नॅशनल कॉन्फरन्स' पक्षासोबत नेहरूंची असलेली जवळीक हा मुद्दादेखील महत्वाचा होता.

भारत हे एक सुसंघटित आणि सशक्त राज्य बनावे ही गृहमंत्री सरदार पटेलांची इच्छा होती. काश्मीरची भौगोलिक स्थिती आणि सामरिक महत्व ते जाणून होते. त्यामुळे काश्मीर भारतात विलीन झाल्यास त्यांनाही हवेच होते.   

लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर नेहरूंच्या विचारांचा थोडासा प्रभाव असल्याने त्यांचा कल नेहरूंकडे अधिक होता हे खरे, परंतु, ब्रिटिश साम्राज्याचे हितसंबंध जपणे हे त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे होते. 
 
२५ ऑक्टोबर १९४७ रोजी, सर व्ही. पी. मेनन यांनी विलीनीकरणासंबंधी राजाचे व शेख अब्दुल्लांचे मत जाणून घेतले. काश्मीरवरील आक्रमणाच्या स्थितीचाही अंदाज त्यांनी घेतला. त्यांनी राजाला सावध केले की, विलीनीकरण होण्यापूर्वीच जर हल्लेखोर श्रीनगरपर्यंत पोचले तर राजपरिवारातील सदस्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांनी सल्ला दिला की राजाने त्वरित जम्मूला स्थलांतर करावे. त्याप्रमाणे, डोग्रा राजपरिवार २५ ऑक्टोबरच्या रात्रीच जम्मूमध्ये येऊन पोहोचला.

सर व्ही. पी. मेनन २६ ऑक्टोबरच्या सकाळी, शेख अब्दुल्लांसह दिल्लीत परतले आणि संरक्षण समितीसमोर त्यांनी आपला अहवाल ठेवला. तातडीने काश्मीरला लष्करी साहाय्य मिळाले नाही तर जम्मू-काश्मीरची राजधानी हल्लेखोरांच्या हाती पडण्याचे स्पष्ट संकेत दिसत होते. या पार्श्वभूमीवर, भारतीय सेना काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. दिल्लीमध्ये शेख अब्दुल्लांचे वास्तव्य नेहरूंच्या घरीच होते. त्या दोघांची चर्चाही झाली असणार व शेख अब्दुल्लांचे काश्मीर राज्यातले स्थान काय असावे याचा विचारही झाला असणार, हे उघड आहे. भारतीय सेनेला काश्मीरमध्ये जाण्याची तयारी करण्याचे आदेश दिले गेले, परंतु, प्रत्यक्षात सेना पाठवण्यापूर्वी जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण होणे आवश्यक होते. 

२६ ऑक्टोबरलाच सर व्ही. पी. मेनन जम्मूमध्ये परतले आणि काश्मीरच्या राजाने विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली. २७ ऑक्टोबर रोजी, भारताचे गव्हर्नर जनरल, लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्या करारावर स्वाक्षरी करून आपले अनुमोदन दिले आणि अखेर  जम्मू-काश्मीर राज्य भारतात विलीन झाले. काश्मीरचे पंतप्रधान मेहेरचंद महाजन व उपपंतप्रधान रामलाल बात्रा यांच्यासह राज्यकारभार सांभाळण्यासाठी, 'मुख्य कार्यकारी प्रशासक' या पदावर शेख अब्दुल्लांची नेमणूक करण्याचेही ठरले. 

विलीनीकरणाला अनुमोदन देताना राजा हरिसिंगाला पाठवलेल्या पत्रामध्ये लॉर्ड माउंटबॅटननी लिहिले होते, "ज्या राज्यांच्या विलीनीकरणासंबंधी कोणत्याही प्रकारचे वाद असतील, त्यांचे विलीनीकरण जनमतानुसारच व्हावे, या धोरणाला अनुसरून, माझ्या सरकारने असे ठरवले आहे की, आपल्या राज्यातील घुसखोरांना बाहेर हाकलून दिल्यावर, आणि कायदा व सुव्यवस्था पुनःप्रस्थापित झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या मताची चाचणी घेऊनच जम्मू-काश्मीर राज्याच्या विलीनीकरणासंबंधी अंतिम निर्णय होईल." 

अशा प्रकारे, स्वतंत्र भारताच्या काटेरी वाटेवर, लॉर्ड माउंटबॅटन यांनी काश्मीर समस्येची पहिली मेखही ठोकून ठेवली!

 
(क्रमशः)
(भाग १५ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १३

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग १२ नंतर पुढे चालू...)

ऑगस्ट व सप्टेंबर १९४७ या दोन महिन्यांमध्ये ब्रिटिश व पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संगनमताने, जम्मू, काश्मीर खोरे व गिलगिट एजेन्सी या तिन्ही प्रदेशांभोवतीचे जाळे विणून तयार होते. फाळणीमुळे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान हिंदू-मुस्लिमांचे स्थलांतर सुरु होते. शरणार्थी शिबीरांचे नियोजन करण्यामध्ये, आणि दोन्ही समुदायांमध्ये घडणारा हिंसाचार हाताळण्यामध्ये व्यग्र असलेल्या भारत सरकार व भारतीय सेनेला काश्मीर राज्यावर घोंघावणाऱ्या संकटाची सुतराम कल्पना नव्हती.
ब्रिगेडियर राजिंदर सिंग 

जम्मू प्रदेशात सुरु झालेल्या राजद्रोहाची व्याप्ती किती वाढू शकेल याचा अंदाज राजा हरिसिंगालाही नव्हता. त्याचे सैन्यबळ कमी होते. पाकिस्तानसोबत 'जैसे थे' करार केलेला असला तरी, मुस्लिम जनतेचा विद्रोह रोखण्यासाठी त्या इस्लामी देशाकडून मदत मागण्यात काहीच अर्थ नव्हता. काश्मीर राज्य पाकिस्तानात विलीन करण्यासाठी अंतस्थपणे प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान रामचंद्र काक यांना राजाने नुकतेच, ११ ऑगस्ट रोजी पदच्युत करून अटकेत ठेवलेले होते. स्वतंत्र राहण्याचा विचार करत असलेल्या राजा हरिसिंगाला भारताकडूनही मदत मागण्याची सोय नसल्याने, जम्मूमधील 'आझाद काश्मीर' आंदोलनाची सत्य परिस्थिती त्याने भारत सरकारला कळवली नव्हती.  

हे सर्व काही घडत असताना, शेख अब्दुल्ला तुरुंगात होते. त्यांच्या मुक्ततेसाठी भारताचे पंतप्रधान, पंडित नेहरूंकडून अनेकवेळा प्रयत्न झालेले होते. भारतीय काँग्रेसी नेत्यांचा प्रभाव जरी शेख अब्दुल्लांवर असला तरी पाकिस्तानला मात्र त्यांचा ठाम विरोध होता. काश्मीरचे नवे पंतप्रधान, मेजर जनरल जनकसिंगांनी राजा हरिसिंगाला सल्ला दिला की, शेख अब्दुल्ला काश्मिरी जनतेचे लोकप्रिय नेते असल्याने, त्यांना कैदेतून मुक्त केल्यास जनतेचा असंतोष कमी करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकेल. 

२९ सप्टेंबर १९४७ रोजी शेख अब्दुल्ला तुरुंगातून सुटले. काश्मीरवरील डोग्रा राजवट संपुष्टात यावी आणि स्वतंत्र काश्मीरचा राज्यकारभार स्वतःच्या हातात यावा अशीच त्यांची सुप्त इच्छा होती. परंतु, जर स्वतंत्र राहणे काही कारणाने अशक्यच झाले, तर लोकतांत्रिक भारतामध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारण्याकडे त्यांचा कल होता. इस्लामी पाकिस्तानमध्ये काश्मीर राज्य विलीन झाल्यास, आपली 'काश्मिरीयत' टिकून राहणे अशक्य आहे हे त्यांना दिसत होते. त्यामुळे, जिन्ना आणि त्यांच्या 'द्विराष्ट्र्वादा'ला शेख अब्दुल्लांचा पूर्वीपासूनच सक्त विरोध होता. तुरुंगातून सुटल्यानंतर शेख अब्दुल्लांनी ज्या सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी लोकांना हाच संदेश दिला की, काश्मीरवर कोणाचे राज्य असावे हे ठरवण्याचा अधिकार फक्त काश्मिरी लोकांचा आहे. 

काश्मीर पाकिस्तानात विलीन होण्याच्या सर्व शक्यता मावळत चालल्याने, 'ऑपरेशन गुलमर्ग' व ऑपरेशन 'दत्ता खेल' कार्यान्वित करण्याच्या हालचालींना पाकिस्तानात वेग आला. धार्मिक भावनांना साद घालून, जम्मू आणि काश्मीर खोऱ्यामधील पोलीस व सैन्यदलातील शिपायांना फितवले जात होते. पूंछ, मीरपूर भागातील सीमेवरची एकेक चौकी 'आझाद काश्मीर'साठी लढणाऱ्या बंडखोराच्या हातात पडू लागली. त्यामागे पाकिस्तानी सैन्याचा छुपा हात होताच. 

जम्मू भागात प्रक्षेपित होणारे काही रेडिओ संदेश भारतीय दूरसंचार यंत्रणेला, क्वचितच व आकस्मिकपणे मिळत होते. "अमुक ठिकाणावर आपला कब्जा झाला", "तमुक चौकीचा आपण पाडाव केला"  अशा स्वरूपाच्या त्या कूट संदेशांमध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याच चौक्या किंवा ठिकाणे भारतीय नकाशांमध्ये शोधूनही मिळत नव्हती. त्यामुळे त्या संदेशांना फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. जम्मू-काश्मीर राज्याचे नकाशे भारताकडे असण्याचा संभव नव्हता, आणि जरी ती ठिकाणे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत हे वेळीच समजले असते तरीही जम्मू-काश्मीर स्वतंत्र राज्य असल्याने भारतीय सेनेच्या अखत्यारीत ती  बाब आली नसतीच. 

काश्मीरचे दुर्दैव म्हणजे, त्या आणीबाणीच्या काळातही, स्वतंत्र राहण्यासाठी धडपडणाऱ्या हरिसिंगाने भारताला नव्हे, तर पतियाळाच्या महाराजांना लष्करी मदतीसाठी विनंती केली. ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये पतियाळा सैन्याच्या पायदळाची एक बटालियन आणि तोफखान्याची एक तुकडी काश्मीरमध्ये दाखल झाली. परंतु, लवकरच कोसळू पाहणाऱ्या संकटापुढे ती सेना अगदीच तुटपुंजी ठरली. 

२२ ऑक्टोबर १९४७ रोजी, 'मेजर जनरल तारिक' उर्फ पाकिस्तानी ब्रिगेडियर अकबर खान यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन गुलमर्ग' सुरु झाले. वायव्य सरहद्द प्रांत आणि अफगाणिस्तानातील डोंगर-दऱ्यांतील गुहा आणि वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रानटी टोळीवाल्यांना इंग्रजांनी गेली शंभर वर्षे अक्षरशः जखडून ठेवले होते. वस्त्यांमधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना आपली शस्त्रे ब्रिटिश चौकीवर जमा करावी लागत असत. आता मात्र त्याच टोळीवाल्यांना शस्त्रे पुरवून काश्मीरवर हल्ला करण्यासाठी धाडले गेले होते. ही धाड काश्मीरसाठी तर दुर्दैवी होतीच, परंतु, अनुशासनहीन आणि पिसाट वृत्तीच्या टोळीवाल्यांना काश्मीरवरील हल्ल्यांसाठी वापरणे, पाकिस्तानच्या मूळ उद्दिष्टालादेखील मारक ठरले!

रावळपिंडी-मुझफ्फराबाद-डोमेल-उरी-बारामुल्ला-श्रीनगर या डांबरी रस्त्यावर, बसगाड्यांमधून प्रवास करीत असलेल्या टोळीवाल्यांच्या फौजेला मुझफ्फराबाद-श्रीनगर हे १२५ किलोमीटरचे अंतर पार करायला एक दिवस पुरेसा होता. पण मुझफ्फराबादमध्ये, लेफ्टनंट कर्नल नारायणसिंगांच्या नेतृत्वाखाली '४ जम्मू-काश्मीर इन्फन्ट्री' ही बटालियन तैनात होती. मुझफ्फराबादच्या आसपासच्या टेकड्यांवर आणि डोमेल येथील झेलम नदीवरच्या पुलावर या बटालियनच्या गस्ती चौक्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात बर्मा फ्रंटवर युद्धाचा अनुभव घेतलेल्या या बटालियनमध्ये सुमारे ५० टक्के डोग्रा आणि ५० टक्के पुंछी मुसलमान सैनिक होते. 

जम्मूमधील पूंछ व मीरपूर भागात सीमेपलीकडून हल्ले होत असले तरी काश्मीर प्रदेशात कुठेही आक्रमणाची खबर नव्हती. परंतु, जम्मूतील पुंछी मुस्लिम सैनिकांच्या फितुरीची खबर राज्याच्या गुप्तहेर खात्याकडून लेफ्टनंट कर्नल नारायणसिंगांना दिली गेली होती. त्यांना असेही सुचवण्यात आले होते की, त्यांनी आपल्या सर्व मुस्लिम सैनिकांना श्रीनगरमध्ये पाठवून द्यावे व त्यांऐवजी तेवढेच डोग्रा सैनिक त्यांना पुरवले जातील. लेफ्टनंट कर्नल नारायणसिंगांना ही सूचना मुळीच आवडली नाही. त्यांच्या दृष्टीने त्यांचे सर्वच सैनिक निष्ठावान होते. आपल्या सैनिकांमध्ये हिंदू-मुस्लिम भेदभाव करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते.  

परंतु, 'ऑपरेशन गुलमर्ग' च्या रणनीतीला अनुसरून, '४ जम्मू-काश्मीर इन्फन्ट्री' बटालियनच्या मुस्लिम सैनिकांना, हिंदू राजा व त्याच्या प्रजेतील हिंदू जनतेविरुद्ध फितवण्याची कारवाई गुप्तपणे सुरु झालेली होती. २२ ऑक्टोबरला पहाटेच्या अंधारात, बटालियनमधील मुस्लिम सैनिक गुपचूपपणे उठले, शस्त्रागारातून आपापली शस्त्रे घेतली आणि स्वस्थ निद्रेत असलेल्या आपल्याच डोग्रा बंधूंना त्यांनी ठार केले. ज्या मुस्लिम सैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेवर लेफ्टनंट कर्नल नारायणसिंगांनी अतोनात भरवसा ठेवला होता त्याच सैनिकांनी त्यांचाही जीव घेतला व ते सीमेपार आक्रमणाच्या तयारीत असलेल्या टोळीवाल्यांना जाऊन मिळाले!
[संदर्भ : "Slender  was  the  Thread" - लेखक : लेफ्टनंट जनरल लायोनेल प्रोतीप ("बोगी") सेन ] 

'धर्मरक्षणा'च्या नावाखाली सामान्य माणसाला स्वतःच्या देशाविरुद्ध किंवा आपल्याच जवळच्या माणसांविरुद्ध फंदफितुरी करण्यास प्रवृत्त करता येऊ शकते, हे खरे आहे. पण अनेक मुलकी नोकरदार व सामान्य काश्मिरी मुस्लिम लोकदेखील धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन काश्मीरसाठी लढले हे सत्यही नाकारता येणार नाही. मूळ उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेले, भारतीय सेनेचे ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान (मरणोपरांत महावीर चक्र) यांनी फाळणीनंतर भारतीय सेनेतच सेवा करणे पसंत केले होते. ३ जुलै १९४८ रोजी काश्मीरच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या  प्राणांची आहुती दिली हा इतिहासही अविस्मरणीय आहे.

त्या काळी, श्रीनगर-रावळपिंडी दरम्यान मुझफ्फराबाद हे एक मुख्य व्यापारी केंद्र होते. मुस्लिम सैनिकांच्या फितुरीमुळे '४ जम्मू-काश्मीर इन्फन्ट्री' बटालियनचा अडथळा दूर होताच, टोळीवाल्यांच्या झुंडी सीमा पार करून मुझफ्फराबाद शहरात घुसल्या. त्यांना भारत-पाकिस्तान, अथवा काश्मीरशी काहीच देणे-घेणे नव्हते. कधी नव्हे ते दृष्टीस पडलेले सृष्टीवैभव, सुस्वरूप काश्मिरी स्त्रिया आणि घरा-घरातून असलेला पैसा-अडका व चीज-वस्तूंनी त्यांना वेडेपिसे केले. २२ ऑक्टोबरच्या दिवसभरात टोळीवाल्यांच्या लुटालूट, जाळपोळ, खून व बलात्कारांमुळे मुझफ्फराबाद अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. 

"हे काहीच नव्हे, पुढे श्रीनगरपर्यंत चला. आणखी खूप काही मिळेल" अशी आश्वासने त्यांच्या पाकिस्तानी लष्करी नेत्यांनी दिल्यामुळेच, रानटी टोळीवाले मुझफ्फराबाद सोडून पुढे जायला तयार झाले. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ते ज्यांच्यावर अत्याचार करीत होते त्या स्थानिक हिंदू व मुस्लिम लोकांच्या धर्माशी टोळीवाल्यांचा काहीही लागा-बांधा नव्हता. माणसामधली अतिरेकी, गुन्हेगारी प्रवृत्ती कोणताच धर्म जाणत नाही हेदेखील खरेच.

आपल्याच मुस्लिम सहकाऱ्यांनी केलेल्या आकस्मिक हल्ल्यातून कसेबसे जीव बचावून काही डोग्रा सैनिक श्रीनगरच्या दिशेने पळाले. वाटेतूनच फोन करून, घडलेल्या प्रकाराची बातमी त्यांनी राजधानीत पोहोचवली. या बातमीने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. काश्मीरची सेना तुकड्या-तुकड्यांमध्ये संपूर्ण सीमेवर विखुरलेली होती. डोमेल व श्रीनगरच्या दरम्यान सेनेची एकही तुकडी तैनात नव्हती. जेमतेम काही तासांच्या आतच हल्लेखोर श्रीनगरला येऊन धडकण्याची चिन्हे दिसू लागली. 

२५ सप्टेंबर १९४७ रोजी ब्रिगेडियर राजिंदर सिंग यांनी मेजर जनरल हेन्री स्कॉट यांच्याकडून काश्मीर लष्कराच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली होती. येणाऱ्या संकटाची खबर मिळताच, राजधानीत हजर असलेल्या २०० सैनिकांची एक सशस्त्र तुकडी, आणि पूल उडवण्यासाठी लागणारा दारुगोळा त्यांनी सोबत घेतला व डोमेलच्या दिशेने तातडीने कूच केले. एवढ्या मोठया संख्येने चालून येणाऱ्या शत्रूला शक्य तेवढा काळ रोखून धरण्यापलीकडे फारसे काही करता येणार नाही याची पूर्ण कल्पना ब्रिगेडियर राजिंदर सिंगना आली होती. तरीदेखील, काश्मीरच्या लष्करप्रमुखांनी स्वतःचा जीव धोक्यात का घातला? पुढील योजना आखण्यासाठी स्वतः राजधानीमध्ये थांबून, दुसऱ्या एखाद्या विश्वासू अधिकाऱ्याला या कामगिरीवर पाठवता आले नसते का? हे कोडे आज सुटणे अशक्य आहे. 

श्रीनगरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या उरी गावात पोहोचताच, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या टेकड्यांवर ब्रिगेडियर राजिंदर सिंगांनी आपले सैनिक तैनात केले. त्याचबरोबर तेथील पुलाच्या लोखंडी खांबांना दारूगोळा बांधून ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. शत्रूला शक्यतोवर उरीच्या अलीकडेच रोखायचे आणि अगदीच अशक्य झाल्यास नदीवरचा पूल उडवून द्यायचा, अशी त्यांची योजना होती. 

२३ ऑक्टोबरच्या दुपारी डोमेलकडून हल्लेखोरांच्या बसगाड्या येताना दिसू लागल्या. ते बंदुकीच्या टप्प्यात येताच काश्मिरी सैनिकांनी त्यांच्यावर लांब पल्ल्याच्या बंदुकांनी मारा सुरु केला. हल्लेखोर रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूंना पांगले व पुढे येऊ लागले. हळू-हळू मागे-मागे येत, अखेर ब्रिगेडियर राजिंदर सिंगांनी पूल उडवण्याचा आदेश दिला. उरी-श्रीनगर रस्त्यावरचा तो पूल उडवण्याचा निर्णय काश्मीरसाठी किती महत्वाचा ठरला हे पुढील काळात उघड झाले. 

एकेकट्या माणसाला पायी नदी पार करता येण्यासाठी एक अरुंद व कच्चा पूल उरीच्या उत्तरेला अस्तित्वात होता. त्या पुलावरून हल्लेखोरांच्या लहान-लहान टोळ्या नदीपार असलेल्या माहुरा गावाच्या दिशेने येऊ लागल्या. काश्मिरी सैनिकांच्या पिछाडीला येऊन त्यांना घेरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता आपल्या सैनिकांसह पीछेहाट करण्यावाचून ब्रिगेडियर राजिंदर सिंगांना गत्यंतर नव्हते. त्याच वेळी, अचानक झालेल्या गोळीबारामध्ये ते जबर जखमी झाले. सैनिकांनी त्यांना उचलून सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आग्रहाला न जुमानता, एका नाल्यावरील पुलाखाली ब्रिगेडियर राजिंदर सिंगांनी आश्रय घेतला. जमेल तसे शत्रूला रोखत-रोखत, हळू-हळू पीछेहाट करत जावे, असे आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना दिले. मात्र, काश्मीरच्या त्या झुंझार लष्करप्रमुखाचे पुढे काय झाले हे कोणालाही कधीच समजले नाही. 
 
माहुरा गावात काश्मीरचे विद्द्युतनिर्मिती केंद्र होते. टोळीवाल्यांचे आक्रमण झाल्याचे समजताच तेथील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. २३ तारखेच्या संध्याकाळपासूनच श्रीनगर अंधारात बुडाले. मुझफ्फराबाद-डोमेलचा पाडाव, लष्करप्रमुखांचे हौतात्म्य आणि श्रीनगरचा वीजपुरवठा बंद होणे, या एकापाठोपाठ वेगाने घडत गेलेल्या घटनांमुळे, काश्मीरवर ओढवलेल्या संकटाची पुरेपूर कल्पना राजा हरिसिंगाला आली. २४ ऑक्टोबरला राजाने भारताकडून साहाय्य मागण्याकरिता आपल्या उपपंतप्रधानांना दिल्लीला रवाना केले.

त्याच सकाळी, मेजर ओंकार सिंग कालकट यांच्याकडून पंडित नेहरूंना 'ऑपरेशन गुलमर्ग' संबंधीची माहिती  समजली होती. दिल्लीमध्ये घटनाचक्रे भराभर फिरू लागली, पण काश्मीरमध्ये भारतीय सेना पाठवण्याचा निर्णय मात्र होऊ शकत नव्हता. अजूनही फील्ड मार्शल ऑकिनलेक हेच दोन्ही देशांच्या सैन्यदलांचे सरसेनापती होते. दोन्ही सैन्यदलांत, आणि विशेषतः पाकिस्तानी सेनेमध्ये, प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारीच होते. भारताने काश्मीरमध्ये आपली सेना पाठवल्याचे निमित्त साधून जर पाकिस्ताननेही आपले सैन्य अधिकृतपणे काश्मिरात पाठवले असते तर मोठाच विचित्र युद्धप्रसंग ओढवण्याची भीती लॉर्ड माउंटबॅटनना वाटत होती.

दरम्यान, २३ ऑक्टोबरला उरीचा पूल नष्ट झाल्यानंतर पायी पुढे जाण्यासाठी टोळीवाले अजिबात तयार नव्हते. त्यांनी २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान उरीमध्येच तळ ठोकला. हे चार दिवस उर्वरित काश्मीरच्या रक्षणासाठी अतिशय महत्वाचे ठरले. कारण त्या चार दिवसांमध्येच, काश्मीरचे भारतात विलीनीकरण, आणि भारतीय लष्कराचे काश्मीरमध्ये आगमन, या दोन महत्वाच्या घडामोडींविषयी निर्णय घेतलॆ गेले. 

'ऑपरेशन गुलमर्ग' च्या छुप्या कारवाईसाठी पाकिस्तानने ज्यांचा वापर केला त्या रानटी टोळीवाल्यांची लालसा, विषयवासना, अनुशासनहीनता, आणि मुजोरी, पाकिस्तानच्या काश्मीर मोहिमेसाठी घातक ठरली.

स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यापूर्वी उरीचा पूल उडवून, ब्रिगेडियर राजिंदरसिंगांनी आपल्या मातृभूमी व कर्मभूमीवर मोठेच उपकार केले होते...  

(क्रमशः)
(भाग १ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

सोमवार, ११ एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १२

 #काश्मीरचे_अश्रू 

(भाग ११ नंतर पुढे चालू...)

ऑगस्ट १९४७ मध्ये पाकिस्तानात शिजलेले 'ऑपरेशन गुलमर्ग' नावाचे कारस्थान कितपत यशस्वी झाले हे पाहण्यापूर्वी, त्याच्या काही वर्षे अगोदर ब्रिटिशांनी शिजवलेल्या एका कारस्थानाबद्दल माहिती घेणे अत्यावश्यक आहे. 
जनरल मेसर्व्ही, सर जॉर्ज कनिंगहॅम,
लॉर्ड 'पग' इस्मे, आणि मेजर विल्यम ब्राऊन
  

शिखांकडून काश्मीर राज्य जिंकून घेतल्यानंतर, फक्त दोन कारणांमुळे इंग्रजांना काश्मीरमध्ये रस होता. एक म्हणजे, उन्हाळ्यात येऊन राहण्यासाठी काश्मीरसारखे थंड हवेचे ठिकाण दुसरे नाही. पण दुसरी, आणि अधिक महत्वाची गोष्ट अशी होती की, रशिया आणि चीन या दोन मोठ्या साम्राज्यांच्या सीमांना काश्मीरच्या गिलगिट प्रांताची सीमा जोडलेली होती. 'ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी' असलेल्या भारतभूमीवर रशिया व चीन या दोघांचीही नजर असणार हे उघड होते. म्हणूनच, उत्तरेकडून आपल्या साम्राज्याला कोणताही धोका उत्पन्न न व्हावा यासाठी इंग्रज कमालीचे जागरूक होते. इ.स. १८५८ मध्येच त्यांनी संपूर्ण काश्मीर राज्याचे भौगोलिक सर्वेक्षण करून सीमानिश्चितीचे काम सुरु केलेले होते. तसेच, सीमावर्ती भागावर नजर ठेवण्यासाठी आणि तेथील हुंझा, नागर, चित्राल, वगैरे छोट्या राज्यांसोबत मैत्रीसंबंध कायम ठेवण्यासाठी, इंग्रजांनी आपल्या राजकीय प्रतिनिधीची नेमणूक त्या भागात केली होती. 

१८८९ साली रशियामधून कॅप्टन ग्रॉमचेव्हस्की नावाचा अधिकारी, ५-६ जणांच्या पथकासह हुंझामध्ये येऊन तेथील राजा, मीर सफदर अली याला भेटला होता. हुंझाचा राजा हा काश्मीरच्या महाराजा प्रतापसिंगाचा मांडलिक होता. त्या राजाने रशियासोबत जवळीक साधल्याचे कारण दाखवून इंग्रजांनी महाराजा प्रतापसिंगालाच राजगादीवरून पदच्युत केले. प्रतापसिंग आणि त्याचा धाकटा भाऊ राजा अमरसिंग (हरिसिंगाचे वडील) यांच्यातील बेबनावाचा फायदा इंग्रजांनी उठवला. ब्रिटिश रेसिडेंट व राजा अमरसिंग यांच्या संयुक्त समितीने पुढील दहा वर्षे काश्मीरवर राज्य केले. म्हणजे, एका अर्थी, काश्मीरवर दिल्ली सरकारचेच राज्य होते. (अशीच परिस्थिती १९४७ नंतरही वेळोवेळी काश्मीरवर ओढवली!)

१८८९ ते १९०५ या काळात इंग्रजांनी अफगाणिस्तान व रशिया यांच्या दरम्यानची सीमा निश्चित केली. त्याच वेळी त्यांनी गिलगिट व रशिया यांना जोडणारी वाखान या भागाची एक चिंचोळी भूपट्टी अफगाणिस्तानात सामील केली. अशा प्रकारे त्यांनी काश्मीर व रशिया यांच्या दरम्यान एका इस्लामी देशाची पाचर मारून ठेवली. तसे करताना 'न्यायप्रिय' इंग्रज हे सोयीस्करपणे विसरले की, काश्मीर भारताचा एक भाग नसून ते एक स्वतंत्र राज्य होते!

पुढे १९१७ साली रशियामध्ये झारची सत्ता संपून, लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट राजवट अस्तित्वात आली. ताश्कंद येथे, १७ ऑक्टोबर १९२० रोजी, मानवेंद्र नाथ रॉय आणि अवनीनाथ मुखर्जी यांनी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया' ची स्थापना केली. इंग्लंड-रशिया वैर जुनेच होते, पण आता भारतातील ब्रिटिश सरकार विरुद्ध सोव्हिएत रशिया असा एक नवा सत्तासंघर्ष उभा राहिला. गिलगिट प्रदेशावर अधिक कडक पहारा ठेवणे इंग्रजांना गरजेचे वाटू लागले. 

१९२५ साली महाराजा प्रतापसिंगच्या मृत्यूनंतर, त्याचा उत्तराधिकारी म्हणून ब्रिटिशांनी स्वतःच निवडलेला राजा हरिसिंग गादीवर बसला. परंतु, हरिसिंग स्वतंत्र विचारांचा होता. त्याला इंग्रजांच्या ताटाखालचे मांजर होऊन राहणे पसंत नव्हते. १९३० साली लंडनच्या गोलमेज परिषदेत त्याने केलेले भाषण त्याच्या स्वतंत्र बाण्याचे प्रतीकच होते. त्यामुळे, इंग्रजांना तो डोईजड होण्याची भीती वाटू लागली. त्याच सुमारास काश्मीर खोऱ्यामध्ये शेख अब्दुल्लांचा उदय होऊन जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ती संधी साधून इंग्रजांनी राजाला कोंडीत पकडले, व काश्मीर राज्यामध्ये लोकतांत्रिक प्रक्रिया सुरु करण्यास भाग पाडले. काश्मीर खोऱ्यामधील राजकीय पेचांमध्ये हरिसिंगाला गुंतवून, त्याच्याकडून गिलगिट प्रदेश हस्तगत करण्याची खेळी इंग्रज मोठ्या चतुराईने खेळले.   

२६ मार्च १९३५ रोजी महाराजा हरिसिंगसोबत ६० वर्षांचा करार करून, इंग्रजांनी गिलगिट प्रांत भाड्याने घेतला. गिलगिटसोबत, पुनियाल, कोह-ए-खिज्र, यासिन, याश्कोमान, आणि चित्राल ही आजूबाजूची छोटी राज्येही एकत्र करून त्या सर्वांची एक 'गिलगिट एजन्सी' इंग्रजांनी निर्माण केली. या 'गिलगिट एजन्सी' वर ब्रिटिश राजकीय प्रतिनिधीचे संपूर्ण नियंत्रण होते. त्या एजन्सीच्या सुरक्षेसाठी ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली, 'गिलगिट स्काउट्स' ही स्थानिक सैनिकांची सेना उभी केली गेली. या सेनेतील बहुसंख्य सैनिक मुसलमान होते, आणि या सेनेचा खर्च महाराजा हरिसिंगाच्या तिजोरीमधून होत होता.  

१९४३ साली लेफ्टनंट विल्यम ब्राऊन नावाच्या एका तरुण आणि तडफदार ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक 'गिलगिट स्काउट्स' मध्ये झाली. त्याला पूर्वीपासूनच पुश्तू भाषा अवगत होती. गिलगिटमध्ये राहून, तो तेथील 'शिना' नावाची बोली, आणि हुंझामधील 'बुरुषास्की' ही भाषादेखील शिकला. लवकरच त्याला कॅप्टनपदी बढती मिळून तो चिलास येथे सहाय्यक राजकीय प्रतिनिधी म्हणून काम करू लागला. पुढील तीन वर्षांच्या काळात कॅप्टन ब्राऊनने संपूर्ण गिलगिट एजन्सीमध्ये प्रवास केला. त्याला तेथील संस्कृती आणि स्थानिक लोकांबद्दल विस्तृत माहिती तर मिळालीच, पण तेथील छोट्या राज्यांच्या राजांसोबत त्याने मित्रत्वाचे संबंधही प्रस्थापित केले. हाच लेफ्टनंट विल्यम ब्राऊन पुढे काही वर्षांतच गिलगिटमध्ये एक महत्वाची भूमिका बजावणार होता, पण स्वतः त्यालाही त्या वेळी याची कल्पना नसावी. 

१९४२ ते १९४४ दरम्यान "भारत छोडो" आणि "करो या मरो" या गांधीजींच्या घोषणांमुळे संबंध भारतभरात असंतोष धुमसत होता. ब्रिटिश साम्राज्याची भारतावरची पकड हळूहळू ढिली होत चालली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला भारत सोडावा लागणार हे त्यांना दिसू लागले होते. पण, तसे झाले तरी, ब्रिटिश साम्राज्याचे कमीतकमी नुकसान आणि अधिकाधिक फायदा कसा होईल याबद्दलचे विचार, ब्रिटिश साम्राज्याचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या काही लोकांच्या डोक्यात घोळत होते. त्यापैकी एक म्हणजे, १९४५ पर्यंत इंग्लंडचे पंतप्रधान असलेले विन्स्टन चर्चिल, आणि दुसरे, युद्धकाळात पंतप्रधान चर्चिल यांचे लष्करी सल्लागार राहिलेले लॉर्ड हेस्टिंग्स इस्मे (उर्फ 'पग' इस्मे). 

२२ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हॉईसरॉय म्हणून भारतात आले. त्यांच्या प्रशासनिक विभागाचे प्रमुख (Chief of Staff) म्हणून लॉर्ड 'पग' इस्मे  यांची नेमणूक होण्यामध्ये चर्चिल यांचा काही हात असेल का? हे आज सांगता येणे अवघड आहे, परंतु, 'पग' इस्मे  यांची पुढील काळातील वर्तणूक पाहता तशी शंका यायला वाव राहतो.  

दरम्यान, महाराजा हरिसिंगाच्या दरबारातही काही छुपे डावपेच खेळले जात होते. जून १९४५ नंतरची दोन वर्षे, पंडित रामचंद्र काक हे काश्मीरचे पंतप्रधान होते. पंतप्रधान काक, काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक रिचर्ड पॉवेल आणि काश्मीरच्या सेनादलाचे प्रमुख मेजर जनरल स्कॉट या तिघांवर राजाचा पूर्ण विश्वास होता. परंतु, त्या तिघांनीही पुढे राजाचा विश्वासघात केला. त्यांची खेळी राजाच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता.

१९४६ साली शेख अब्दुल्लांनी "काश्मीर छोडो" आंदोलन सुरु केले तेंव्हा, पंतप्रधान काक यांच्या सल्ल्यानुसार, राजाने शेख अब्दुल्लांना अटक केली होती. पंडित नेहरू व काँग्रेससोबत शेख अब्दुल्लांचे घनिष्ठ संबंध, तसेच, काश्मीरच्या जनतेमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता, पंतप्रधान रामचंद्र काक यांच्या डोळ्यात नेहमीच खुपत होती. काश्मीर राज्य भारतात विलीन होण्यासाठी पंडित नेहरू, गांधीजी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी चालवलेले प्रयत्नही रामचंद्र काक यांना खटकत होते. काही अनाकलनीय कारणांमुळे, काश्मीर पाकिस्तानात विलीन व्हावे असे त्यांना वाटत होते व त्यांचे प्रयत्नही त्याच दिशेने चालू होते. त्यांची पत्नी एक ब्रिटिश महिला होती, हे तर त्यामागचे कारण नसेल?

भारत सोडावा लागला तरीही, गिलगिट प्रदेशावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ब्रिटिश साम्राज्याचेच वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्नशील असलेले आणखी एक इंग्रज साहेब होते. त्यांचे नाव होते सर जॉर्ज कनिंगहॅम. १९३९ ते १९४६ या काळात ते वायव्य सरहद्द प्रांताच्या गव्हर्नरपदी राहिलेले होते. (१५ ऑगस्ट १९४७ नंतर कनिंगहॅमसाहेबांना जिन्नांनी इंग्लंडहून बोलावून घेतले आणि त्यांना तिसऱ्यांदा वायव्य सरहद्द प्रांताचे गव्हर्नर केले ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.)   

१९४६ साली वायव्य सरहद्द प्रांताच्या गव्हर्नरपदावरून पायउतार होण्यापूर्वी कनिंगहॅमसाहेबांनी, त्यांचा एक विश्वासू सेनाधिकारी, लेफ्टनंट कर्नल रॉजर बेकन याची शिफारस गिलगिटच्या राजकीय प्रतिनिधीपदासाठी केली. गिलगिट एजन्सीमधील जनता आणि तेथील राजे व नवाब यांना ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रवृत्त करण्यामध्ये लेफ्टनंट कर्नल रॉजर बेकन व त्याचा सहाय्यक राजकीय प्रतिनिधी,  कॅप्टन ब्राऊन, यांनी मोठी भूमिका बजावली. काश्मीर राज्य भारतात विलीन होण्याची शक्यता निर्माण झाल्यास गिलगिट एजन्सीला काश्मीरपासून विभक्त करता यावे यासाठीची ही व्यूहरचना होती. 

अशी वदंता आहे की, सर जॉर्ज कनिंगहॅम १९४६ साली इंग्लंडला परतल्यानंतर, सर विन्स्टन चर्चिल व लॉर्ड 'पग' इस्मे यांच्यासोबत त्यांची अनेक वेळा खलबते झाली. कदाचित, भारताच्या फाळणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सर सिरिल रॅडक्लिफ यांची नियुक्ति होण्याच्या एक वर्ष अगोदरच काश्मीरच्या फाळणीचे कारस्थान रचले गेले असावे.

१७ जून १९४७ रोजी लेडी माउंटबॅटनसह लॉर्ड माउंटबॅटन काश्मीर दौऱ्यावर आले. त्यांच्यासोबत त्यांचे प्रशासनिक प्रमुख, लॉर्ड 'पग' इस्मे हेदेखील होते. अर्थातच, फाळणी व स्वातंत्र्यानंतर, काश्मीरचे भवितव्य काय असावे, यासंबंधी चर्चा करण्याचा विचार प्रामुख्याने त्या सर्वांच्या मनात होता. हरिसिंगांच्या दृष्टीने, लॉर्ड माउंटबॅटन हे केवळ नेहरूंचे दूत होते. काश्मीरच्या भारतामध्ये विलीनीकरणासाठी आपल्याला आग्रह होणार हे जाणून, महाराजा हरिसिंगाने त्यांच्यासोबत चर्चा करण्याचेच टाळले. 

परंतु, लॉर्ड 'पग' इस्मे मात्र आल्यापासून भेटीगाठींमध्ये व्यग्र होते. राज्याचे सेनाप्रमुख, मेजर जनरल स्कॉट यांच्यासोबत तर त्यांची खलबते झालीच, पण गिलगिट एजेन्सीचे राजकीय प्रतिनिधी कर्नल रॉजर बेकन, हेही त्यांना येऊन भेटले. उर्दू व पंजाबी या दोन्ही भाषा अस्खलितपणे बोलणाऱ्या लॉर्ड 'पग' इस्मे यांनी राजासोबत पंजाबीत आणि पंतप्रधान काक यांच्याशी उर्दूमध्ये संवाद साधला. अर्थातच, त्यातले अवाक्षरही लॉर्ड माउंटबॅटनना समजले नसणार. 

१५ ऑगस्टनंतर ब्रिटिशांनी काश्मिरसोबत केलेला 'गिलगिट भाडेपट्टा करार' संपुष्टात येणार होता. त्यानंतर 'गिलगिट स्काउट्स' चे नेतृत्व ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून कोणाच्या हाती जाणार? हिंदू अधिकाऱ्यांचे नेतृत्व मुसलमान सैनिकांना मान्य होईल का? अचानक काश्मीरमध्ये मुस्लिम अधिकारी कुठून आणायचे? अशा सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने, लॉर्ड 'पग' इस्मे यांनी आपल्या भेटींमध्ये निश्चितच विचारविनिमय केला असणार.

या भेटीनंतर लगेच, म्हणजे जुलै १९४७ मध्ये, पंतप्रधान काक व राज्याचे सेनाप्रमुख, मेजर जनरल स्कॉट यांच्या मदतीने कर्नल रॉजर बेकन यांनी महाराजांपुढे एक प्रस्ताव मांडला. १५ ऑगस्टनंतर, पर्यायी व्यवस्था म्हणून,  'गिलगिट स्काउट्स' चे कमांडंट व डेप्युटी कमांडंट म्हणून दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांचीच नेमणूक करावी, मात्र त्याआधी त्या अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन ब्रिटिश सेनेतून बाहेर पडावे, अशी ती योजना होती. त्या अधिकाऱ्यांवर पुढे जी छुपी कामगिरी सोपवण्यात येणार होती त्याचा संबंध दूरान्वयानेदेखील कोणी ब्रिटिश सरकारसोबत जोडू नये, यासाठी घेतली गेलेली ही खबरदारी होती! 

'गिलगिट स्काउट्स' च्या कमांडंटपदी कोणाची नेमणूक करायची हे कर्नल रॉजर बेकन यांच्या डोक्यात पक्के होते. त्यांचा जुना साहाय्यक राजकीय प्रतिनिधी मेजर विल्यम ब्राऊन, त्या वेळी वायव्य सरहद्द प्रांतातील 'तोची स्काउट्स' मध्ये ड्यूटी बजावत होता. त्याच्यापेक्षा अधिक सक्षम व्यक्ती कर्नल रॉजर बेकनना शोधूनही सापडली नसती.

ब्रिटिश सैन्यातून राजीनामा देऊन, २९ जुलै १९४७ ला मेजर विल्यम ब्राऊन गिलगिटमध्ये दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी, पुनियालचा राजा, कोह-ए-खिज्र चा राज्यपाल, चित्रालचा राजा मुझफ्फर-उल-मुल्क, आणि यासिनचा राजा मेहबूब यांच्यासोबत मेजर ब्राऊनने बैठका घेतल्या. १५ ऑगस्टनंतर जर काश्मीरच्या राजाने भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला, तर 'ऑपरेशन दत्ता खेल' अमलात आणण्याची संपूर्ण योजना मेजर ब्राऊनने त्यांना समजावून दिली.

१५ ऑगस्टनंतरही महाराजा हरिसिंगाने काश्मीर राज्य भारतात अथवा पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र, जम्मू प्रदेश, काश्मीर खोरे आणि गिलगिट एजेन्सी या तिन्ही प्रदेशांचे भवितव्य ठरवण्यासाठी 'ऑपरेशन गुलमर्ग' आणि 'ऑपरेशन दत्ता खेल' या ब्रिटिशांनी व पाकिस्तान्यांनी आखलेल्या योजना जय्यत तयार होत्या!

पुढील तीन महिन्यांत काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत गेली आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अचानक काश्मीरवर आकाश कोसळले... 

 
(क्रमशः)
(भाग १ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग ११

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग १० नंतर पुढे चालू...)

ऑगस्ट १९४७ च्या सुरुवातीपासूनच जम्मू प्रदेशाच्या काही भागांत पेटलेल्या विद्रोहाला धगधगत ठेवण्याबरोबरच संपूर्ण जम्मू-काश्मीर घशात घालण्याचा विचार पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांच्या मनात घोळत होता.


भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्वतंत्र झाले तरी, ते 'ब्रिटिश कॉमनवेल्थ' मध्येच राहणार होते. त्यामुळे, दोन्ही देशांच्या भवितव्यामध्ये  ब्रिटिश साम्राज्याला रस होता. साम्यवाद आणि इस्लाम धर्म या दोघांमध्ये मूळ वैचारिक भिन्नता असल्याने, साम्यवादाचा प्रसार रोखण्यासाठी, ब्रिटिशांच्या दृष्टीने, इस्लाम हे एक प्रभावी अस्त्र होते. लोकतांत्रिक भारत व कम्युनिस्ट रशिया यांच्यादरम्यान एका इस्लामी राष्ट्राची पाचर मारण्याची त्यांची इच्छा असल्यास नवल नव्हते. दुसरी बाब अशी होती की, काश्मीर राज्यात जाण्या-येण्याचे सर्व हमरस्ते पाकिस्तानातूनच असल्याने, काश्मीरलगत असलेल्या रशिया व चीनच्या सीमांकडे पाकिस्तानातून जाणेच अधिक सोयिस्कर होते.   

काश्मीर राज्य भारतामध्ये विलीन व्हावे अशी भारतीय नेतृत्त्वाची इच्छा होती. पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीसोबत असलेले काश्मीरचे नाते लक्षात घेऊन, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी, काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी प्रयत्न चालवलेले होतेच. त्याशिवाय, काश्मीर ही तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कुटुंबाची मातृभूमी होती. त्यामुळे,  भारत सरकारकडूनही शिष्टाई चालू होती. तरीदेखील, कोणत्याही स्वरूपाचा प्रत्यक्ष दबाव काश्मीरवर टाकण्याचा प्रयत्न भारताने कधीच केला नाही. 

तसे पाहता, काश्मीर पाकिस्तानात विलीन होणे, हे ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने फायद्याचे होते. परंतु, ब्रिटिश सरकारने, आणि विशेषतः लॉर्ड माउंटबॅटन यांनी, उघडपणे तशी भूमिका कधीच घेतलेली नव्हती.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात एक मोठी आणि अतिशय गुप्त योजना आखली गेली. जेंव्हा ती योजना प्रत्यक्षात कागदावर उतरली त्याचवेळी ते गुपित एक भारतीय व्यक्तीला समजले होते. पण तरीदेखील भारत सरकारला त्या माहितीचा फायदा मिळाला नाही हे मोठेच दुर्दैव म्हणावे लागेल.

ब्रिटिश भारतीय सेनेच्या एका ब्रिगेडचे मुख्यालय वायव्य सरहद्द प्रांतातील बन्नू या शहरात होते. त्या कार्यालयात 'ब्रिगेड मेजर' या पदावर असलेले एक शीख अधिकारी, मेजर ओंकार सिंग कालकट, हे २० ऑगस्ट १९४७ रोजी, त्यांच्यासमोर आलेले टपाल पाहत होते. ब्रिगेडचे ब्रिटिश कमांडर, ब्रिगेडियर सी. पी. मर्री हे चार दिवसांच्या रजेवर गेलेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत सर्व डाक उघडून पाहण्याची जबाबदारी, आणि तसा अधिकारही मेजर कालकट यांना मिळालेला होता. 

ब्रिगेडियर सी. पी. मर्री यांच्या नावे आलेल्या एका पाकिटावर लिहिले होते, "Personal /Top  Secret". पाकिटामध्ये एक पत्र आणि त्याला जोडलेले एक परिशिष्ट होते. पत्राचा विषय होता, "ऑपरेशन गुलमर्ग", आणि परिशिष्टामध्ये, त्या योजनेचा सविस्तर तपशील लिहिलेला होता. मेजर कालकट यांनी तो सर्व तपशील वाचला आणि जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, "ऑपरेशन गुलमर्ग" काश्मीरमध्ये होणार होते, आणि ते सुरु करण्याची तारीख ठरली होती - २२ ऑक्टोबर १९४७. त्या पत्राखाली सही होती, 'जनरल फ्रॅंक वॉल्टर मेसर्व्ही, पाकिस्तानी सरसेनाध्यक्ष'! 
[संदर्भ:" The Far Flung Frontiers", पृष्ठसंख्या २९, लेखक: मेजर जनरल ओंकार सिंग कालकट(सेवानिवृत्त)] 

मेजर कालकट यांनी ब्रिगेडियर सी. पी. मर्री यांना तातडीने फोन करून मुख्यालयात येण्याची विनंती केली. दुसऱ्याच दिवशी सकाळी ब्रिगेडियर मर्री येऊन पोहोचले आणि त्यांनी "ऑपरेशन गुलमर्ग"चा सर्व तपशील वाचला. तेदेखील काही काळ हतबुद्ध होऊन बसून राहिले. परंतु, काही क्षणातच त्यांनी मेजर कालकट यांना ताकीद दिली की, याविषयी कोणाजवळही 'ब्र'देखील काढायचा नाही. 

भारत व पाकिस्तान स्वतंत्र झालेले असले तरी, पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातून भारतात जाण्याचे आदेश मेजर कालकट यांना अजून मिळालेले नव्हते. शिवाय, मेजर कालकट यांनी एखादे गुप्त पत्र वाचले असल्याचे जर कोणा पाकिस्तानी अधिकाऱ्याला समजले असते तर त्यांना भारतात जिवंत परतणे अशक्य होणार होते. बन्नू येथील किल्ल्यामध्ये असलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये, पत्नी व लहान मुलासह राहणाऱ्या मेजर कालकट यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना आली!

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ब्रिगेडियर सी. पी. मर्री इंग्लंडला परत गेले व एका पाकिस्तानी ब्रिगेडियरने तेथील कार्यभार हाती घेतला. मेजर कालकट यांनीही ५ सप्टेंबर १९४७ रोजी मेजर मोहम्मद हयात यांना आपला पदभार सोपवला आणि ते भारतात येण्याच्या तयारीला लागले. परंतु, या ना त्या कारणाने त्यांचे जाणे लांबत गेले. 

काही दिवसातच, मेजर कालकट यांना, त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षेचे कारण सांगून त्यांच्या घरावर पहारा बसवला गेला. एक नवीन ऑर्डर्ली त्यांचा मदतनीस म्हणून घरात ठेवला गेला. तो ऑर्डर्ली प्रत्यक्षात पाकिस्तानी सेनेच्या गुप्तहेर खात्यातील जवान असल्याचे, आणि आपण नजरकैद झालो असल्याचे समजायला मेजर कालकट यांना वेळ लागला नाही! 

ब्रिगेडियर सी. पी. मर्री यांच्या नावे आलेले एक गुप्त पत्र मेजर कालकट यांनी वाचले असल्याचा सुगावा ब्रिगेड मुख्यालयातील हेड क्लार्कला लागलेला होता. त्यानेच वरिष्ठांना ती खबर पोचवली होती. 

२१ सप्टेंबरला, आपल्या बायको-मुलासह, मेजर कालकट कसेबसे बन्नूच्या किल्ल्यातील नजरकैदेतून निसटले व भारताच्या सीमेजवळ पोचले. तेथे जवळजवळ १५०० भारतीय सैनिक व अधिकारी पाकिस्तानातून भारतात पाठवले जाण्याची वाट पाहत होते. तेथे ते सगळेजण सुरक्षित होते, पण शक्य असेल तोवर, मेजर कालकटना तेथेच अडकवून ठेवण्याचे, आणि गुप्त पहाऱ्याखाली ठेवण्याचे आदेश तेथील पाकिस्तानी अधिकाऱ्यांना मिळालेले होते. अखेर, मेजर कालकट यांनी एका पाकिस्तानी मुलकी अधिकाऱ्याच्या मदतीने, आपल्या बायको-मुलाला भारतात रवाना केले आणि पाठोपाठ स्वतःचीही सुटका करून घेतली. 

भारतात पोचल्यानंतर, बायको-मुलाला भेटण्याचा विचारही मेजर कालकटच्या मनाला शिवला नाही. अंबाल्याला पोहोचताच, अक्षरशः एका मालगाडीतून प्रवास करत त्यांनी दिल्लीकडे धाव घेतली. १९ ऑक्टोबरच्या सकाळी सेना मुख्यालयात जाऊन त्यांनी तत्कालीन डायरेक्टर मिलिटरी ऑपरेशन्स (DMO), ब्रिगेडियर प्राणनाथ थापर यांना त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती दिली. 'ऑपरेशन गुलमर्ग' सुरु होण्यासाठी आता फक्त ७२ तास उरलेले होते! 

मेजर कालकटनी सांगितलेल्या माहितीवर ब्रिगेडियर थापर यांचा विश्वास बसला नाही. तरीही ते त्यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, आणि नंतर संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग यांच्याकडे घेऊन गेले. भारतीय सेनेच्या गुप्तचर खात्याचे काही ब्रिटिश अधिकारीही तेथे उपस्थित होते. मेजर कालकटना अनेक उलट-सुलट प्रश्न विचारले गेले. पण अखेर, त्या अधिकाऱ्यांना मेजर कालकट यांची खबर केवळ एक अतिरंजित कहाणीच वाटली. जीवावर उदार होऊन आपण पोहोचवलेली माहिती गांभीर्याने घेतली जात नसल्याचे पाहून मेजर कालकट उद्विग्न झाले. तेथून निघताच त्यांनी आपल्या बायको-मुलाचा शोध घेण्यासाठी आधी अंबाला व नंतर अमृतसर गाठले.
   
ठरल्याप्रमाणे, २२ ऑक्टोबरला 'ऑपरेशन गुलमर्ग' सुरु झाले. त्याची कुणकुण दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर तेथील यंत्रणा जागी झाली. मेजर कालकटना अमृतसरमध्ये शोधून, तातडीने दिल्लीला आणून, २४ ऑक्टोबर १९४७ रोजी, पंडित नेहरूंसमोर उभे केले गेले. संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंग आणि आणि ब्रिगेडियर प्राणनाथ थापरही तेथे उपस्थित होते. पंधरा मिनिटे मेजर कालकट बोलत होते आणि पंतप्रधान ऐकत होते. सगळे काही ऐकून होईपर्यंत पंडितजी रागाने लालबुंद झाले होते. दोन दिवसांपूर्वी हीच माहिती ऐकूनदेखील, पंतप्रधानांना न कळवल्याबद्दल त्यांनी संरक्षणमंत्री आणि DMO या दोघांना नुसते फैलावरच घेतले नाही तर, त्वेषाने दोन काचेचे पेपरवेट त्या दोघांच्या दिशेने भिरकावले! 
[संदर्भ:" The Far Flung Frontiers", पृष्ठसंख्या ३७, लेखक: मेजर जनरल ओंकार सिंग कालकट(सेवानिवृत्त)]

पंडितजींचे हे रौद्र रूप पाहून, संरक्षणमंत्री, DMO, आणि स्वतः मेजर कालकट, या तिघांचाही अक्षरशः थरकाप उडाला होता. परंतु, झाल्या प्रकारची कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देऊन मेजर कालकटना तेथून निघून जाण्यास सांगितले गेले. (पुढे १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये भाग घेतल्यानंतर, १९७२ साली मेजर जनरल पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली)

काश्मीरमध्ये २२ ऑक्टोबर १९४७ रोजी सुरु होणाऱ्या एका छुप्या कारवाईबद्दलची माहिती दोन महिने अगोदरच एका भारतीय सेनाधिकाऱ्याच्या हाती येऊनदेखील, त्याची खबर भारतीय पंतप्रधानांपर्यंत पोहोचायला २४ ऑक्टोबर उजाडला होता! याहून मोठे दुर्दैव काय असेल?

मेजर कालकटनी आपल्या समरणशक्तीनुसार, 'ऑपरेशन गुलमर्ग' संबंधी जनरल मेसेर्व्ही यांच्या आदेशातील प्रमुख मुद्दे पंडितजींना सांगितले होते. ते खालीलप्रमाणे : -

१. वायव्य सरहद्द प्रांतातील प्रत्येक पठाण टोळीने किमान १००० पुरुषांचे एक-एक 'लष्कर' उभे करावे. बन्नू, वाना, पेशावर, कोहाट, थाल, आणि नौशहरा या सहा ठिकाणी ही 'लष्करे' सप्टेंबर १९४७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा व्हावीत.
 
२. वरील सहा ठिकाणी असलेल्या पाकिस्तानी सेनेच्या ब्रिगेडियरनी आपल्या अखत्यारीतील बटालियन्स मधून या लष्कराला हत्यारे पुरवावीत. याविषयी संपूर्ण गुप्तता पाळावी आणि हे सर्व काम रात्रीच्या अंधारातच केले जावे.

३. प्रत्येक 'लष्करा'सोबत एक मेजर व एक कॅप्टन आणि सुभेदार हुद्द्यावरचे दहा अधिकारी नियुक्त केले जावेत. हे सर्व अधिकारी पठाण वंशाचे असावेत आणि पठाणी वेषातच कामगिरीवर जावेत. सैनिकी अधिकारी म्हणून त्यांची ओळख पटू शकेल असे कोणतेही चिन्ह त्यांनी त्यांच्या शरीरावर नसावे. प्रत्येक 'लष्करा'चा सरदार/मालिक हाच त्यांचा नेता असेल, परंतु, तो पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच काम करेल .

४. "जनरल तारिक" या टोपण  नावाने, पाकिस्तानी सेनेचे ब्रिगेडियर अकबर खान ही संपूर्ण मोहीम सांभाळतील आणि कर्नल शेरखान त्यांचे सहाय्यक अधिकारी असतील. 

५. सर्व 'लष्करे' १८ ऑक्टोबर १९४७ रोजी अबोटाबाद येथे एकत्रित होतील व त्यांना प्रवासी बसेसमधून त्यांच्या पुढील कामगिरीवर रवाना केले जाईल. 

६. सहा 'लष्करांची' मुख्य फौज मुझफ्फराबाद, डोमेल, उरी, बारामुल्ला मार्गे श्रीनगर विमानतळावर कब्जा करेल आणि पुढे बनिहाल खिंडीपर्यंत मुसंडी मारेल. 

७. दोन 'लष्करे' हाजीपीर खिंडीमार्गे गुलमर्गपर्यंत पोहोचतील, व मुख्य फौजेला उजव्या बाजूने संरक्षण देतील. त्याचप्रमाणे दोन 'लष्करे' टिथवालमार्गे नास्ताचुन खिंडीतून काश्मीर खोऱ्यात शिरतील आणि सोपोर, हंदवारा व बंदिपूर काबीज करतील.

८. दहा 'लष्करे' जम्मू प्रदेशात शिरतील आणि पूंछ, भिंबर, रावलकोट व राजौरी काबीज करून जम्मूपर्यंत धडक देतील. 'आझाद काश्मीर' मधील लोकांमधून निवडलेले खबरे/मार्गदर्शक या सर्व कामगिरीसाठी 'लष्करा'च्या सोबत राहतील. 

९. जम्मू-काश्मीर राज्याच्या सेनेमधून मुसलमान सैनिकांना फितवून, त्यांची एक 'आझाद सेना' उभी करण्याची जबाबदारी "जनरल तारिक" उर्फ ब्रिगेडियर अकबर खान यांच्यावर असेल. 

१०. हत्यारे, दारुगोळा, व इतर सामग्री १५ ऑक्टोबरपर्यंत अबोटाबाद येथे जमा केली जाईल आणि आगेकूच करणाऱ्या 'लष्करां'च्या पाठोपाठ पुढेपर्यंत पुरवली जाईल. 

११. पाकिस्तानी सेनेची सातवी इन्फंट्री डिव्हिजन युद्धाच्या तयारीनिशी २१ ऑक्टोबर रोजी मरी-अबोटाबाद भागात एकत्रित होऊन 'लष्करां'च्या पाठोपाठ कूच करेल आणि 'लष्करां'नी काबीज केलेली सर्व ठिकाणे ताब्यात घेईल. 

१२. 'ऑपरेशन गुलमर्ग' सुरु होण्याची तारीख २२ ऑक्टोबर १९४७ असेल. त्या दिवशी सर्व पठाण 'लष्करे' जम्मू-काश्मीर सीमा ओलांडून आपली कामगिरी सुरु करतील. 

जम्मू आणि काश्मीर प्रदेशांचे लचके तोडण्यासाठी, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मदतीने पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी इतकी पक्की योजना तयार करून ठेवलेली होती. आणि, काश्मिरी जनता तर नव्हेच, पण काश्मीरचा राजा व भारत सरकारदेखील या बाबतीत अंधारातच होते!

त्यावर कडी म्हणजे, गिलगिट प्रांतासंबंधी अतिसंवेदनशील असलेल्या बिलंदर ब्रिटिशांनी 'ऑपरेशन गुलमर्ग' शिवाय आणखी एक वेगळीच योजना बनवून ठेवलेली होती. काश्मीर राज्यातून गिलगिटचा लचका तोडण्याच्या त्या योजनेबद्दल काश्मीर किंवा भारतातील राज्यकर्त्यांनाच काय, पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांनाही नीटसा अंदाज येऊ शकलेला नव्हता.

त्या योजनेचे नाव होते, 'ऑपरेशन दत्ता खेल' ! 


(क्रमशः)
(भाग १२ पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १०

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग ९ नंतर पुढे चालू...)

१५ ऑगस्ट १९४७ पर्यंत राजा हरिसिंगाने विलीनीकरणाच्या दृष्टीने काहीच हालचाल केली नव्हती. 

जिन्नांकडून राजाला वरचेवर निरोप येत होते. "जर काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन झाले तर तेथील तुमची राजवट अबाधित राहील. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही..." वगैरे आश्वासने त्याला मिळत होती. पण, एका मुस्लिम राष्ट्रामध्ये, दुसरे मुस्लिम-बहुल राज्य विलीन झाल्यानंतर, त्या राज्याचा हिंदू राजा स्वतंत्रपणे व निर्धोकपणे राज्य करू शकेल यावर राजा हरिसिंगाचा अजिबात विश्वास नव्हता. तसेच दुसरीकडे, भारतात लोकतंत्र लागू झालेले असल्याने, काश्मीर भारतामध्ये विलीन झाल्यानंतर तेथे राजसत्ता राहिलीच नसती. राजा हरिसिंगाला मात्र, काहीही झाले तरी काश्मीरची सत्ता सोडायची नव्हती. 


अशा परिस्थितीत, १२ ऑगस्ट १९४७ रोजी, राजा हरिसिंगाने दोन्ही देशांसोबत तात्पुरते 'जैसे थे' करार (Stand-Still  Agreement) करण्याची इच्छा दर्शवली. पाकिस्तानने १५ ऑगस्टलाच तसा करार करून टाकला. पण भारताने मात्र काश्मीरसोबत 'जैसे थे' करार केला नाही. पाकिस्तानने याचा अर्थ सोयीस्करपणे असा लावला की कालांतराने काश्मीर पाकिस्तानातच विलीन होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी, जेंव्हा ब्रिटिश सरकारने भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना प्रत्यक्ष सत्ता हस्तांतरित केली, तेंव्हा हीच परिस्थिती कायम राहिली. 

ऑगस्ट १९४७ मध्ये जम्मूमधील व काश्मीर खोऱ्यातील बहुतेक सर्व मोठे राजकीय नेते तुरुंगात होते. पण, जनता बऱ्यापैकी जागरूक झालेली असल्याने राजाविरुद्ध रस्तोरस्ती विरोध दिसू लागला. जम्मू प्रदेशात जेंव्हा दंगे माजले तेंव्हा राजा हरिसिंगाचे धाबे दणाणले. त्याने जम्मूमध्ये 'मार्शल लॉ' लागू केला. परंतु, दंगे थोपवायला काश्मीर राज्याची सेना पुरेशी पडत नव्हती. इंग्रजांनी सत्ता सोडलेली असल्यामुळे, अतिरिक्त बंदोबस्तासाठी इंग्रज सेनाही उपलब्ध नव्हती. काश्मीर राज्याच्या सेनेमध्ये एकूण पायदळाच्या आठ बटालियन होत्या. तोफखाना किंवा रणगाडे अजिबात नव्हते. आणि वायुसेना असण्याचा तर प्रश्नच नव्हता. राजधानीमध्ये सैनिकांच्या एक-दोन छोट्या तुकड्या होत्या. पण राजाला जाता-येता सशस्त्र सलामी ठोकण्यापलीकडे ते काहीच काम करीत नव्हते. 

उत्तरेकडे गिलगिटपासून, दक्षिणेला जम्मू प्रांतातील सुचेतगढपर्यंत पसरलेली काश्मीर राज्याची एकूण सीमा सुमारे ५०० किलोमीटर लांबीची होती. इतक्या मोठ्या सीमेचे रक्षण करणे काश्मीर राज्याच्या सेनेला निव्वळ अशक्य होते. सेनेची एक-एक छोटी तुकडी, सीमेवरच्या एकेका ठाण्यावर तैनात केलेली होती. कोणत्याही दोन ठाण्यांमध्ये खूप अंतर असल्यामुळे, सीमेपलीकडून राज्यामध्ये घुसखोरी करणे सहज शक्य होते. जम्मूमध्ये विद्रोहाची आग भडकल्यानंतर, कोटली, भींबर, मीरपूर, पूंछ, मुझफ्फराबाद या भागांमध्ये पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होऊ लागली होती.  

१४-१५ ऑगस्टनंतर काश्मीरच्या विलीनीकरणासाठी पाकिस्तानचा दबाव वाढू लागला. काश्मीर राज्यातून बाहेर जाणारे सर्व मुख्य रस्ते पाकिस्तानात जात होते. याच रस्त्यांवरून सर्व व्यापारी वाहतूक होत असे.  राजा हरिसिंगाची कोंडी करण्यासाठी, पाकिस्तानने काश्मीरसोबत सुरु असलेला नियमित व्यापार थांबवला. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ लागल्याने काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या मनात राजाविरुद्धचा असंतोष अधिकच बळावला. दबावतंत्राचाच एक भाग म्हणून, मुस्लिम लीगचे मुखपत्र असलेल्या 'डॉन' या दैनिकाने २४ ऑगस्ट १९४७च्या अग्रलेखात म्हटले, "काश्मीरच्या राजाला कुणीतरी सांगायला हवे की, पाकिस्तानात विलीन होण्याची वेळ आता आली आहे. तसे न  केल्यास अतिशय गंभीर परिणाम काश्मीरला भोगावे लागू शकतील..."

काश्मीर पाकिस्तानात सामील झाल्याशिवाय पाकिस्तान देशाला पूर्णत्व येणार नाही ही धारणा, पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल, मोहम्मद अली जिन्नांच्या मनात पक्की घर करून होती. काश्मीरमध्ये बहुसंख्य नागरिक मुसलमान होते, हा तर मुख्य मुद्दा होताच, परंतु, जिन्नांच्या त्या धारणेला आणखी एक ऐतिहासिक कारणही होते. 

स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे एक प्रणेते, चौधरी रहमत अली यांनी, केम्ब्रिज विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत असताना, "Now or Never. Are  we  to live, or  perish  forever?" या शीर्षकाचे एक पत्रक लंडनमध्ये १९३३ साली प्रसिद्ध केले होते. त्या पत्रकात, प्रस्तावित मुस्लिम राष्ट्राचे नाव काय असावे, यावर त्यांनी भाष्य केले होते. Punjab, Afghania (वायव्य सरहद्द प्रांत), Kashmir, Sindh, आणि Baluchistan अशा उत्तरेकडच्या पाच मुस्लिम-बहुल प्रांतांच्या नावांतील अक्षरे वापरून, पाकस्तान (Pakstan) असा एक शब्द त्यांनी सुचवला होता. १९४० साली मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनामध्ये जिन्नांनी पाकिस्तान याच नावाच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली होती. परंतु, काश्मीर राज्य पाकिस्तानात सामील करून घेण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न सपशेल फसल्यामुळे जिन्ना कमालीचे अस्वस्थ होते. 

१५ ऑगस्ट १९४७ नंतरदेखील काश्मीर पाकिस्तानात सामील होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्याच सुमारास, काश्मीरच्या राजाच्या विरोधात पूंछमध्ये पेटलेल्या विद्रोहाचे नेते, सरदार अब्दुल कय्यूम खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान, आणि काही वरिष्ठ मंत्र्यांकडे मदतीची याचना करीत होते. जम्मू भागातील विद्रोह पेटता ठेवण्यासाठी सरकारी स्तरावर गुपचूपपणे मदत करण्यातही आली. परंतु केवळ जम्मूचा काही भाग नव्हे तर, संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य बळजबरीने ताब्यात घेऊन, कैद-ए-आझम जिन्नांची स्वप्नपूर्ती करण्याचा विचार पाकिस्तानातील वरिष्ठ नेत्यांच्या मनात घोळू लागला. 

काश्मीर हस्तगत करण्याकरता सैन्यबळाची गरज पडणार होती. पण, पाकिस्तानच्या सेनेवर अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांचेच वर्चस्व होते. त्या काळी, जनरल फ्रॅंक वॉल्टर मेसेर्व्ही हे पाकिस्तानचे सेनाध्यक्ष होते. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काश्मीरमध्ये कोणतीही मोठी व महत्वाकांक्षी योजना राबवणे अशक्य होते. प्रयत्नांती, तशी योजना बनवण्यात पाकिस्तानी नेत्यांना यश मिळाले. परंतु, त्या योजनेमधील ब्रिटिश सेनेचा सहभाग एका वेगळ्याच कारणामुळे शक्य झाला होता.  

ब्रिटिशांसाठी एकूणच काश्मीर राज्य, आणि विशेषतः त्यातील गिलगिट हा प्रदेश अत्यंत महत्वाचा होता. काश्मीरच्या उत्तरेकडे असलेल्या बलाढ्य रशियन साम्राज्याची धास्ती ब्रिटिशांनी घेतलेली होती. त्यामुळे, १८७७ पासूनच, गिलगिट प्रांतात आपल्या राजकीय प्रतिनिधीची नेमणूक ब्रिटिशांनी केलेली होती. १९३५ साली तर, काश्मीर राज्यासोबत साठ वर्षांचा भाडेपट्टा करार करून, ब्रिटिशांनी संपूर्ण गिलगिट प्रदेश आपल्या ताब्यातच घेतलेला होता. या प्रदेशाच्या सीमासुरक्षेसाठी 'गिलगिट स्काउट्स' नावाची एक सेना त्यांनी उभी केलेली होती. या सेनेमधले जवान तेथील स्थानिक लोकच होते, पण त्यांचे अधिपत्य ब्रिटिश सेनाधिकारी करीत असत. 'गिलगिट स्काउट्स' सेनेचा खर्च मात्र काश्मीरचा राजा करीत असे. बिलंदर ब्रिटिशांनी, तशी अट करारामध्येच घालून घेतलेली होती!    

ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांच्या मदतीने, पाकिस्तान सरकारने अमलात आणलेल्या त्या महत्वाकांक्षी योजनेमुळे, १९४७ सालानंतर काश्मीर राज्याचा भूगोल बदलला, आणि काश्मीरच्या दुःखद इतिहासात आणखी एक काळे पान जोडले गेले. काश्मीरच्या राजाचे मीठ खाल्लेल्या गिलगिट स्काउट्स पलटणीने या योजनेत काश्मीरविरुद्ध मोठी निर्णायक भूमिका बजावली.  

काय होती ती भूमिका? आणि नेमकी कशी होती ती महत्वाकांक्षी योजना? 




(क्रमशः)
(भाग ११ पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग ९

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग ८ नंतर पुढे चालू...)

१५ ऑगस्ट १९४७ पर्यंत हैद्राबाद, जुनागढ व काश्मीर ही तीन राज्ये वगळता इतर सर्व संस्थानांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. 

काश्मीरचे नेमके काय झाले, हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी फक्त काश्मीर खोऱ्याच्याच नव्हे तर, जम्मू प्रदेशाच्या राजकीय इतिहासावरही धावती नजर टाकावी लागेल.

महाराजा रणजितसिंगने जम्मूचे राज्य १८२० साली राजा गुलाबसिंगला बक्षीस दिले होते. त्यासोबतच, त्याचा धाकटा भाऊ राजा ध्यानसिंग यालाही सुमारे ३६०० चौरस मैलांचा एक आयताकृती पट्टा बक्षीस दिला होता. पूर्वेकडे पीरपंजाल पर्वतराजींची शिखरे, पश्चिमेकडे झेलम नदीचे पात्र, उत्तरेकडे झेलम व किशनगंगा नद्यांचा संगम, आणि दक्षिणेकडे चेनाब नदीचे पात्र, अशी या पट्ट्याची व्याप्ती होती. त्या पट्ट्यात पूंछ, भींबर, मीरपूर, मुझफ्फराबाद अशी महत्वाची गावे होती. [आजच्या काळातला पाकव्याप्त जम्मू, ज्याला तेथील स्थानिक व पाकिस्तानी लोक "आझाद काश्मीर" म्हणतात, तो हाच प्रदेश!]

या प्रदेशातील बहुसंख्य लोक मुसलमान होते. १८४६ नंतर ही स्वतंत्र जहागीर जम्मू-काश्मीर राज्यात सामील झाली. परंतु, तेथे स्थानिक जहागीरदाराचेच वर्चस्व अधिक राहिले. १८२० पासून पुढील सव्वाशे वर्षांमध्ये वेळोवेळी, जम्मू-काश्मीरचा राजा व त्याच्या अधिकाऱ्यांकडून, करवसुली किंवा अन्य कारणांनी, या प्रदेशातील जनतेवर जबरदस्ती होत राहिली. त्यामुळे, स्थानिक रहिवाश्यांच्या दृष्टीने हिंदू डोग्रा राजवट हे जुलमाचे प्रतीकच राहिले. त्या मानाने, तेथील जहागीरदार हा त्याच हिंदू डोग्रा राजाच्या चुलत घराण्याचा वारस असूनही, त्याला जनतेमध्ये मान होता. 

जम्मू-काश्मीरचा तिसरा राजा प्रताप सिंग याच्या राज्याभिषेकापासूनच ब्रिटिशांनी जम्मू-काश्मीर दरबारामध्ये रेसिडेंट नेमून, राज्यावरचे आपले नियंत्रण वाढवले होते. काही वर्षे तर, प्रतापसिंगला पदच्युत करून, त्याचा धाकटा भाऊ अमरसिंग (हरिसिंगाचे वडील) व ब्रिटिश रेसिडेंट या दोघांच्या समितीने राज्यकारभार सांभाळला होता. प्रतापसिंगला मुलगा नव्हता. आपल्या पश्चात, स्वतःचा चुलत-चुलत भाऊ व पूंछ जहागिरीचा राजा जगतदेव सिंग याने जम्मू-काश्मीरच्या राजगादीवर बसावे अशी प्रतापसिंगची इच्छा होती. तसा दैवी दृष्टांतच आपल्याला झाला असल्याचा दावा त्याने केला होता. परंतु, ब्रिटिशांनी, 'त्यांच्या ऐकण्यातला' राजा गादीवर बसवण्याच्या उद्देशाने, अमरसिंगचा मुलगा हरिसिंग याला गादीवर बसवले. 

पूंछच्या जहागीरदाराला मिळू शकणारा राजगादीचा अधिकार हिरावून घेणाऱ्या राजा हरिसिंगावर, पुंछी जनतेचा रोष ओढवला होताच. राजा हरिसिंगानेही गादीवर बसल्या-बसल्या पूंछच्या जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली. विशेषतः १९३६ ते १९४० या काळात राजा हरिसिंगाने येथील स्थानिक लोकांची सेना कमी केली आणि या भागात शीख आणि डोग्रा सैनिकांची एक पलटण तैनात केली. त्या पलटणीच्या खर्चाच्या निमित्ताने, राजाने येथील जनतेवर कराचा बोजा वाढवला आणि सक्तीने करवसुली सुरू केली. 

१९४० साली पूंछचा जहागीरदार, राजा जगतदेव सिंग याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात, त्याच्या अल्पवयीन मुलाला जहागिरीचा वारस मानण्यास राजा हरिसिंगाने नकार दिला आणि पूंछ जहागिरीचा सर्व कारभार स्वतःच्या हाती घेतला. पुंछी जनतेला इंग्रज सरकारकडे तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण, दुसऱ्या महायुद्धात व्यग्र असलेल्या इंग्रज सरकारच्या कानी, येथील जनतेचे गाऱ्हाणे पडणे अवघडच होते. त्यामुळे, स्थानिक लोकांचा राजा हरिसिंगावर असलेला राग शिगेला पोचला. 

त्याच सुमारास जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय चळवळ जोर धरू लागली होती. चौधरी गुलाम अब्बास हे येथील प्रमुख राजकीय नेते १९३२ पासून शेख अब्दुल्लांच्या पक्षात होते. पण १९४१ नंतर त्यांनी स्वतः पुनरुज्जीवित केलेल्या 'जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षाने या भागात आपला जम बसवून 'मुस्लिम लीग' च्या जोडीने पाकिस्तानच्या स्थापनेला पाठिंबा दिला होता. 

शेतीकामाशिवाय, सैनिकी सेवा हा पूंछमधील लोकांचा परंपरागत व्यवसाय होता. या प्रदेशातून हजारो सैनिक पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांतर्फे लढले होते. दुसऱ्या महायुद्धात लढलेले बरेच सैनिक १९४५ नंतर आपापल्या गावी परतले. त्यामध्ये, ब्रिटिश सैन्यात अधिकारीपदावर काम केलेले, आणि सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेनेचे' काही माजी अधिकारीही होते. त्यांनी पूंछमधील जनतेचे हाल पाहिले. राजाविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची कल्पना हळूहळू त्यांच्या मनांमध्ये मूळ धरू लागली. अर्थात, मुस्लिम लीगसोबत हातमिळवणी केलेल्या 'जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षाने या क्रांतिकारी विचारांना खतपाणी घातलेच. 

जून १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याची अधिकृत घोषणा झाली त्याच सुमारास पूंछ भागात अराजक माजले. लोकांनी राजा हरिसिंगाच्या वसुली अधिकाऱ्यांना कर देण्यास नकार द्यायला सुरुवात केली. पूंछमधील एक तरुण वकील व जमीनदार, सरदार अब्दुल कय्यूम खान, यांनी जनतेच्या या लढ्याचे अनौपचारिक नेतृत्व स्वीकारले. जुलै महिन्यात पूंछमधील लोकांचा जोर वाढत गेला, आणि १४-१५ ऑगस्टपर्यंत भींबर, मीरपूर, मुझफ्फराबाद, या भागातील जनतेनेही राजाविरुद्ध उठाव सुरु केला. या भागालगतच, पण झेलम नदीच्या पलीकडच्या तीरावर रावळपिंडी (पश्चिम पंजाब राज्य), आणि हझारा (वायव्य सरहद्द प्रांत) हे दोन जिल्हे होते. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर हे दोन्ही जिल्हे पाकिस्तानमध्ये सामील झाले होते. 

झेलमच्या दोन्ही तीरावरचे लोक वांशिकदृष्ट्या एकसमान असल्याने, अनेक पिढ्यांपासून त्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध व रोटी-बेटी व्यवहार होते. त्यामुळे, पाकिस्तानात गेलेल्या त्या दोन्ही जिल्ह्यांमधील मुस्लिम जनतेचा सक्रिय पाठिंबा पूंछमधील क्रांतिकारकांना मिळू लागला. सरदार अब्दुल कय्यूम खान आणि त्यांचे काही सहकारी भूमिगत झाले होते. तेथूनच ते पूंछ आणि आसपासच्या प्रदेशामधील उठावाचे नेतृत्व करीत होते. तुरळक प्रमाणात सुरु झालेल्या राजाविरोधी दंग्यांना त्यांनी स्वतंत्र प्रांतासाठी, म्हणजेच 'आझाद काश्मीर' साठीच्या बंडाचे स्वरूप दिले होते. उठावाची व्याप्ती वाढल्यामुळे, राजाचे सैन्य पुरेसे पडत नव्हते आणि स्थिती त्यांच्या हाताबाहेर जाऊ लागली होती.

देशाच्या फाळणीमुळे हिंदू-मुस्लिम वाद सर्वत्र धगधगू लागलेला होता. त्यामुळेच, पूंछमधील लढा मुळात राजाविरुद्ध सुरु झाला असला तरी, आता त्या उठावाची झळ स्थानिक हिंदू व शीख लोकांनाही बसू लागली. सप्टेंबर १९४७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूंछमधील सुमारे ६०००० हिंदू-शीख निर्वासित लोक जम्मूच्या दिशेने पळाले. त्या वेळी  पाकिस्तानच्या पश्चिम पंजाब प्रांतातून येणारे हिंदू निर्वासितही जम्मू भागात येत होतेच. या सर्व स्थलांतरित व्हावे लागलेल्या हिंदू-शीख लोकांनी जम्मूमधील स्थानिक मुसलमानांवर आपला राग काढला, आणि तेथील मुसलमानांची पाकिस्तानकडे पळापळ सुरु झाली. 

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात, स्वतः अब्दुल कय्यूम खान पाकिस्तानात जाऊन तेथून मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान आणि 'निर्वासित पुनर्वसन' खात्याचे मंत्री, मियाँ इफ्तिखारुद्दीन यांना मदतीसाठी गळ घातली. इफ्तिखारुद्दीन यांनी पाकिस्तानी सेनेचे एक कर्नल (पुढे निवृत्त मेजर जनरल) अकबर खान यांना हाताशी घेतले, व एक महत्वाकांक्षी योजना बनवण्यास सांगितले. त्यानुसार, पंजाब पोलिसांच्या ४००० बंदुका आणि वायव्य सरहद्द प्रांताच्या डोंगराळ प्रदेशातील टोळीवाल्यांच्या काही तुकड्या पाकिस्तानकडून तथाकथित 'आझाद काश्मीर' बंडखोरांना अनौपचारिकपणे दिल्या गेल्या. पाकिस्तानच्या या योजनेचा तात्पुरता उद्देश, पूंछमधील बंडखोरांना मदत देण्यापुरताच जरी असला तरी, ही छुपी योजना लवकरच आणखी व्यापक स्वरूप धारण करणार होती.  

१९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात, जम्मूपाठोपाठ काश्मीर खोऱ्यातदेखील एक वादळ येऊ घातले होते... 

(क्रमशः)
(भाग १० पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)