मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

पोलिसांची कार्यतत्परता

माझ्या सासऱ्यांच्या नावे असलेली काही शेअर सर्टिफिकेट्स गहाळ झाली होती. संबंधित कंपनीच्या प्रक्रियेनुसार, स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवणे भाग होते.


माझ्या सासऱ्यांचे वास्तव्य सध्या आमच्याकडे पुण्यामध्ये असले तरी, त्यांच्या सोलापुरातील घराजवळच्या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी १०-१२ दिवसांपूर्वी मी गेलो.

कंपनीच्या सूचनांप्रमाणे, पोलिसात दाखल केलेली तक्रार इंग्रजीमध्येच असायला हवी होती. स्थानिक भाषेत असल्यास त्याचे इंग्रजी भाषांतर नोटरीद्वारे सत्यापित केलेले असावे असाही नियम होता. माझ्या सासऱ्यांची सही असलेली इंग्रजीमध्ये लिहिलेली तक्रार मी सोबत नेली होती. 

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अंमलदार, सब-इन्स्पेक्टर श्री. जाधव यांनी तक्रार वाचून घेतली. ते म्हणाले की तक्रार मराठीतच दाखल केली जाईल, आणि त्यावर सही करण्यासाठी मूळ तक्रारदाराला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावे लागेल. मी  सासऱ्यांना घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. 

नव्वद वर्षांचे माझे सासरे, श्री. श्रीकृष्ण गोडबोले वकील, वयपरत्वे जितपत शक्य आहे त्या गतीने चालत ऑफिसात शिरले. इतक्या वयोवृद्ध व्यक्तीला पोलीस ठाण्यात यावे लागले याची रुखरुख ठाणे अंमलदार जाधव साहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांनी तक्रारीवर माझ्या सासऱ्यांची सही घेतली आणि म्हणाले, "आता वकीलसाहेबांना पुनः इथे यायची गरज नाही. नेमका वीजपुरवठा आत्ता बंद आहे आणि आमच्या कॉम्प्युटरला बॅटरी बॅकअप नाहीये. वीज आल्यावर आमच्या डेटाबेसमध्ये ही तक्रार दाखल करून घेतो आणि दुपारपर्यंत तुम्हाला त्याची कॉपी देतो."

दुपारी मी गेलो तेंव्हा लगेच ती तक्रार माझ्या हाती पडली. ती इंग्रजीमध्ये भाषांतरित करून नोटराइझ करून घ्यावी लागेल हे मी त्यांना सांगितले. त्यावरही ते तत्परतेने म्हणाले, "काही हरकत नाही. तुम्ही इथेच बसा आणि स्वतःच ती  इंग्रजीमध्ये भाषांतरित करा. मी त्यावरही सही-शिक्का  देतो."

ती कारवाई करून मी परत घरी गेलो. पण कंपनीचे नियम पुन्हा वाचल्यावर मला दिसले की त्या तक्रारीवर फक्त अधिकाऱ्याची सही व शिक्का इतके पुरेसे नव्हते. त्यासोबत पोलीस ठाण्याचा गोल शिक्कादेखील आवश्यक होता. मी परत ठाण्यात गेलो. 

संध्याकाळ झाली होती. ठाण्यात फक्त एक महिला डेटाबेस ऑपरेटर हजर होती. ठाणे अंमलदार त्यांच्या फॅमिलीला घेऊन हेल्थ चेकअपसाठी गेले असून ते उद्याच भेटतील असे तिने सांगितले. ती महिला शिपाई असेही म्हणाली की गोल शिक्का सहसा फक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक देत असतात. त्यामुळे, कदाचित ठाणे अंमलदार काही करू शकणार नाहीत. आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मागे उद्यापासून किती खेटे घालावे लागणार आणि त्यामध्ये किती वेळ जाईल याची चिंता मला भेडसावू लागली. मला लवकरात लवकर पुण्याला परतायचे होते. 

त्या महिला कॉन्स्टेबलला मी विनंती केली की निदान ही बाब ठाणे अंमलदार जाधवसाहेबांच्या कानावर घालावी. तेवढी मदत तिने तत्परतेने केली आणि मला सांगितले की जाधवसाहेब केवळ तुमच्या कामासाठी थोड्याच वेळात  पुन्हा ठाण्यात येत आहेत. 

जाधवसाहेब येताच त्यांनी माझी अडचण जाणून घेतली आणि म्हणाले, "ठीक आहे. माझ्या जबाबदारीवर मी गोल शिक्का मारून देतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना मी याबाबत स्पष्टीकरण देईन."  

जाधव साहेबांचे आभार मानून मी म्हटले, "साहेब, तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल काहीतरी लिहून प्रसारित करण्याची माझी इच्छा आहे."
ते समाधानाने म्हणाले, "पोलिसांबद्दल काही चांगले लिहीत असाल तर त्याचे स्वागतच आहे. आमचे साधे आभार मानणारेही क्वचितच भेटतात."

त्या दिवशी दुपारी सोलापुरातच सौ. स्वातीचा पासपोर्ट-नूतनीकरणासाठीचा इंटरव्ह्यू झाला होता. त्यानंतर कधीतरी पुण्यामध्ये पोलिस व्हेरिफिकेशनची कारवाई व्हायची होती.

सोलापूर पोलिसांचा सकारात्मक अनुभव ताजा असतानाच, पुणे पोलिसांकडून एक आश्चर्याचा धक्का बसला. स्वातीची मुलाखत दुपारी एक वाजता सोलापूरच्या पासपोर्ट ऑफिसात झाली होती, आणि त्याच संध्याकाळी सात-साडेसात वाजता पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातून फोन आला, "पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी ओळखपत्र व रहिवासाचा पुरावा घेऊन उद्या सकाळी पोलीस ठाण्यात या." 

आम्ही दोन दिवसांनी पुण्याला पोहोचलो. घरात एक चिट्ठी पडलेली होती, "घर बंद असल्याने तुमचा पासपोर्ट देता आला नाही. ओळख पटवून पोस्ट ऑफिसातून पासपोर्ट घेऊन जाणे."
मुलाखत झाल्यानंतर दोन दिवसातच स्वातीच्या हाती नवीन पासपोर्ट आलेला होता! 

दुसऱ्या दिवशी आम्ही बंडगार्डन पोलीस ठाण्यात गेलो. तेथील पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी श्री. सचिन लांडगे यांनी लगेच स्वातीची कागदपत्रे तपासून व्हेरिफिकेशनचे काम पूर्ण केले. त्यांच्या तत्परतेबद्दल स्वातीने त्यांचे कौतुक करताच अत्यंत अदबीने आणि विनयाने ते म्हणाले, "मॅडम, ही तर माझी ड्यूटी आहे. शिवाय कमिशनर साहेबांचे आम्हाला आदेश आहेत, की कोणतीही पडताळणी सात दिवसाच्या आत पूर्ण झालीच पाहिजे."

त्यानंतर श्री. लांडगेंनी एक मजेदार किस्सा सांगितला, "एकदा एका महिलेला फोन करून मी पासपोर्ट पडताळणीसाठी ठाण्यात बोलावले. त्यावर, 'माझा पासपोर्ट ऑलरेडी आलेला आहे' असे म्हणून तिने फोन ठेवूनच दिला. आम्ही वारंवार तिला फोन करीत राहिलो, पण तिने फोन घेतला नाही. शेवटी एका महिला मार्शलला सोबत घेऊन मी तिच्या घरी गेलो आणि तिला समजावून सांगितले की व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय पासपोर्ट वापरताच येत नाही. तेंव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तोपर्यंत कदाचित तिची अशीच समजूत होती, की पासपोर्ट तिच्या हातात आलेला असतानाही पोलीस फोन करून उगीच तिला त्रास देत आहेत."

अदबीची वागणूक आणि तत्पर सेवेबद्दल श्री. लांडगेंचे आभार मानून आम्ही निघालो. 

स्टेट बँकेत मला आलेल्या चांगल्या अनुभवाविषयी वाचून अनेकांनी आश्चर्य वाटल्याचे लिहिले होते. "Exception proves the rule" असेही कुणी म्हटले होते. काहींनी तर माझ्या अनुभवावर अविश्वासच व्यक्त केला होता. 
पण सरकारी कार्यालये, बँका, पोलीस स्टेशन या ठिकाणी वाईटाबरोबर चांगले अनुभवही येतात. चांगले अनुभवही प्रसारित केले पाहिजेत. त्यामुळे, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मनोबल तर वाढेलच, पण अशीच कार्यतत्परता अधिकाधिक लोकांमध्ये दिसायला लागेल असेही मला प्रकर्षाने वाटते. 

©कर्नल आनंद बापट.

बँकेतला सुखद अनुभव

सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आणि पोलीस कर्मचारी व अधिकारी, यांच्याबद्दलचे वाईट अनुभव अनेकदा वाचायला मिळतात.
म्हणूनच, मला आलेले दोन चांगले अनुभव आवर्जून सांगावेसे वाटतात. पहिला अनुभव बँकेतला...
 
आज दुपारी एकच्या सुमारास मी पुण्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत गेलो. व्हिसाकरता माझ्या आणि सौ. स्वातीच्या दोन्ही खात्यांचे सहा महिन्यांचे स्टेटमेंट लागणार होते. ते घ्यायला टूर कंपनीचा मनुष्य आजच्या आजच संध्याकाळी घरी येतो म्हणाला होता.

बँकेतले हे काम इतक्या तातडीने होणार नाही, असेच मनात धरून मी बँकेत गेलो होतो. आज निदान अर्ज तरी भरून द्यावा इतकाच उद्देश होता.

श्री. उत्तम मरगज नावाचा एक दिव्यांग तरुण बँकेच्या दर्शनी काऊंटरवरच्या कॉम्प्युटरसमोर बसलेला होता. कानातल्या इयरफोनमधून ऐकत आणि कीबोर्ड हाताने चाचपडत तो लोकांना मदत करीत होता. त्याच्यासमोरचे दोन-तीन लोक एकाच वेळी आपापल्या शंकांचा भडिमार त्या तरुणावर करीत होते. पण विशेष म्हणजे, त्या सर्व शंकांचे निरसन तो लीलया व शांतपणे करीत होता.

मधेच संधी साधून मीही त्याला मदत मागितली. त्याने खुणेनेच मला फॉर्म्स ठेवायचा काऊंटर दाखवला व म्हणाला, "स्टेटमेंटसाठीचा विनंती अर्ज भरून १७ नंबर काऊंटरवर द्या."
या 'सरकारी चक्रव्यूहात' आता इकडून तिकडे फिरावे लागणार हे उमजून, "आलिया भोगासी..." असे मनात म्हणत मी १७ नंबर काऊंटरवर गेलो.

श्री. संजय सिन्हा नावाचा १७ नंबरवरचा अधिकारी आधीच एका ग्राहकाचे काम करण्यात व्यग्र होता. मी थांबून राहिलो. मध्येच तो ग्राहक आपले पासबुक शोधू लागल्याने, श्री. सिन्हांनी मला खुणेनेच, "काय?" असे विचारले. थोडक्यात बोलून, माझे विनंती अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवले. खटाखट कीबोर्ड वाजवत दोन्ही खात्यावरच्या माझ्या सह्या त्यांनी ताडून बघितल्या. अर्जांवर शिक्के मारून सह्या केल्या, अर्ज मला परत केले, आणि हसतमुखाने म्हणाले, "त्या दर्शनी काउंटरवर हे नेऊन द्या".
एव्हाना, बँकेत शिरून मला जेमतेम पाच मिनिटेच झालेली होती.

मी पुन्हा श्री. उत्तम मरगज नावाच्या त्या दिव्यांग तरुणासमोर गेलो आणि सह्या व्हेरिफाय करून आणल्याचे त्याला सांगितले. तो चटकन म्हणाला, "दोन्हीपैकी कोणत्याही एका अकाउंटचा नंबर सांगा."
त्याने चाचपडतच, पण तथाकथित 'डोळस' माणसालाही लाजवेल अशा चपळाईने मी सांगितलेला नंबर आणि स्टेटमेंटच्या कालावधीच्या तारखा कॉम्प्युटरवर भरल्या. प्रिंटरला कमांड देऊन तो मला म्हणाला, "त्या प्रिंटरपाशी जाऊन उभे राहा. प्रिंटिंग पूर्ण झाले की मला सांगा. मी दुसऱ्या खात्याचे स्टेटमेंटही देईन."

सहापैकी तीन महिन्यांच्या एंट्र्यांचे प्रिंटिंग पूर्ण झाल्यावर, काही कारणाने ते मशीन थांबले. मी सांगण्यापूर्वीच त्याच्या कानांनी ते टिपले होते. तो उठून प्रिंटरपाशी आला. चाचपडतच त्याने मशीन बंद करून परत चालू केले व म्हणाला, "कुठपर्यंत प्रिंटिंग झाले आहे ती तारीख वाचून मला सांगा."
मी सांगताच, त्याने त्या तारखेपासूनची कमांड पुन्हा प्रिंटरला दिली आणि प्रिंटिंग चालू झाले.

माझ्या दोन्ही स्टेटमेंटचे प्रिंटिंग पूर्ण झाल्यावर उत्तम मला म्हणाला, "आता ते प्रिंट झालेले कागद प्रिंटरमधून एकसंध स्वरूपातच काढून घ्या आणि त्याच अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्या सह्या घ्या."
मी प्रिंटरमधून तो कागदांचा रोल टरकावून घेतला आणि माझ्या लक्षात आले की ते अक्षरशः 'मारुतीचे शेपूट' झाले होते. किमान पन्नास तरी शीट्स होत्या त्या!

टूर एजंटच्या सूचनेनुसार त्या प्रत्येक कागदावर ऑफिसरची सही घ्यायची होती. पण, श्री. संजय सिन्हांना माझी विनंती मान्य नव्हती. मी खूप विनवल्यावर ते म्हणाले, "अहो, तुमच्या प्रत्येक कागदावर मी सही करत बसलो तर माझी बाकीची कामे केंव्हा करू? पहिल्या व शेवटच्या कागदावर मी सही देतो. एकसंध छापलेला रोल असल्याने तेवढे पुरेल." 
खरे पाहता, मलाही श्री. सिन्हांचे म्हणणे पटत होते. परंतु, नंतर कुठे माशी शिंकायला नको, म्हणून मी टूर एजंटला तेथूनच फोन लावला. त्याने नाईलाजाने ते मान्य केले पण प्रत्येक पानावर बँकेचा शिक्का मात्र मारून घ्यायला मला सांगितले. 

माझा फोन झाल्यावर श्री. संजय सिन्हा पुन्हा हसतमुखाने मला म्हणाले, "साहेब, ही अशी कामे आम्ही नेहमीच करतो. तुम्हाला व्हिसाकरता हे स्टेटमेंट हवे असणार. काळजी करू नका. मी वर-खाली दोन सह्या केल्या आहेत. आता हा बँकेचा शिक्का घ्या, प्रत्येक पानावर जिथे हवा असेल तिथे-तिथे स्वतःच्या हातानेच शिक्का मारा आणि मला शिक्का परत करा."

स्टेटमेंट छपाईसाठी लागलेला वेळ, आणि शिक्के मारण्यासाठी मी घेतलेला वेळ जर वजा केला, तर माझे बँकेतले एकूण काम जेमतेम दहा-बारा मिनिटात झाले होते. माझ्याकडून मी काही केले असेल तर इतकेच, की बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्याशी मी शांतपणे, नम्रपणे आणि मुद्देसूद बोललो होतो.

"सरकारी बँकेतले लोक उगाच वेळखाऊपणा करतात, उर्मटपणे बोलतात, काम कसे टाळता येईल हेच बघतात..." वगैरे तक्रारी काही प्रमाणात खऱ्या असतीलही, पण चांगले अनुभवदेखील खूपदा येतात. असे आलेले अनुभव आपण सर्वांनी जर आवर्जून इतरांना सांगितले तर बँक कर्मचाऱ्यांबाबतचे पूर्वग्रह काही प्रमाणात कमी होतील अशी मला आशा आहे.

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब!

१९७७-८० या काळात मी NDA मध्ये होतो. तेथे असलेल्या अनेक ड्रिल इंस्ट्रक्टर्सपैकी, आम्हाला विशेष प्रिय असलेले (तत्कालीन) सुभेदार दरबारा सिंग यांची आज प्रकर्षाने आठवण झाली.

सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन दरबारा सिंग 

कोणाही सेनाधिकाऱ्याला विचारून पहा. ट्रेनिंग अकादमीमधील अनुभव, आणि विशेषतः तेथील 'ड्रिल उस्ताद', यांना तो कधीच विसरू शकत नाही. कारण, गाळलेल्या घामाच्या एकेक थेंबागणिक कॅडेट्सची शारीरिक आणि मानसिक जडण-घडण होत असते. आणि ड्रिल उस्तादही त्या घडणीचा एक शिल्पकार असतो.  

ज्यांनी-ज्यांनी NDA ची 'पासिंग आऊट' परेड पाहिली आहे त्यांना त्या सोहळ्यामागच्या कष्टांची जाणीव नक्की झाली असेल. अक्षरशः तासंतास परेड ग्राऊंडवर पाय आपटत आम्ही सराव करायचो. आम्हा कॅडेटसची कवायत पाहून प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्याही वाजवायचे. पण आमच्याहूनही अधिक मेहेनत घेणारे आमचे उस्ताद मात्र पडद्याआडच राहत असत. 

संपूर्ण सरावादरम्यान, परेड करणाऱ्या कॅडेट्सच्या पुढून, मागून, आणि दोन्ही बाजूंनी ड्रिल उस्तादांना बारीक नजर ठेवावी लागे. कुणाची चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त करावी लागे. कारण एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण परेडची लय बिघडणे अक्षम्य असे. त्यामुळे, सगळे उस्ताद पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण ग्राउंडभर सतत थिरकत असायचे. एखादा सराव मनाजोगता न झाल्यास संपूर्ण परेड पुन्हा पहिल्यापासून सुरु करावी लागे. अशा वेळी दमल्या-भागलेल्या कॅडेट्सना हुरूप देत, त्यांना पुन्हा एकदा सरावासाठी उभे करणे सोपे काम नसे. 

आम्हाला प्रोत्साहित करण्याची दरबारा सिंग साहेबांची शैली खास होती. "बस एक और रिहर्सल, आपके उस्ताद के नाम!" इतकेच  म्हणणे अनेकदा पुरेसे असे. पण तेवढे बोलून थांबतील तर ते दरबारा सिंग कसले! 

"भरतनाट्यम का एक 'शो' करने के बाद हेमा मालिनी भी वन्स मोअर नही करती, लेकिन मेरा कॅडेट जरूर करेगा!" असे त्यांनी म्हटले की आम्ही पोट धरून हसत पुन्हा परेडसाठी तयार असायचो! 

आमच्या चुका काढतानाही ते असेच काहीतरी विनोदी बोलायचे, "कॅडेट बापट, ढीला क्यों पड गया? खटमल खुजली कर रहा है क्या ?" असे म्हणून "लेफ्ट-राईट" च्या ऐवजी "खटमल-खुजली, खटमल-खुजली" असे म्हणत ते आमच्या बाजूने चालायचे. अशा वेळी हसू दाबत-दाबतच, पण नव्या जोमाने आम्ही टाचा आपटायचो. 

पुढे सुभेदार मेजर या हुद्द्यावर बढती मिळून, दरबारा सिंग साहेब NDA मध्ये बरीच वर्षे पोस्टिंगवर राहिले. आम्ही पास आऊट झाल्यानंतरच्या काळातला एक प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. 

पासिंग आऊट परेडचा सराव चालू होता. कॅडेट्स दमलेले होते. कदाचित NDA च्या सिनेमागृहातल्या 'शो'ची वेळही होत आली असेल. मनाजोगती परेड न झाल्यामुळे आणखी एक सराव करायचा आदेश मिळाला होता. त्या जास्तीच्या सरावादरम्यान हजार-दीड हजार कॅडेट्सची आपसात कुजबूज आणि धुसफूस चाललेली होती. 

परेडच्या शेवटी, NDA चे 'निशाण', म्हणजेच राष्ट्रपतींनी प्रदान केलेला मानध्वज सन्मानपूर्वक घेऊन जाण्याची वेळ झाली. त्या कारवाईदरम्यानही कॅडेट्सची कुजबूज थांबलेली नव्हती. एरवी सदैव हसतमुख असणाऱ्या दरबारा सिंग साहेबांना 'निशाण'चा अवमान मात्र सहन झाला नाही. ताड-ताड चालत ते मंचावर जाऊन उभे राहिले. त्यांचा अवतार पाहून कॅडेट्सची कुजबुज काहीशी कमी झाली. 

महत्प्रयासाने राग आवरत दरबारा सिंग बोलू लागले. 

"कॅडेट्स, मी दोनच मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या NDA मध्ये 'Hut of Remembrance' नावाची जी वास्तू आहे, त्यामध्ये गेल्या तीन वर्षात मी फक्त एकदाच गेलो आहे. त्या वास्तूमध्ये अखंड तेवत असलेल्या ज्योतीच्या आजूबाजूला जी नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत, ते सगळे तुमच्यासारखेच NDA कॅडेट होते. त्यामध्येच एक नाव आहे लेफ्टनंट योगराज पलटा, वीर चक्र."

एक दीर्घ श्वास घेऊन दरबारा सिंग पुढे म्हणाले, "१९६२ साली चीन युद्धाच्या वेळी शीख रेजिमेंटची नववी बटालियन अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे तैनात होती. बटालियनच्या एका चौकीवर युद्धासाठी सज्ज असलेल्या तुकडीमध्ये मीदेखील होतो. साधारण माझ्याच वयाचे एक तरुण अधिकारी आमचे कमांडर होते. ते म्हणजे, हेच लेफ्टनंट योगराज पलटा. १५ नोव्हेंबर १९६२ रोजी आमच्या चौकीवर चिन्यांनी हल्ला चढवला. चिनी सैन्य आमच्यापेक्षा कैक पटींच्या संख्येने, आणि भरपूर शस्त्रे आणि दारुगोळ्यासह आले होते. पलटासाहेब आम्हाला प्रोत्साहित करत स्वतःदेखील गोळीबार करीत होते. 'शेवटची गोळी, आणि रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण लढायचं आहे', हेच ते आम्हाला सतत सांगत होते."

परेडमधल्या सगळ्याच कॅडेट्सना जाणवले की दरबारासिंग साहेबांचा आवाज आता जड झाला होता. 

भरल्या कंठानेच ते पुढे बोलत राहिले, "मी आणि लेफ्टनंट पलटासाहेब शेजारी-शेजारीच होतो. एका क्षणी मॉर्टरचा एक गोळा आला आणि थेट पलटा साहेबांच्या चेहऱ्यावर लागला. त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचे निष्प्राण कलेवर माझ्या अंगावर पडले. क्षणार्धात माझी पगडी, दाढी,आणि छाती त्यांच्या रक्ताने चिंब झाली. माझ्या अंगावरून त्यांचा देह उचलण्याचाही अवधी मला मिळेस्तोवर चिनी सैनिक आमच्या चौकीमध्ये घुसले. एका मृतदेहाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मीदेखील मेलेलोच आहे असे समजून, दिसेल त्या सैनिकाला भोसकत ते क्षणार्धात आमच्या अंगावरून पुढे गेले." 

आता मात्र NDA च्या परेड ग्राउंडवर अक्षरशः स्मशानशांतता पसरलेली होती. महत्प्रयासाने अश्रू आवरत असलेल्या दरबारा सिंग साहेबांकडे सर्व कॅडेट अविश्वासाने पाहत होते. 

सद्गदित आवाजात दरबारा सिंग म्हणाले, "सर्वप्रथम जेंव्हा मी 'Hut of Remembrance' मध्ये पलटासाहेबांचे नाव वाचले तेंव्हा मी नखशिखांत थरारलो होतो. अचानक माझ्या आयुष्यातली २०-२५ वर्षे गळून गेली आणि माझ्या दाढीवर आणि छातीवर गरम रक्त वाहत असल्याचा भास मला झाला. त्यानंतर पुन्हा कधीच मी तिथे गेलो नाही. पण, पलटासाहेबांसारख्या अनेक NDA कॅडेट्सच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून, माननीय राष्ट्रपतींनी दिलेला हा ध्वज जेंव्हा-जेंव्हा परेडवर आणला किंवा नेला जातो तेंव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते. माझा हात आपोआप सलामीसाठी उचलला जातो."

"लक्षात ठेवा कॅडेट्स, त्या वीरांची आठवण आपल्याला करून देणारे हे 'निशाण' आहे. जे त्याला निव्वळ एक रंगीबेरंगी कापडाचा तुकडा समजतात त्यांच्यासारखे करंटे तेच !"

कसेबसे एवढेच बोलून, पुन्हा ताड-ताड चालत दरबारा सिंग साहेब परेडवरून निघून गेले. त्यापुढील कैक मिनिटे संपूर्ण परेड हतबुद्ध होऊन तिथेच उभी होती. 

अशा आमच्या अविस्मरणीय दरबारा सिंग साहेबांनी परवाच, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या इहलोकातून कूच केले! 

दरबारा सिंग साहेब, आज १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमच्या गावी, तुमच्यासाठी 'अंतिम अरदास' आयोजित केला आहे. तुम्हाला मानवंदना देण्यासाठी मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. 

म्हणून इथूनच तुमच्या कॅडेटचा तुम्हाला कडक सॅल्यूट! 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शनिवार, २ जुलै, २०२२

काश्मीरचे अश्रू : अंतिम भाग

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग २६ नंतर पुढे चालू...) 

१९७१ च्या युद्धातील पराभवानंतर एकीकडे, पाकिस्तान  भारताच्या बाबतीत सावध झाला होता, पण दुसरीकडे सूडभावनेने पेटलेलाही होता. जम्मू-काश्मीर भारतापासून तोडण्याचा त्याचा नापाक मनसुबा जुनाच होता, पण त्या कामी आपला सक्रिय सहभाग प्रत्यक्ष दिसू नये याची पुरेपूर खबरदारी पाकिस्तान पुढे अनेक वर्षे घेत राहिला. जम्मू-काश्मीरमधील सामाजिक-राजकीय परिस्थितीदेखील पाकिस्तानसाठी अजून तितकीशी अनुकूल नव्हती.


दरम्यान, खालिस्तान आंदोलनाला छुप्या मार्गाने मदत करून, पाकिस्तानने भारताची डोकेदुखी वाढवलेली होती. ऑपरेशन 'ब्लू स्टार' नंतरही काही वर्षे पंजाबमध्ये दहशतवाद पेटता ठेवण्यात पाकिस्तानला यश आले होते. पण भारतीय सैन्याला पंजाबमध्ये अतिरेक्यांशी लढण्यामध्ये गुंतवून, त्याच वेळेस जम्मू-काश्मीरमध्ये जनतेचा उठाव करवण्याची पाकिस्तानची खेळी मात्र फळाला येत नव्हती. 

१९८६-८७ मध्ये, जनरल कृष्णस्वामी सुंदरजींच्या नेतृत्वाखाली भारताने प्रचंड मोठ्या प्रमाणावर, 'ऑपरेशन ब्रासटॅक्स' नावाचा एक अत्यंत सुनियोजित युद्धसराव सुरु केला. भारतीय सैन्याच्या दोन कमांड, त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सुमारे पाच लाख सैनिक, सर्व रणगाडे, संपूर्ण तोफखाना आणि इतर युनिट्स या युद्धसरावाकरिता राजस्थानमध्ये पाक सीमेवर तैनात केले गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर, जगामध्ये कोठेही, इतके मोठे सैन्य एकाच वेळी व एकाच यद्धक्षेत्रामध्ये तैनात केले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. या युद्धसरावामध्ये पायदळासोबत भारतीय नौदलाचाही सहभाग होता आणि भारतीय वायुसेनादेखील सज्ज अवस्थेत होती. पाकिस्तानच काय, पण कोणत्याही शत्रूची छाती दडपून टाकेल अशी ती परिस्थिती होती. 

असे म्हटले जाते की, पाकिस्तानने या युद्धसरावाच्या उत्तरादाखल एखादी कुरापत काढावी, असे प्रयत्न भारतीय सैन्याकडून केले गेले. त्यामागे कदाचित असा डाव असू शकेल की, पाकिस्तानी कुरापतीला प्रत्त्युत्तर देण्याच्या मिषाने भारतीय सैन्याने पाकिस्तानात शिरून त्याचे तुकडे पाडावेत, आणि पाकिस्तानी अणुसंशोधन केंद्र नष्ट करावे. प्रत्यक्षात अशी योजना अस्तित्वात होती अथवा नाही, याचा पुरावा आज शोधणे कठीण आहे. 

'ऑपरेशन ब्रासटॅक्स'चा एक परिणाम मात्र असा झाला की धास्तावलेल्या पाकिस्तानने भारतीय राजदूताकरवी आपली धमकी भारताला कळवली की, "जर आमच्यावर वेळ आणलीत तर आम्ही अण्वस्त्रे वापरायला मागे-पुढे पाहणार नाही". भारताकडेही त्यावेळी अण्वस्त्रसज्जता होती. पण, अणुयुद्धाचा धोका पत्करायला दोघांपैकी एकही देश तयार नसल्याने 'ऑपरेशन ब्रासटॅक्स' दरम्यान फार काही घडले नाही ही वस्तुस्थिती आहे. 

त्याच सुमारास, म्हणजे डिसेंबर १९८६ मध्ये JKLF संघटनेचा नेता, अमानुल्ला खान याला इंग्लंडमधून हद्दपार करण्यात आले. तो पाकिस्तानात येऊन स्थायिक झाला, आणि ISI सोबत बसून भारतविरोधी कारवाया आखू लागला. स्वतः अमानुल्ला खान आणि ISI अनेक वर्षे ज्या संधीची वाट पाहत होते ती संधी १९८७ साली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनायास चालून आली. 

लोकशाही प्रक्रिया, राज्यशासन, न्यायव्यवस्था या सर्वांवरून ज्यांचा विश्वासच उडाला होता असे अनेक भरकटलेले तरुण काश्मीर खोऱ्यामध्ये होते. जम्मू-काश्मीरमधील भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करणे आणि 'आपले राज्य' आणणे, हे या तरुणांचे उद्दिष्ट्य होते. अशा स्वयंप्रेरित तरुणांना हाताशी धरून, आपला कार्यभाग साधण्यासाठी, ISI ने आपले काही हस्तक काश्मीर खोऱ्यामध्ये नेमले होते. त्यांचे काम इतकेच होते की, बंडखोरीसाठी उत्सुक असलेल्या तरुणांना एकत्र करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणणे.  

फेब्रुवारी १९८८ मध्ये अशा तरुणांची पहिली तुकडी नियंत्रण रेषेपार पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवली गेली. त्या तरुणांना हत्यारे चालवण्याचे आणि इतर घातपाती कारवाया करण्याचे रीतसर प्रशिक्षण तेथे दिले जाऊ लागले. त्याचबरोबर त्यांना ही शिकवणदेखील दिली गेली की काश्मीरवर असलेले भारताचे प्रभुत्व संपुष्टात आणायचे असेल, तर काश्मीर खोऱ्यातून गैरमुस्लिम लोकांना हुसकून लावणे गरजेचे आहे. गैरमुस्लिमांना, आणि विशेषतः हिंदू पंडितांना, "मुखबिर", म्हणजे, 'काश्मीरची माहिती गुप्तपणे भारताला पुरवणारे लोक', हे टोपणनाव, स्वतः शेख अब्दुल्लांनीच कुत्सितपणे पूर्वी दिलेले होते. त्यामुळे, अशा 'मुखबिरांना' आपले लक्ष्य करायचे आहे, हा ISIने शिकवलेला धडा गिरवणे काश्मिरी मुस्लिम तरुणांसाठी अजिबात कठीण नव्हते !

जुलै १९८७ मध्ये भारत-श्रीलंका शांती करारावर स्वाक्षरी करून पंतप्रधान राजीव गांधींनी तडकाफडकी एक निर्णय घेतला. श्रीलंकेचे सैन्य आणि बंडखोर तामिळ 'टायगर्स' यांच्यादरम्यान समन्वय साधण्याकरिता, 'शांती सेना' म्हणून जाण्याचा आदेश त्यांनी अचानकच भारतीय सैन्याला दिला. मात्र या कामगिरीचे निश्चित स्वरूप, नेमकी उद्दिष्ट्ये, श्रीलंकेमधील अशांत भागाची भौगोलिक परिस्थिती, अशा सर्व महत्वाच्या बाबींविषयी आपल्या सैन्याकडे अतिशय त्रोटक माहिती होती. त्यामुळे, या 'शांती सेनेचे' काम अपेक्षेपेक्षा खूपच अधिक काळ चालले, आणि भारताचे अनेक सैनिक व अधिकारी हकनाक मृत्युमुखी पडले.  

काश्मीर खोरे भारतापासून तोडण्याकरिता, तेथील अंतर्गत परिस्थिती अनुकूल झालेली असतानाच, भारतीय सैन्य श्रीलंकेमध्ये गुंतून पडणे, ही पाकिस्तानसाठी सुवर्णसंधीच होती. याच काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती, जनरल झिया-उल-हक यांनी 'ऑपरेशन टोपाक' ही योजना निश्चित करून, एका गुप्त बैठकीत काही मोजक्या अधिकाऱ्यांना समजावून दिली. ही योजना प्रत्यक्षात पार पाडण्याची मुख्य जबाबदारी पाकिस्तानद्वारे प्रशिक्षित काश्मिरी तरुणांवर असणार होती. त्यासाठी त्यांना संघटित करण्याचे काम ISI कडे सोपवले गेले होते. 
या योजनेचे ठळक मुद्दे असे होते: -

१. 'मुस्लिम युनायटेड फ्रंट' (MUF) या राजकीय पक्षाने सर्व संवैधानिक मार्ग वापरून राज्य सरकारची कोंडी करणे.

२. बॅंका, सरकारी कार्यालये, दळणवळण यंत्रणा, दूरसंचार केंद्रे, यांमध्ये शक्य तितकी 'आपली विश्वासू माणसे' पेरणे, आणि योग्य वेळी त्यांच्यामार्फत ही सर्व ठिकाणे ताब्यात घेणे.

३. काश्मिरी तरूणांकरवी रस्तोरस्ती हरताळ, 'बंद', 'रास्ता रोको' आणि जनसभांचे आयोजन करून सामान्य जनजीवन विस्कळित करणे.

४. काश्मीरमधील हिंदू व शीख समुदायाच्या लोकांना धमकावून खोऱ्यातून हुसकून लावणे, आणि सरकारी कार्यालये व न्यायव्यवस्थेतील महत्वाच्या व्यक्तींच्या हत्या करणे. 

५. योग्य वेळ येताच, काश्मीर खोरे व जम्मूला जोडणारा जवाहर बोगदा उद्ध्वस्त करणे, आणि लडाखकडे जाणारे सर्व मार्ग बंद करणे. 

६. अशा प्रकारे काश्मीर खोरे ताब्यात येताच काश्मिरी 'स्वातंत्र्यसैनिकांनी' पाकिस्तानी सैन्याला मदत मागणे व पाक सैन्याने काश्मीर खोरे काबीज करणे. 

या योजनेप्रमाणे, पाकव्याप्त काश्मिरात प्रशिक्षण घेऊन खोऱ्यामध्ये परतलेल्या पहिल्या २-३ तुकड्यांमधली काही नावे पुढे बरीच कुप्रसिद्ध झाली; उदाहरणार्थ: JKLF चा नेता यासिन मलिक, जावेद मीर, बिलाल सिद्दीकी, अश्फाक मजीद वाणी व त्याचाच पट्टचेला फारुख अहमद दर उर्फ 'बिट्टा कराटे'. 
['काश्मीर फाईल्स' या  चित्रपटामध्ये 'बिट्टा कराटे' आणि यासिन मलिक या दोन्ही अतिरेक्यांचे संमिश्र प्रातिनिधिक व्यक्तिमत्व, 'फारुख मलिक बिट्टा' या नावाने, अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्यासमोर आणले आहे.]      

हिंदूंना दहशत बसवणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना वेचून ठार मारणे ही 'ऑपरेशन टोपाक' ची दोन उद्दिष्टे बऱ्याच अंशी साध्य होत गेली. १७ सप्टेंबर १९८८ रोजी तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. अली मोहम्मद वटाली यांच्या घरावर झालेला सशस्त्र हल्ला ही त्या योजनेतली पहिली मोठी दहशतवादी घटना म्हणता येईल. निवृत्त न्यायाधीश श्री. नीलकंठ गंजू, MTNL चे इंजिनियर श्री. बाळकृष्ण गंजू, दूरदर्शनचे अधिकारी श्री. लस्सा कौल, शिक्षिका गिरीजाकुमारी टिक्कू, RSSचे स्वयंसेवक आणि भाजप नेते श्री. टीकालाल टपलू, अशा अनेक निरपराध हिंदू लोकांच्या निर्घृण हत्या पुढील दीड वर्षात झाल्या. या दहशतवादी घटना थांबवणे आता कोणाच्याच हातात राहिले नव्हते. बेजार झालेले हिंदू लोक, आपले जीव वाचवण्यासाठी हळूहळू काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडू लागले. 
[वेगवेगळ्या काळामध्ये घडलेल्या या सर्व घटना, जशा घडल्या तशाच, परंतु जणू एकाच कुटुंबात घडल्या आहेत अशा प्रकारे कथानकांमध्ये गुंफून, 'काश्मीर फाईल्स' चित्रपटात दाखवल्या गेल्या आहेत.]

काश्मीर खोरे निश्चितपणे दहशतवाद्यांच्या हातात जाऊ लागले होते. त्यांच्याविरुद्ध काही करणे तर फारुख अब्दुल्ला सरकारला शक्य नव्हतेच. परंतु, सरकार दहशतवाद्यांना घाबरत होते की दहशतवाद्यांना सामील होते, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती होती. कारण, जुलै १९८९ ते डिसेंबर १९८९ या काळात फारुख अब्दुल्ला सरकारने, विविध आरोपांखाली तुरुंगात असलेल्या तब्बल ७० दहशतवाद्यांची मुक्तता केली!

नोव्हेंबर १९८९ मध्ये, लोकसभेकरिता भारतात सार्वत्रिक निवडणूक झाली. विरोधकांनी आघाडी बनवल्यामुळे, सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही. विश्वनाथ प्रताप सिंगांनी २ डिसेंबर १९८९ रोजी, केंद्रामध्ये संयुक्त आघाडी सरकार स्थापन केले. १९८७ साली काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन विश्वनाथ प्रताप सिंगांसोबत गेलेले काश्मिरी नेते आणि फारुख अब्दुल्लांचे राजकीय हाडवैरी, श्री. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्रीपदाची शपथ घेतली.  

शपथविधीनंतर सहाच दिवसांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांची थोरली मुलगी (व मेहबूबा मुफ्ती यांची मोठी बहीण) डॉ. रूबैया सईद हिचे श्रीनगरमधून अपहरण करण्यात आले. यासिन मलिक याच्या नेतृत्वाखालील JKLF ने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. रूबैय्याच्या सुटकेच्या बदल्यात पाच कुख्यात अतिरेक्यांना तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी अपहरणकर्त्यांनी राज्य सरकारपुढे ठेवली होती.

जम्मू-काश्मीर अशा प्रकारे पेटलेला असताना, राज्याचे मुख्यमंत्री, डॉ. फारुख अब्दुल्ला सुट्टीसाठी इंग्लंडला गेलेले होते. ते घाईघाईने भारतात परतले. एका कुमारिकेचे अशा प्रकारे अपहरण करणे, हे गैरइस्लामी कृत्य असल्याचे मत त्यावेळी मुस्लिम समाजात सगळीकडून व्यक्त होत होते. त्यामुळे, अपहरणकर्त्यांवरदेखील सामाजिक दबाव असण्याची शक्यता होती. 

'अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य करू नयेत', असे मत मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी जाहीरपणे व्यक्त केले होते. तसे केल्यास, "भारत सरकारने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले" असा चुकीचा आणि घातक संदेश अतिरेक्यांना आणि संपूर्ण जगाला मिळेल, असाही इशारा त्यांनी दिला होता. परंतु, दोन केंद्रीय मंत्री, इंद्रकुमार गुजराल आणि अरिफ मोहम्मद खान यांनी श्रीनगरला येऊन फारुख अब्दुल्लांना, त्या पाच अतिरेक्यांच्या सुटकेचा आदेश द्यायला भाग पाडले. 

डॉ. फारुख अब्दुल्लांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली. सुटका झालेल्या त्या पाच अतिरेक्यांना काश्मीर खोऱ्यातील जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतले. 'आपल्यापुढे गुडघे टेकलेल्या भारत सरकारकडून आता आपले स्वातंत्र्य हिरावून घेणे सहज शक्य आहे.' असे स्वप्न अतिरेकी संघटनांनी सामान्य जनतेपुढे ठेवले आणि त्यावर लोकांचा विश्वास न बसता तरच नवल होते. एवढेच नव्हे तर अशीही अफवा पसरवली गेली की २० जानेवारी १९९० हा काश्मीरचा स्वातंत्र्यदिन असेल. 

आता मात्र अतिरेकी कारवायांवरचे सर्व धरबंद सुटले. कट्टर अतिरेकीच नव्हे तर काश्मीर खोऱ्यातील सामान्य लोकही 'येऊ घातलेल्या' स्वातंत्र्याच्या उन्मादात वाहवत गेले. जानेवारी १९९० चे पहिले दोन आठवडे काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदूंवरच्या अत्याचारांनी परिसीमा गाठली. "रलीव, चलीव या गलीव" (धर्मांतर करा, अथवा चालते व्हा, नाहीतर मरा") हिंदूंना उद्देशून असलेल्या या घोषणा आता फक्त अतिरेक्यांच्या तोंडीच न राहता, रस्तोरस्ती ऐकू येऊ लागल्या. 

राज्य सरकार तर हातपाय गाळूनच बसले होते. क्वचित असे वाटून जाते की, कोण जाणे, पण फारुख अब्दुल्लांच्या मनात इतकीच भावना असावी, "बघा, मी आधीच सांगितलं होतं, अतिरेक्यांपुढे गुडघे टेकू नका म्हणून. आता भोगा आपल्या कर्माची फळे!"
केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनाही, आपला हाडवैरी, फारुख अब्दुल्लाचा काटा काढण्यापलीकडे काही दिसत नव्हते की काय अशीही शंका घ्यायला वाव आहे. आणि तशी शंका यायला काही कारणही आहे. 

जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल, जनरल के. व्ही. कृष्णराव यांनी रूबैय्या सईद अपहरण प्रकरणानंतर पदमुक्त होण्यासाठी विनंती केली होती. परंतु महिनाभर त्या विनंतीवर काहीही कारवाई गृहमंत्रालयाकडून झाली नाही. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती बरीच चिघळल्यानंतर, १८ जानेवारी १९९० रोजी फारुख अब्दुल्लांना दिल्लीहून कुणकुण लागली की, श्री. जगमोहन यांना तातडीने जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगितले जाऊ शकते. 

ज्या जगमोहन यांनी पूर्वी आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले होते, तेच पुन्हा राज्यपालपदी येत असल्याचे कळताच फारुख अब्दुल्लांनी १८ जानेवारीच्या संध्याकाळीच विशेष विमानाने जम्मू गाठले. दोन ओळींचे आपले राजीनामापत्र त्यांनी राज्यपाल, जनरल के. व्ही. कृष्णराव यांना सुपूर्द केले, आणि ते रातोरात सपरिवार लंडनला निघून गेले. 

त्याच मध्यरात्री दिल्लीमध्ये, श्री. जगमोहन यांना झोपेतून उठवले गेले, आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून तडक जम्मूला जाण्यास सांगण्यात आले. त्याहून मोठी आश्चर्याची बाब म्हणजे, दुपारपर्यंत नवीन राज्यपाल जम्मूला पोहोचायची वाट न  पाहता, मावळते राज्यपाल, जनरल के. व्ही. कृष्णराव, १९ जानेवारीच्या सकाळीच जम्मूहून निघूनही गेलेले होते!

त्यामुळे १९-२० जानेवारी या दोन दिवसात अशी परिस्थिती होती की, राज्यामध्ये सरकार अस्तित्वात नव्हते, राज्यपाल पदभार सोडून जम्मूहून निघून गेलेले होते, आणि नवीन राज्यपाल अजून श्रीनगरला पोचलेले नव्हते! त्यामुळे, दोन दिवस काश्मीर खोऱ्यामध्ये केवळ आणि केवळ अतिरेक्यांचे राज्य होते! त्या दोन दिवसांच्या अराजकादरम्यान काय-काय घडले असेल याची नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारा येतो!

जानेवारी १९९० हा जरी काश्मीरच्या इतिहासाला कलाटणी देणारा काळ म्हटला तरी, भारताच्या सुदैवाने, ज्या कलाटणीची अपेक्षा पाकिस्तानला होती, ती कलाटणी मात्र काश्मीरच्या इतिहासाला मिळाली नाही. मात्र, त्यानंतरची ३० वर्षे काश्मीर खोऱ्यामधील जनजीवनात मुख्यत्वे अशांतताच राहिली आहे. २-४ दिवस पर्यटनासाठी आणि सृष्टीसौंदर्य पाहण्यासाठी काश्मीरला जाणाऱ्यांच्या डोळ्यांना काश्मीरचे वाहणारे अश्रू कदाचित दिसतही नसतील. पण कान देऊन ऐकल्यास, दबलेल्या हुंदक्यांमधली, कानठळ्या बसवू शकणारी आर्तता नक्की जाणवेल. 

'भारताचा अविभाज्य भाग' असलेल्या जम्मू-काश्मीर राज्याला वरदान म्हणून दिला गेलेला, भारतीय राज्यघटनेमधील ३७०वा अनुच्छेद, प्रत्यक्षात शापच ठरला होता. ऑगस्ट २०१९मध्ये तोदेखील रद्द झाला. जम्मू-काश्मीर-लडाख या प्रदेशांनी इतरही काही बदल अनुभवले. परंतु, अजूनही राहून-राहून बरेच प्रश्न मनात उमटतात.
 
पर्यटकांना भुरळ घालणारे काश्मिरी गुलाब कधी स्थानिक लोकांच्याही वाट्याला येतील? 
की त्यांच्या नशिबी फक्त काटेच?
 
काश्मीरची भूमी जरी नेहमीच 'भारताचा अविभाज्य भाग' राहणार असली तरी, सामान्य काश्मिरी मनुष्य आजतरी खऱ्या अर्थाने 'भारताचा अविभाज्य भाग' झालेला आहे का?  
त्याच्या दृष्टीने आणि आपल्याही दृष्टीने?

का अजूनही, "Welcome to Kashmir. Have you come from India?" 


( लेखमाला समाप्त)
 
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शुक्रवार, १ जुलै, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग २६

   #काश्मीरचे_अश्रू 

(भाग २५ नंतर पुढे चालू...) 


१९८०च्या दशकामध्ये जम्मू-काश्मीरचे सामाजिक-धार्मिक रूप खूपच बदलले. तत्कालीन शेख अब्दुल्ला सरकारची बदललेली धोरणे, आणि पाकिस्तानचा छुपा हस्तक्षेप, या दोन्ही गोष्टी याकरिता कारणीभूत ठरल्या. शेख अब्दुल्ला सरकारने सुमारे २५०० गावांची मूळ काश्मिरी नावे बदलून त्याऐवजी नवीन इस्लामी नावे जाहीर केली होती. जमात-ए-इस्लामी पक्षाच्या पुढाकाराने अनेक मदरसे काश्मीर खोऱ्यामध्ये सुरु झाले होते. शेख अब्दुल्ला सरकारने त्या मदरश्यांकडे नुसती डोळेझाक केली असे नव्हे तर त्यांना सरकारी अनुदानदेखील दिले. पाकिस्तानमध्ये धर्मशिक्षण घेतलेले व क्वचित स्वतःच पाकिस्तानी नागरिक असलेले मौलवी या मदरश्यांमध्ये शिकवत असत. लहान वयापासून मुलांना त्या मदरश्यांमध्ये कोणत्या स्वरूपाचे शिक्षण मिळत असेल हे सांगायला नकोच! 
सय्यद सलाहुद्दीन आणि यासिन मलिक 

शेख अब्दुल्ला आयुष्यभर स्वतःला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवत आले. त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची घटना आणि तत्वे ही धर्मनिरपेक्षतेवरच आधारित होती. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षात सर्वधर्मीय नेते होते आणि स्वतः शेख अब्दुल्लांनीही समाजात धर्मांधता फैलावणार नाही याची दक्षता घेतली होती. मात्र, आपल्या अखेरच्या काळात, जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम मतदारांना येनकेनप्रकारेण आपल्याकडे खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याच शेख अब्दुल्लांनी केला हेही एक कटू सत्य आहे. या सर्वांचा परिणाम जम्मू-काश्मीरच्या भावी पिढ्यांवर बेमालूम होत राहिला. 

राज्यात अरबस्तानातील इस्लामी पद्धतीची वेशभूषा करण्याकरिता, विशेषतः स्त्रियांवर, अतिरेक्यांकडून दबाव येऊ लागला होता. चित्रपटगृहे आणि 'बार' गैरइस्लामी असल्याचे सांगत, त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ले करायला सुरु केले होते. अशा प्रकारे, अनेक शतके काश्मीरमध्ये प्रचलित असलेला 'सूफी इस्लाम' हळूहळू मागे पडत गेला आणि त्याची जागा अरबस्तानातला 'वहाबी इस्लाम' घेऊ लागला. भारत हे एक 'धर्मनिरपेक्ष' गणराज्य असल्याचा उल्लेख १९७६ साली भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या केंद्र सरकारने सामील केला, त्याच सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये मात्र धर्मनिरपेक्षता वाऱ्यावर उधळून दिली हाही इतिहास आहे!

नोव्हेंबर १९८६ मध्ये, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष, डॉ. फारुख अब्दुल्ला काँग्रेसच्या पाठिंब्यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले. 

फारुख अब्दुल्लांच्या दृष्टीने, हे मुख्यमंत्रीपद म्हणजे 'अनायास तोंडात पडलेले जांभूळ' होते. या संधीचा वापर ते स्वतःच्या पक्षासाठी करून घेणारच होते. प्रत्यक्षात, जर त्यावेळी निवडणूक झाली असती तर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकला असता. परंतु, भविष्यात केंद्र सरकारचे पाठबळही वापरून घेण्याची इच्छा फारुख अब्दुल्लांना असल्याने, त्यांच्या दारी आपल्या पायांनी चालत आलेल्या काँग्रेस पक्षाला ते धुडकावणार नव्हते. 

काँग्रेसची राजकीय खेळी मात्र अशी होती की, नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केल्यानंतर, त्या पक्षाचा जनाधार वापरून, १९८७च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःचे शक्य तेवढे आमदार निवडून आणायचे, आणि त्यायोगे, काँग्रेस पक्षाची जम्मू-काश्मीरमधली संघटना अधिक सशक्त करायची. त्यामुळे, भविष्यात राज्यामध्ये एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न काँग्रेसला पाहता येणार होते. 

राजकीय डावपेचांमध्ये गुंग असलेल्या या दोन्ही सत्ताधारी पक्षांना, जम्मू-काश्मीरमध्ये फैलावत चाललेला असंतोष, आणि त्याचा फायदा उठवून पाकिस्तानने भडकवलेला दहशतवाद कदाचित जाणवतही नव्हते. अतिरेकी घटना वाढत होत्या आणि सरकारला त्यावर नियंत्रण मिळवता येत नव्हते. फारुख अब्दुल्ला सरकार गादीवर बसल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच, म्हणजे मार्च १९८७ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक राज्याच्या भवितव्याला एक भीषण कलाटणी देणारी घटना ठरली. 

राज्यातील दोन्ही तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष, म्हणजेच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स संयुक्तपणे निवडणूक लढणार होते. त्यामुळे, त्यांच्याविरोधात लढणाऱ्या सर्व लहान-मोठ्या पक्षांची मोट बांधण्यासाठी 'कट्टर इस्लामवाद' अतिशय प्रभावी अस्त्र म्हणून वापरता येणार होते. ही संधी ओळखून, जमात-ए-इस्लामी पक्षाने पुढाकार घेतला आणि जवळजवळ सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून 'मुस्लिम युनायटेड फ्रंट' (MUF) नावाची एक संयुक्त आघाडी उभी केली. 

MUF मध्ये सामील असलेले, 'पीपल्स कॉन्फरन्स'सारखे काही पक्ष जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्याकरिता कटिबद्ध होते, तर जमात-ए-इस्लामी सारखे काही पक्ष पाकिस्तानात विलीन होण्याची स्वप्ने पाहत होते. त्यांच्या उमेदवारांनी आपापल्या प्रचारामध्ये उघडपणे धर्मरक्षणासाठी जनतेला साद घालणे सुरु केले. शिवाय, "फारुख अब्दुल्लांनी स्वतःच्या फायद्यासाठी, काँग्रेससोबत काश्मीरी जनतेच्या हिताचा सौदा केला" असे आरोप करून ते काश्मिरी लोकांच्या भावना भडकवू लागले. 
 
MUF च्या प्रचाराचा जोर पाहून काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीचे धाबे दणाणले. राज्यातील सत्ताधारी युती सरकारने निवडणुकीपूर्वीच्या दोन आठवड्यांमध्ये MUF च्या आठ नेत्यांविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. प्रक्षोभक भाषणे करून धर्माच्या नावाने लोकांना भडकवणे, आणि भारतापासून स्वतंत्र होण्यासाठी चिथावणी देणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले. MUF च्या सुमारे ६०० कार्यकर्त्यांना पकडून स्थानबद्ध केले गेले. एकूणच, निवडणुकांमध्ये आपलीच सरशी व्हावी यासाठी, राज्य व केंद्र सरकारांनी त्यांच्या हाताशी असलेले पोलीस खाते, निवडणूक आयोग व इतर सर्वच यंत्रणा कामाला लावल्या. 

१९७७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक निवडणुकीत सर्रास गैरप्रकार होत आले होतेच. परंतु, १९८७च्या निवडणुकीत मात्र कळसच गाठला गेला. गैरप्रकाराच्या अनेक तक्रारी होत्या, परंतु त्यापैकी बऱ्याचश्या दाखल होण्यापूर्वीच दाबल्या गेल्या आणि ज्या वरपर्यंत पोचल्या त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे, नेमके किती गैरप्रकार झाले याचा संपूर्ण तपशील उपलब्ध नाही. काही  निवडक घटना पाहिल्या तर तत्कालीन परिस्थितीची कल्पना येऊ शकते. 

MUF मधील पीपल्स कॉन्फरन्स या घटक पक्षाचे नेते, श्री. अब्दुल गनी लोन यांनी हंदवारा विधानसभा मतदारसंघातील गैरप्रकाराबाबत उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, मतमोजणी सुरु असतानाच, तेथील तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. अली मोहम्मद वटाली हे हेलिकॉप्टरने मतमोजणी केंद्रावर आले व त्यांनी तेथील अधिकाऱ्यांवर दबाव आणून नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराला विजयी घोषित करवले. प्रथमतः उच्च न्यायालयाने तेथील सर्व मतपेट्या सीलबंद करवून श्रीनगरमध्ये मागवून घेतल्या. परंतु, नंतर अचानकच न्यायाधीशांनी श्री. अब्दुल गनी लोन यांची तक्रार दाखल करून घेण्यासच नकार दिला !

सर्वात मोठा गैरप्रकार श्रीनगरच्या अमीराकदल मतदारसंघात झाला. मतमोजणी सुरु होती. जमात-ए-इस्लामीचा उमेदवार मोहम्मद युसुफ शाह, याने निर्णायक आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होऊ लागले होते. त्या मतदारसंघातील विद्यमान आमदार व नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार, गुलाम मोहिउद्दीन शाह यांना आपला पराभव होत असल्याचे लक्षात आल्याने, ते घरी निघून गेले. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्यात बरीच दिरंगाई केली. दरम्यान घरी निघून गेलेल्या गुलाम मोहिउद्दीन शाह यांना परत बोलावून विजयी घोषित केले गेले! पराभूत ठरवले गेलेल्या मोहम्मद युसुफ शाह व त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरु करताच त्यांना अटक करण्यात आली आणि पुढे बराच काळ त्यांना कैदेमध्ये ठेवले गेले. 

याच पराभूत उमेदवाराने, मोहम्मद युसुफ शाहने, कालांतराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पलायन करून 'सय्यद सलाहुद्दीन' असे टोपण नाव धारण केले. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISI च्या मदतीने त्यानेच 'हिजबुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. पुढील अनेक वर्षे 'हिजबुल मुजाहिदीन' ही पाकप्रणीत संघटना भारतीय संरक्षणदलांची सर्वात मोठी डोकेदुखी होऊन बसली. 

भारताची त्याच काळातील दुसरी मोठी डोकेदुखी होती JKLF, जिचा एक शिलेदार व भविष्यातला कुख्यात अतिरेकी, १९८७च्या निवडणुकीत मोहम्मद युसुफ शाहचा निवडणूक प्रचारप्रमुख होता. त्याचे नाव होते यासिन मलिक. [याच यासिन मलिकने १९९० साली श्रीनगरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ५ निशस्त्र अधिकाऱ्यांची निर्घृण हत्या केली होती. इतरही अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात होता. दि. २५ मे २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.]

१९८७ सालच्या निवडणूक गैरप्रकारांबाबत एक गोष्ट मात्र अनाकलनीय आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष स्वतःच्या बळावरच बहुमताने निवडून येण्यास सक्षम होता. काँग्रेससोबत युती केल्यानंतर तर त्यांना निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता अत्यंत दाट होती. सर्व निवडणूकपूर्व भाकितेदेखील हेच सांगत होती. निकालानंतर केल्या गेलेल्या विश्लेषणातही पुढे दिसून आले की गैरप्रकाराच्या तक्रारी असलेल्या सर्व  जागा जरी MUFला मिळाल्या असे गृहीत धरले, तरी विद्यमान सरकारला पुन्हा सत्तेत येण्यात काहीही अडचण आली नसती. असे असताना, निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार का झाले?

दुर्दैव हेच की, राज्यात व केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या दोन्ही मोठया पक्षांनी स्वतःच जेंव्हा लोकशाहीची पायमल्ली चालवली होती, तेंव्हा तथाकथित फुटीरवादी पक्ष मात्र लोकशाहीच्या मार्गानेच पुढे जाऊ पाहत होते. स्वतंत्र जम्मू-काश्मीर मागणारे असोत, किंवा जम्मू-काश्मीर पाकिस्तानात विलीन करण्याचे पुरस्कर्ते पक्ष असोत, त्या सर्वांनीच निवडणुकीत स्वतःला झोकून दिले होते. 

प्रत्यक्ष निवडणुकीत जे घडले ते पाहून सर्व विरोधकांचाच नव्हे तर, प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या जम्मू-काश्मीरमधल्या संपूर्ण तरुण पिढीचा भ्रमनिरास झाला. भारतीय लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास तर उडालाच असेल, पण कदाचित, भारत देशामध्ये राहण्यात आपले काही हित आहे यावरच्या विश्वासालाही तडा गेला असणार.  

निवडणूक पार पडल्यानंतर चिरडीला आलेले MUFचे कार्यकर्ते, आणि इतर असंख्य काश्मिरी तरुण अक्षरशः सैरभैर झालेले होते. त्यांच्यामधील अस्फुट ऊर्जा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर पडू पाहत होती. लवकरच त्या उर्जेला दिशा मिळणार होती. 

पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISI याच संधीची अनेक वर्षे वाट पाहत होती. पाकिस्तानचे राष्ट्रपती, जनरल झिया-उल-हक यांनी पाहिलेले स्वप्न, आणि त्यातून जन्माला आलेली  योजना, म्हणजेच 'ऑपरेशन टोपाक' कार्यान्वित करण्याकरिता पोषक वातावरण तयार झाले होते ...
   

(क्रमश:)
(प्रस्तुत लेखमालेचा अंतिम भाग पुढे...)
 
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मंगळवार, २८ जून, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग २५

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग २४ नंतर पुढे चालू...) 

२ जुलै १९८४ रोजी अचानकच, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल श्री. जगमोहन यांनी फारुख अब्दुल्ला सरकारचा राजीनामा मागितला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे बंडखोर नेते श्री. गुलाम मोहम्मद शाह यांना नवे सरकार स्थापन करण्यास सांगितले. तसे करण्यापूर्वी राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून फारुख अब्दुल्ला सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्यास सांगायला हवे होते, अशी टीका देशभरातील काँग्रेसविरोधी पक्षांकडून ऐकू येऊ लागली. 

भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष, श्री. अटल बिहारी वाजपेयींनी थेट गृहमंत्र्यांना विनंती केली की, राज्यपाल श्री. जगमोहन यांची कृती असमर्थनीय असल्यामुळे त्यांना तात्काळ राज्यपालपदावरून हटवले जावे. परंतु, श्री. गुलाम मोहम्मद शाह यांचे बुजगावणे मुख्यमंत्रीपदी बसवून राज्यकारभार आपल्या हातात घेण्याचा काँग्रेसचा डाव असल्यामुळे, कोणत्याही विरोधी पक्षाची कुरबूर ऐकून घेतली जाणार नव्हती हे उघडच होते. 

जम्मू-काश्मीरमध्ये या सर्व घडामोडी होत असताना पंजाबमध्ये एक रक्तरंजित नाट्य घडून गेलेले होते. १९८२-८३ पासूनच पाकिस्तानने पंजाबमध्ये फुटीरवाद भडकवायला सुरुवात केलेली होती. जम्मू-काश्मीरमध्येही तोपर्यंत झाल्या नसतील इतक्या अतिरेकी घटना, त्या दोन वर्षात पंजाबमध्ये घडल्या. खालिस्तानवादी अतिरेक्यांना पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा केला जात होता. प्रत्यक्ष सुवर्णमंदिरातून अतिरेकी कारवायांची सूत्रे हलवली जात होती. अखेर, खालिस्तानी चळवळ मोडून काढण्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतीय सैन्यावर सोपवली. जून १९८४ मध्ये सैन्याने 'ऑपरेशन ब्लू स्टार' यशस्वीपणे पार पाडले. परंतु, सैन्याने सुवर्णमंदिरात घुसून केलेल्या हल्ल्यामुळे शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला. 

'ऑपरेशन ब्लू स्टार'चे परिणाम अतिशय गंभीर आणि दूरगामी ठरले. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी दिल्लीमध्ये पंतप्रधान इंदिराजींची हत्या त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी केली. एके-४७ आणि रॉकेट लॉंचरसारखी आधुनिक व अतिशय घातक हत्यारे, पंजाबमधील फुटीरवादी तरुणांना अधिकाधिक प्रमाणात पाकिस्तानकडून छुप्या मार्गांनी पुरवली जाऊ लागली. पंजाबमधील अतिरेकी कारवाया कमी होण्याऐवजी वाढू लागल्या. सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेल्या जनरल अरुण वैद्यांना, पुणे कॅम्पमधील त्यांच्या घरासमोरच, दोन माथेफिरू शीख अतिरेक्यांनी १० ऑगस्ट १९८६ रोजी गोळ्या घातल्या आणि त्यांची निर्घृण हत्या केली. 

इंदिराजींच्या मृत्यूनंतर श्री. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले. देशातील विविध प्रदेशांमधून सुरु असलेल्या फुटीरवादी कारवायांना आळा घालण्यासाठी त्यांनी वाटाघाटी सुरु केल्या. २४ जुलै १९८५ रोजी, शिरोमणी अकाली दलाचे नेते श्री. हरचरण सिंग लोंगोवाल आणि पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांनी 'पंजाब शांतता करार' अमलात आणला. राजीव गांधी आणि आसामचे बंडखोर नेते श्री. प्रफुल्ल कुमार महंत यांच्यादरम्यान वाटाघाटी होऊन, १५ ऑगस्ट १९८६ रोजी आसाम शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पुढच्याच वर्षी, १९८७ मध्ये मिझोरमचा बंडखोर नेता श्री. लालडेंगा यांच्यासोबतही एक शांतता करार झाला. 

इतर प्रदेशांमध्ये हे शांतता करार केले जात असताना, काश्मीरमध्ये अधूनमधून अतिरेकी घटना घडतच होत्या. पण, काँग्रेसच्या पाठिंब्यावर लटपटत उभे असलेले श्री. गुलाम मोहम्मद शाह यांचे राज्य सरकार,  या घातपाती कारवाया थांबवण्यासाठी फारसे काहीच करीत नव्हते. अतिरेक्यांची भूमिका भारतविरोधी असली तरी ते इस्लामचे पुरस्कर्ते होते, आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांचा त्यांना अंतस्थ पाठिंबादेखील होता. शेख अब्दुल्लांच्या मृत्यूनंतर, जमात-ए-इस्लामी पक्ष आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांचाच पगडा काश्मिरी जनतेवर बसत चाललेला होता. त्यामुळे, अतिरेक्यांविरुद्ध काही कारवाई केल्यास काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम जनतेचा रोष ओढवण्याची भीती शाह सरकारला होती. म्हणूनच, त्या अतिरेकी घटनांकडे काणाडोळा करणेच त्यांच्यासाठी सोयिस्कर होते.

काश्मीरमध्ये घडत असलेल्या अतिरेकी कारवाया आणि हिंसक घटनांमध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही, पाकिस्तानी गुप्तहेर संघटना, 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (ISI) चा हात त्यांमागे होता यात तिळमात्र शंका नाही. राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला होता. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे, सुशिक्षित बेकारांची कमतरता जम्मू-काश्मीरमध्ये कधीच नव्हती. जम्मू-काश्मीरच्या राजकारणामध्ये केंद्र सरकारचा वाढता हस्तक्षेप आणि त्यांनी किल्ली दिलेल्या एखाद्या खेळण्याप्रमाणे चाललेला राज्य सरकारचा कारभार पाहून काश्मिरी जनतेमधला असंतोष अधिकच बळावत चालला होता. या राजकीय खेळाला, "हिंदू भारत सरकार" विरुद्ध "मुस्लिम जम्मू-काश्मीर" असा धार्मिक रंग देण्याचे काम मुस्लिम कट्टरपंथी लोक बेमालूम करीत होते. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, ISI फक्त तोफेला बत्ती देण्याचे काम करीत होती. तोफगोळे म्हणून वापरायला सुशिक्षित-बेकार, वैफल्यग्रस्त काश्मिरी तरुण होतेच!  

जम्मू-काश्मीरच्या त्या वेळेपर्यंतच्या इतिहासातली, मुस्लिम व हिंदू समुदायांदरम्यानची सर्वात मोठी दंगल १९८६ साली अनंतनागमध्ये झाली. या दंगलीमध्ये प्रथमच मुस्लिम नागरिकांनी त्यांच्या हिंदू बांधवाना धमकावले आणि भयभीत करून सोडले. या दंगलीची पार्श्वभूमी बरीचशी विचित्र आणि काहीशी रहस्यमयदेखील आहे, आणि ती  जाणून घेणे महत्वाचे आहे. 

'शाह बानो खटला' या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रकरणी, १९८५ साली सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयानुसार, एका घटस्फोटित मुस्लिम महिलेला आजन्म पोटगी मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. परंतु, हा निर्णय 'शरिया' कायद्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत, 'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' संघटनेने राजीव गांधी सरकारची कोंडी करणे सुरु केले. त्या दबावाखाली येऊन तत्कालीन राजीव सरकारने १५ जानेवारी १९८६ रोजी घोषणा केली की एक नवीन कायदा अमलात आणला जाईल आणि मुस्लिम 'शरिया' कायद्यातील पोटगीबाबतच्या तरतुदी अबाधित ठेवल्या जातील. [तसा कायदा मे १९८६ मध्ये आणला गेला आणि त्यायोगे सर्वोच्च न्यायालयाच्या युगप्रवर्तक निर्णयावर बोळा फिरवला गेला!] 

१५ जानेवारी १९८६ रोजी राजीव गांधींनी केलेल्या घोषणेविरुद्ध बहुसंख्य हिंदू समुदायात खळबळ माजली आणि संपूर्ण देशात 'समान नागरी कायदा' लागू करण्याच्या मागणीने जोर धरला. अशा परिस्थितीमध्ये, हिंदू समुदायासाठी असे काहीतरी करणे आवश्यक होते ज्यायोगे शाह बानो खटला आणि त्याविरुद्धचा प्रस्तावित कायदा यांचा लोकांना विसर पडू शकेल. उत्तर प्रदेशात भराभर सूत्रे हलवली गेली आणि फैझाबादच्या जिल्हा न्यायालयाने १ फेब्रुवारी १९८६ रोजी आदेश जारी केला की बाबरी मशिदीवर वर्षानुवर्षे लागलेले कुलूप  उघडण्यात यावे. या आदेशामुळे, हिंदूंची कैक वर्षांपासूनची एक मागणी पूर्ण होणार होती. रामजन्मभूमीच्या जागेवर शिलान्यास करून पुढे राम मंदिराची उभारणी करण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता!
 
अपेक्षेप्रमाणे, फैझाबादच्या जिल्हा न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय अमलात येताच, 'शाह बानो', शरिया' आणि संबंधित सर्वच बाबींचा जनतेला विसर पडला! 

हिंदू व मुस्लिमांच्या दरम्यान संपूर्ण भारतात उडू लागलेल्या ठिणग्या वेळीच शमवण्यात राजीव गांधींना यश आले असले तरी, जम्मू-काश्मीरमध्ये मात्र भडका उडालाच. शाह बानो खटला आणि 'शरिया' कायद्याच्या प्रकरणी काश्मिरी मुस्लिमांमध्ये असंतोष पसरवण्याचे काम स्थानिक धार्मिक नेते करीत होते. त्याच भरात, जानेवारी १९८६ मध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री, गुलाम मोहम्मद शाह यांनी आदेश दिला की जम्मूमधील सचिवालयाच्या आवारात एक मशीद बांधण्यात यावी. या आदेशाला जम्मूमधील हिंदू संघटना आणि जनतेकडून प्रचंड विरोध सुरु झाला व मशिदीचे बांधकाम थांबवण्यात आले. बाबरी मशिदीचे कुलूप उघडण्याच्या निर्णयानंतर मात्र, श्रीनगरमध्ये आणि राज्यातील इतर शहरांमध्ये मुस्लिमांची आंदोलने सुरु झाली.  

अनंतनागमध्ये उसळलेल्या मोठ्या दंगलीची मूळ कारणे जराशी रहस्यमय आहेत. एक शक्यता अशी सांगितली जाते की, मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शाह यांनीच अनंतनागमधील आपल्या एका भाषणात, जम्मू-काश्मीर राज्य व देशातील परिस्थितीचे अतिरंजित वर्णन करून, "इस्लाम खतरे में है" अशी घोषणा केली, आणि त्यामुळेच तेथील मुसलमान पेटले. दुसरा एक मतप्रवाह असाही आहे की, बऱ्याच काळापासून मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत असलेले, अनंतनागचे तत्कालीन आमदार, श्री. मुफ्ती मोहंमद सईद यांनीच राज्य सरकारला गोत्यात आणण्यासाठी ही दंगल भडकवली होती. 

दंगलीची कारणे काहीही असोत, पण जम्मू-काश्मीरमध्ये जवळजवळ प्रथमच, सामान्य अल्पसंख्याक हिंदूंना तेथील मुसलमान नागरिकांची दहशत बसली! सामान्य नागरिकांची ही समस्या केंद्रातील काँग्रेस सरकारला कितपत जाणवली असेल ते सांगता येणार नाही, पण जम्मू-काश्मीरमध्ये आपणच गादीवर बसवलेले शाह सरकार ही आपलीच एक मोठी डोकेदुखी होऊन बसल्याचे काँग्रेसला निश्चित जाणवले. त्या समस्येवर रामबाण उपाय हाताशी होताच, कारण राज्यपाल तेच होते, श्री. जगमोहन मल्होत्रा! 

दि. ७ मार्च १९८६ रोजी, पंतप्रधान राजीव गांधींच्या सूचनेबरहुकूम, राज्यपाल श्री. जगमोहन यांनी श्री. गुलाम मोहम्मद शाह यांचे सरकार बरखास्त केले आणि राज्यामध्ये राज्यपाल राजवट लागू केली. श्रीनगरमधले सरकार दिल्लीश्वरांच्या इच्छेने गादीवर बसते, आणि दिल्लीश्वरांची इच्छा असेपर्यंतच टिकते, हा समज जम्मू-काश्मीरच्या जनतेमध्ये अधिकच दृढ झाला.   

१९८५ पासून शांतता करारांचा सपाटा लावलेल्या राजीव गांधींना कदाचित अशी अशा वाटू लागली असावी की, फारुख अब्दुल्लांना जवळ करून, असाच एखादा 'काश्मीर शांतता करार' आपण केला तर काश्मीर प्रश्न चुटकीसरशी सुटेल. किंबहुना, काश्मीरमध्ये निदान तात्पुरती शांतता नांदण्याची व्यवस्था झाल्यास, केंद्रातील सत्तेवर आपली पकड अधिक मजबूत होईल, आणि राज्यातही आपले नाणे चालेल, असे राजीव गांधींच्या सल्लागारांनी त्यांना पटवले असावे. वस्तुस्थिती जी असेल ती असो, पण सत्तेबाहेर असलेल्या आणि पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहत असलेल्या फारुख अब्दुल्लांसाठी एक दैवदत्त संधीच चालत येत होती!

फारुख अब्दुल्लांसोबत राजीव गांधींच्या अनौपचारिक वाटाघाटी सुरु झाल्या. दोघांच्या वयांमध्ये फारसे अंतर नसल्याने, त्यांच्यात सलोखाही लगेच निर्माण झाला. १९७५ साली, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे सरकार असतानादेखील, इंदिराजींनी सत्तेपासून दूर असलेल्या शेख अब्दुल्लांसोबत हातमिळवणी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती राजीव गांधी आणि फारुख अब्दुल्लांच्या वाटाघाटींमुळे होऊ घातली होती. परंतु, शेख अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला या दोन राजकीय नेत्यांमध्ये कमालीचा फरक होता. गरज भासल्यास धर्मापलीकडेही जाऊन आपल्या प्रदेशाची 'काश्मिरीयत' जपण्याची मानसिकता, प्रगल्भ राजकीय समज, आणि जनतेच्या नाडीची अचूक पकड, हे शेख अब्दुल्लांचे गुण फारुख अब्दुल्लांमध्ये नावापुरतेदेखील नव्हते. दुर्दैवाने, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्वांमध्येही असाच काहीसा फरक होता. त्यामुळे, राजीव-फारुख करारामुळे काश्मीर प्रश्न सुटण्याऐवजी अधिकाधिक चिघळत जाणार हे विधिलिखित होते. परंतु, त्या काळी त्याची कल्पना कोणालाही येणे अशक्य होते. 

शाह सरकार बरखास्त केल्यानंतर, विधानसभेकरिता मुदतपूर्व निवडणूक जाहीर करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही राज्यपालांची राजवट का लागू केली गेली? अर्थातच, त्यामागे  काँग्रेसचे राजकीय गणित होते. राज्यात वर्चस्व टिकवू शकेल इतपत राज्यामधली काँग्रेसची पक्ष-संघटना सक्षम झालेली नव्हती. स्वबळावर सत्ता मिळवणे काँग्रेसला अशक्य होते. घशाला सत्तेची कोरड पडलेल्या फारुख अब्दुल्लांना मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून त्यायोगे सत्तेचा लगाम आपल्या हाती घेणे हाच पर्याय काँग्रेसकरिता श्रेयस्कर ठरणार होता. पण तसे करण्याआधी, काँग्रेसमधले मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार, श्री. मुफ्ती मोहम्मद सईद यांना राजीव गांधींनी  राज्यसभेमध्ये निवडून आणले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद बहाल केले. 

बरेच महिने चाललेल्या राजीव-फारुख वाटाघाटी  यशस्वी झाल्या, आणि ७ नोव्हेंबर १९८६ रोजी डॉ. फारुख अब्दुल्ला तिसऱ्यांदा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले. 



(क्रमशः)
(भाग २६ पुढे…)

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शनिवार, १८ जून, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग २४

 #काश्मीरचे_अश्रू 

(भाग २३ नंतर पुढे चालू...) 

१९८२ साली शेख अब्दुल्लांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी सुमारे ७-८ वर्षांपासूनच 'काश्मिरीयत' जपण्यासाठीच्या मूळ आंदोलनाचे स्वरूप बदलत चालले होते. अर्थात, हा बदल घडवून आणणाऱ्या स्थानिक लोकांवर पाकिस्तानचा वरदहस्त असला तरीही, लक्षवेधी बाब अशी होती की हे सगळे पाकिस्तानच्या प्रत्यक्ष सहभागाविना घडत चालले होते. पाकिस्तानने १९६५ सालापासून लावलेली विषवेल आता काश्मीरच्या मातीत रुजली होती, आणि लवकरच त्याला विषारी फळे येणार होती. 'काश्मिरी आंदोलना'चे रूपांतर हळूहळू 'मुस्लिम आंदोलना'त होण्यामागे काही ठळक कारणे होती. 

सर्वप्रथम, १९५३ ते १९७५ या दोन दशकांतील पुष्कळ काळ शेख अब्दुल्ला तुरुंगात असल्याने, मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यावरची त्यांची पकड ढिली झाली होती. तीच संधी साधून, केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षाने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घोडेबाजार मांडला होता. १९७२ च्या निवडणुकीमध्ये 'नॅशनल कॉन्फरन्स' पक्षाचा बहुसंख्य मुस्लिम मतदार वर्ग आपल्याकडे खेचण्यात 'जमात-ए-इस्लामी' पक्ष यशस्वी झाला होता. १९७५ मध्ये झालेल्या इंदिरा-शेख करारामध्ये शेख अब्दुल्लांनी जनमतचाचणीची मागणी सोडून देऊन, काश्मिरी लोकांच्या हिताचा सौदा केला असल्याची भावना काश्मिरी मुस्लिम जनतेत बळावली होती. ही भावना भडकवण्यामध्ये कट्टरपंथी धार्मिक नेत्यांसोबत जमात-ए-इस्लामी पक्षाचे नेतृत्वदेखील सामील होते. 

जमात-ए-इस्लामीने उघड-उघड काश्मीरचे इस्लामीकरण चालवले होते. त्यांनी संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये अनेक मदरसे उघडून गोरगरिबांना मोफत धर्मशिक्षण द्यायला सुरु केले होते. 'जमात-ए-इस्लामी'कडून शेख अब्दुल्लांना परस्पर शह बसत असल्याचे पाहून, काँग्रेस सरकार 'जमात-ए-इस्लामी' च्या कारवायांकडे डोळेझाक करीत होते. त्यामुळे, काँग्रेस सरकारने काश्मीरच्या इस्लामीकरणाला अप्रत्यक्षपणे खतपाणीच घातले, असे म्हणावे लागेल. याचे एक ठळक उदाहरण म्हणून, 'इस्लामी जमियत-ए-तुलाबा' (IJT), या 'जमात-ए-इस्लामी'च्या युवक संघटनेने, १९७९पासून चालवलेल्या उद्योगांकडे पाहता येईल. 

इराणच्या मुस्लिम युवक मोर्च्याकडून प्रेरणा घेऊन, IJT ने १९७९ साली, जम्मू-काश्मीरमध्ये एक आंदोलन सुरु केले. सर्व शाळा-कॉलेजांमधून इस्लामचे धर्मशिक्षण अनिवार्य असावे अशी त्यांची मागणी होती. त्याच वर्षी त्यांनी जगभरातल्या इस्लामी युवक मोर्च्यांच्या प्रतिनिधींचे एक संमेलन श्रीनगरमध्ये घडवून आणले. त्यायोगे, 'जागतिक मुस्लिम युवक संघटना' व 'आंतरराष्ट्रीय मुस्लिम विद्यार्थी संघ' या दोन संस्थांचे सदस्यत्व IJT ला मिळाले. पुढच्याच वर्षी, १९८० साली, IJT ने  श्रीनगरमध्ये एक जागतिक इस्लामी संमेलन आयोजित केले. या संमेलनाला, मक्का व मदिनाच्या मुख्य इमामांसह जगभरातून अनेक मोठे मुस्लिम धर्मगुरू व इस्लामी नेते हजर राहिले. या संमेलनासाठी येणाऱ्या सर्व महाभागांना भारत सरकारने मनाई तर केली नाहीच, पण मुक्तहस्ताने व्हिसा देऊन, एका परीने त्यांचे स्वागतच केले!
[संदर्भ: पृष्ठ १३१, "India, Pakistan, and  the Secret Jihad: The covert war in Kashmir, 1947–2004" - लेखक : प्रवीण स्वामी]

काश्मिरी मुस्लिम मतदारवर्ग 'जमात-ए-इस्लामी' कडे खेचला जात असल्याचे पाहून शेख अब्दुल्लांची झोप उडाली होती. त्यामुळे, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी दुहेरी नीती अवलंबली. एकीकडे, IJT च्या कारवायांवर चाप बसवण्यासाठी, ऑगस्ट १९८० मध्ये होणाऱ्या जागतिक मुस्लिम युवा परिषदेच्या बैठकीवर राज्य सरकारने बंदी घातली. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरात मूळ धरू लागलेल्या 'जागतिक मुस्लिम चळवळी'ला आळा घालण्यासाठी, 'काश्मिरी मुस्लिम' ही एक स्वतंत्र ओळख सर्व काश्मिरी लोकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न शेख अब्दुल्लांनी सुरु केला. तसेच, काश्मीर खोऱ्याबाहेर एक 'बृहत काश्मीर' निर्माण करण्यासाठी बौद्ध-बहुल लडाखमधून मुस्लिम-बहुल कारगिल जिल्हा त्यांनी वेगळा काढला. 

त्याच वर्षी, म्हणजे मार्च १९८० मध्ये शेख अब्दुल्ला सरकारने 'जम्मू-काश्मीर निर्वासित पुनर्वसन विधेयक' राज्याच्या विधानसभेसमोर मांडले. जम्मू-काश्मीर राज्याचे जे रहिवासी मार्च १९४७ ते मे १९५४ दरम्यान पाक-व्याप्त भागामध्ये पळून गेलेले होते त्यांना त्यांच्या मूळ गावी परत येण्याचा मार्ग, या नव्या विधेयकानुसार मोकळा होणार होता. अट फक्त इतकीच होती की, पाक-व्याप्त भागातून परतणाऱ्या अशा सर्व निर्वासित लोकांना, जम्मू-काश्मीर राज्याच्या आणि भारत देशाच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे बंधनकारक होते. 

प्रथमदर्शनी, 'जम्मू-काश्मीर निर्वासित पुनर्वसन विधेयका'मध्ये काहीच वावगे नव्हते. परंतु, त्यामध्ये एक मोठीच गोम दडलेली होती. मीरपूर, पूंछ, गिलगिट किंवा बाल्टिस्तानमधून काश्मीर खोऱ्यात व जम्मू प्रदेशात पळून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासित लोकांना मात्र पाक-व्याप्त प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी परत जाण्याचा काहीही मार्ग उपलब्ध नव्हता. म्हणजेच, या विधेयकाद्वारे फक्त मुस्लिमांसाठी एकेरी मार्ग उघडला जाणार होता! 

एकंदरीतच, जमात-ए-इस्लामी पक्ष व सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, या दोघांमध्ये, काश्मीर खोऱ्यातील बहुसंख्य मुस्लिम मतदार वर्गाला, धर्माच्या आधारे स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अहमहमिका सुरु झालेली होती. त्यामुळे, संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्यातील गैरमुस्लिम जनतेवर अन्याय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले होते, आणि पाकिस्तानला नेमके हेच हवे होते. 

जम्मू-काश्मीरमध्ये, निर्वासितांचे पुनर्वसनदेखील एक धार्मिक वादाचा मुद्दा होऊन बसणार हे उघड दिसत होते. म्हणूनच, 'जम्मू-काश्मीर निर्वासित पुनर्वसन विधेयक' जम्मू-काश्मीर विधानसभेत मंजूर होऊ न देण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने शक्य तितक्या सर्व आडकाठ्या घालून पाहिल्या. परंतु, दीर्घकालीन चर्चेनंतर, एप्रिल १९८२ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेत आणि विधान परिषदेतही हे विधेयक पारित करण्यात आले. तरीदेखील, केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल, श्री. ब्रज कुमार नेहरू यांनी ते विधेयक पाच महिने रोखून धरल्यानंतर पुनर्विचारासाठी विधानसभेकडे परत पाठवून दिले.     

सप्टेंबर १९८२ मध्ये, शेख अब्दुल्लांच्या मृत्यूनंतर डॉ. फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाले, आणि ६ ऑक्टोबर १९८२ रोजी 'जम्मू-काश्मीर निर्वासित पुनर्वसन विधेयक' विधानसभेमध्ये पारित होऊन तो कायदा संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्यामध्ये लागू झाला! [हा कायदा २०१९ साली रद्दबातल करण्यात आला आहे]

केंद्रामध्ये जनता सरकारचे कडबोळे इतिहासजमा होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेमध्ये आलेल्या होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये नव्यानेच गादीवर बसलेले, अननुभवी फारूख अब्दुल्ला काही मोठी कुरापत करतील अशी भीती इंदिराजींना नव्हती. परंतु, एप्रिल-मे १९८३ च्या सुमाराला डॉ. फारूख अब्दुल्लांनी केंद्र सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले. दक्षिण भारतातील चार गैर-काँग्रेसी राज्य सरकारांनी, केंद्र व राज्यांच्या परस्परसंबंधांचा फेरविचार व्हावा अशी मागणी लावून धरलेली होती. त्या मागणीला डॉ. फारूख अब्दुल्लांनी आपला पाठिंबा जाहीर करत म्हटले,"केंद्र सरकारला भारतीय गणराज्यातील विविध राज्यांच्या अस्मितेविषयी काहीही देणे-घेणे नसावे हे दुर्दैव आहे..."

इंदिराजी त्या चार दक्षिण भारतीय मुख्यमंत्र्यांवर नाखूष झाल्या असल्या तरी फारसे काही करू शकत नव्हत्या. कारण, तो काळ भारतासाठी अतिशय कठीण होता. ईशान्य भारतात दहशतवाद बळावला होताच. शिवाय पंजाबमध्ये पाकिस्तानप्रणीत खालिस्तानी अतिरेकी डोके वर काढू लागले होते. इंदिराजींनी बाका प्रसंग ओळखला आणि केंद्र-राज्य संबंधांचा फेरविचार करण्यासाठी, न्यायमूर्ती रणजित सिंग सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त केला. मात्र, डॉ. फारूख अब्दुल्लांनी दक्षिण भारतीय राज्यांना दिलेल्या पाठिंब्याची दखल घेऊन इंदिराजींनी त्यांच्याविषयी काहीतरी खूणगाठ मनाशी निश्चितच बांधली असणार. 

त्या काळापर्यंत, जम्मू-काश्मीरच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी इतर भारतीय राज्यांपेक्षा आपली प्रतिमा निराळी, 'एक विशेष दर्जा प्राप्त असलेले राज्य' अशीच राखलेली होती. इतर राज्यांमधील घडामोडींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले नव्हते. पण फारुख अब्दुल्लांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे, जम्मू-काश्मीर हेदेखील भारतातील इतर राज्यांसारखेच एक असल्याचे चित्र प्रथमतःच तयार झाले होते. त्यामुळे, जम्मू-काश्मीरचे भारतातील विलीनीकरण संपूर्ण आणि निर्विवाद असल्याचे सिद्ध करण्याची एक नामी संधी इंदिराजींना उपलब्ध झालेली होती. 

जून १९८३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत हातमिळवणी करण्याचा काँग्रेसचा इरादा सपशेल फसला. डॉ. फारूख अब्दुल्लांनी काँग्रेससोबत युती करण्याचे नाकारले. त्याऐवजी त्यांनी मुस्लिम धर्मगुरू, मिरवाईझ मोहम्मद फारूख यांना विनंती केली की त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्ससाठी प्रचार करावा. जम्मू-काश्मीरचे इस्लामीकरण करू पाहणाऱ्या कट्टरपंथी लोकांना आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी जणू आमंत्रणच मिळाले!

जम्मू-काश्मीरच्या त्या वेळेपर्यंतच्या इतिहासाप्रमाणेच, जून १९८३च्या विधानसभा निवडणुकीतही अनेक गैरप्रकार झाले. काँग्रेस पक्षाकडून गैरप्रकाराच्या ४०पेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्याविरोधात नॅशनल कॉन्फरन्सकडून उघड-उघड असा आरोप केला गेला की, निवडणूक आयोग म्हणजे, निव्वळ केंद्र सरकारच्या हातातली कळसूत्री बाहुली आहे. अखेर, नॅशनल कॉन्फरन्सने निर्विवाद बहुमत मिळवले आणि डॉ. फारुख अब्दुल्ला स्वबळावर मुख्यमंत्री झाले. डिवचल्या गेलेल्या इंदिराजी फारूख अब्दुल्लांना कोणत्याही प्रकारे डोईजड होऊ देणार नव्हत्या. पण त्या योग्य संधीची वाट पाहायला तयार होत्या. 

सप्टेंबर १९८२ मध्ये फारुख अब्दुल्ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्या वेळेपासूनच, जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी दंगे घालायला सुरुवात केली होती. विधानसभा निवडणूक जिंकून, १२ जून १९८३ रोजी फारुख अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १३ जूनला, श्रीनगरच्या 'इंडिया कॉफी हाऊस'मध्ये एक बॉम्बस्फोट झाला. दोनच महिन्यात, १५ ऑगस्ट १९८३ रोजी श्रीनगर स्टेडियममध्ये, मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला स्वातंत्र्यदिनाची मानवंदना स्वीकारीत असतानाच, एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या दोन्ही घटनांची गांभीर्याने दखल घेत पंतप्रधान इंदिराजींनी फारुख अब्दुल्लांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. इंदिराजींनी आपली चिंता त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि पुढील पावलांसंबंधी त्यांच्यासोबत चर्चाही केली. परंतु, फारुख अब्दुल्लांच्या हातून फारसे काही होणार नव्हते, आणि इंदिराजींनी ते ताडले होते. 

एक अतिशय लाजिरवाणी घटना १३ ऑक्टोबर १९८३ रोजी श्रीनगर स्टेडियममध्ये घडली. कर्णधार कपिल देवचा भारतीय संघ क्लाइव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीज संघासोबत, पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणार होता. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघावर दगडफेक करीत, काही प्रेक्षकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली, आणि मैदानात घुसून खेळपट्टीच उखडून काढली. कालांतराने, 'Runs and Ruins' या आपल्या पुस्तकात सुनील गावस्करने लिहिले की, भारताच्याच भूमीवर, आणि तेही भारत व वेस्ट इंडीज संघांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यात, 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा ऐकू येणे हा एक विचित्र आणि अत्यंत क्लेशदायक अनुभव होता!

फारूख अब्दुल्ला सरकारच्या नाकर्तेपणामुळे म्हणा, किंवा त्यांनी सोयीस्कर डोळेझाक केल्यामुळे असेल, पण लहान-सहान अतिरेकी हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये होतच राहिले. 

१८ नोव्हेंबर १९८३ रोजी जम्मू-काश्मीर हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री. आदर्श सेन आनंद यांच्या बंगल्याच्या आवारात एक स्फोट घडवून आणण्यात आला. ११ फेब्रुवारी १९८४ रोजी JKLF या फुटीरवादी संघटनेचा संस्थापक, मकबूल भट याला फासावर लटकवले गेल्यानंतर, त्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये उमटले. २९ मार्च रोजी अनंतनागमध्ये, आणि ११ एप्रिल १९८४ रोजी काश्मीर विद्यापीठाच्या आवारात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. श्रीनगर सत्र न्यायालयामध्ये अतिरेकी मकबूल भट याला १९६८ साली ज्यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती, ते वयोवृद्ध, निवृत्त न्यायाधीश श्री. नीलकंठ गंजू यांच्या घरावर २२ एप्रिल १९८४ रोजी बॉम्ब फेकण्यात आला. (त्या हल्ल्यात श्री. गंजू बचावले, मात्र १९८९ साली अतिरेक्यांनी त्यांचा बळी घेतलाच.)

नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांचे परस्परसंबंध १९८३ सालच्या निवडणुकांपासूनच ताणले गेलेले होते. काँग्रेसच्या नाकावर टिच्चून, फारुख अब्दुल्लांनी त्या निवडणुकीत पंजाबमधील अकाली दलाचा पाठिंबा मिळवलेला होता. खलिस्तानवादी अतिरेक्यांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये प्रशिक्षण शिबिरे चालवली जात असल्याचे आरोप त्या काळी केले जात होते. 

जम्मू-काश्मीरमधील तत्कालीन परिस्थितीबद्दल बोलताना काँग्रेस सरकारचे माजी मंत्री मोहम्मद शफी कुरेशी म्हणाले होते, "काश्मीरमध्ये तुम्ही जर 'हिंदुस्थान झिंदाबाद' अशी घोषणा दिलीत तर तुम्हाला ठार मारले जाऊ शकते. पण 'पाकिस्तान झिंदाबाद' किंवा 'भारतीय कुत्र्यांनो, चालते व्हा' अशा घोषणा देणारे लोक मात्र इथे मालामाल होतात." काँग्रेसचे वरिष्ठ नेते कृष्णचंद्र पंत यांनी तर सरळसरळ आरोप करीत म्हटले होते, "फारुख अब्दुल्ला जाणून-बुजून भारतविरोधी शक्तींच्या हातांमधले खेळणे बनत चालले आहेत."

राज्यातल्या त्या वेळच्या परिस्थितीमुळे, आणि फारुख अब्दुल्लांच्या वाढत्या भ्रष्टाचारामुळे, नॅशनल कॉन्फरन्समध्ये  फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली होती. नॅशनल कॉन्फरन्सचेच एक आमदार श्री. शेख अब्दुल जब्बार यांनी फारुख अब्दुल्लांच्या भ्रष्टाचारांबद्दल एक पत्र लिहून भारताच्या राष्ट्रपतींकडे धाडले होते. फारुख अब्दुल्लांचे मेहुणे व शेख अब्दुल्लांचे जावई, श्री. गुलाम मोहम्मद शाह यांना हाताशी धरून, नॅशनल कॉन्फरन्समध्ये पडत चाललेल्या फुटीत पाचर मारण्याचे काम काँग्रेस पक्ष चोख बजावीत होता. 

दि. २४ एप्रिल १९८४ रोजी श्री. गुलाम मोहम्मद शाह व त्यांच्या पत्नी (फारुख अब्दुल्लांची थोरली बहीण) बेगम खालिदा शाह यांनी उघडपणे फारुख अब्दुल्लांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आमदाराला समर्थन दिले. त्याच रात्री बेगम खालिदा शाह यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. राज्यातील तत्कालीन राजकीय वातावरण किती दूषित झालेले होते याची कल्पना यावरून करता येते. 

इंदिराजी ज्याची वाट पाहत होत्या ती परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये उद्भवल्याचे दिसताच त्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपले प्यादे पुढे सरकवले. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल श्री. ब्रज कुमार नेहरू यांना हटवून, त्यांच्या जागी एका खास व्यक्तीची नेमणूक करण्याची शिफारस इंदिराजींनी राष्ट्रपतींकडे पाठवली.

देशातील आणीबाणीच्या काळात, दिल्लीच्या तुर्कमान गेट परिसरातील बांधकामे पाडण्याच्या प्रकरणी चांगलेच चर्चेत आलेले ते अधिकारी, १९७५-७६ दरम्यान दिल्ली विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, आणि श्री. संजय गांधींच्या खास मर्जीतले मानले जात असत. १९८१-१९८२ या काळात गोव्याचे, आणि १९८२ ते १९८४ दरम्यान दिल्लीचे नायब राज्यपाल असलेली ती व्यक्ती पुढे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक चर्चित राज्यपाल म्हणून प्रसिद्ध होणार होती. 

दि. २६ एप्रिल १९८४ रोजी, श्री. जगमोहन मल्होत्रा यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यानंतरच्या काळात नॅशनल कॉन्फरन्समधील कुरबुरी वाढतच गेल्या. दि. १ जुलै १९८४ च्या रात्री साडेदहा वाजता, श्री. गुलाम मोहम्मद शाह व त्यांच्या समर्थकांनी श्री. जगमोहन यांना भेटून फारुख अब्दुल्ला सरकारवरील अविश्वासाचे पत्र दिले. 

एका वर्षांपूर्वीच, निर्विवाद बहुमताने निवडून आलेले फारुख अब्दुल्ला सरकार अल्पमतात आल्याची घोषणा राज्यपाल श्री. जगमोहन यांनी केली आणि दि. २ जुलै १९८४ रोजी श्री. गुलाम मोहम्मद शाह यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले. 

जम्मू-काश्मीरच्या करुण नाट्यामधल्या आणखी एका अंकाची घंटा वाजली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 




(क्रमशः)
(भाग २५ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मंगळवार, ३१ मे, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग २३

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग २२ नंतर पुढे चालू...) 

१९७१ साली 'अल फतेह' संघटना संपली असली तरी, त्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची खुमखुमी जिरलेली नव्हती. शिवाय १९७२ सालापासून, 'अल फतेह' च्या असंख्य कार्यकर्त्यांना काँग्रेस सरकारने मोठया 'दिलदारपणे' सोडूनच दिलेले होते. इतकेच नव्हे तर 'अल फतेह' चा प्रमुख, गुलाम रसूल झाहगीर, आणि फझल-उल-हक कुरेशी व नझीर अहमद वाणी यांच्यासारखे कट्टर दहशतवादीदेखील स्वस्तात सुटले होते.

शेख अब्दुल्लांचे प्रतिनिधी, मिर्झा अफझल बेग आणि इंदिरा गांधींतर्फे गोपालस्वामी पार्थसारथी यांच्या दरम्यान १९७२ पासून सुरु असलेल्या गुप्त वाटाघाटींची कुणकुण, भारतविरोधी संघटना आणि व्यक्तींच्या कानापर्यंत हळूहळू पोहोचू लागलेली होती. काश्मिरी लोकांच्या हिताचा सौदा करून, शेख अब्दुल्ला मुख्यमंत्रीपद पटकावणार असल्याचा प्रचार, काश्मीरचे मिरवाईझ, मौलवी मोहम्मद फारूक करू लागले होते. फझल-उल-हक कुरेशी व नझीर अहमद वाणी यांच्यासारख्या दहशतवाद्यांना इंदिरा-शेख समझोता मानवण्यासारखा नव्हता. परिणामी, फझल-उल-हक कुरेशीच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर पीपल्स लीग नावाची, एक नवीच भारतविरोधी संघटना उभी राहिली.

एक समज असाही आहे की, १९७५ साली इंदिराजींसोबत करार करून, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या शेख अब्दुल्लांना एकीकडे आपल्या कृत्याचा पश्चात्तापही होत होता. शेख अब्दुल्लांची आणि त्यांच्या सर्वच कुटुंबीयांची विचारसरणी स्थिर, एकजिनसी आणि विश्वासार्ह कधीच नव्हती हे खरेच आहे. याचे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. 

एकीकडे इंदिरा-शेख कराराचा मसुदा पक्का होत असतानाच, म्हणजे मे १९७४ मध्ये, इंग्लंडमध्ये शिकत असलेले त्यांचे चिरंजीव, डॉ. फारूक अब्दुल्ला यांना पाकिस्तान भेटीचे आमंत्रण मिळाले होते. JKLF चे संस्थापक, मकबूल भट आणि अमानुल्ला खान या जोडगोळीने ते आमंत्रण दिले होते. त्या दोघांचा आग्रह असा होता की डॉ. फारूक अब्दुल्लांनी पाकिस्तान सरकारला पटवून द्यावे की त्यांचे वडील इंदिराजींसोबत जम्मू-काश्मीरचा सौदा करायला निघालेले नाहीत.

डॉ. फारूक अब्दुल्ला पाकिस्तान भेटीवर गेले. इतकेच नव्हे तर, व्याप्त काश्मीरमधील एका सभेत, अमानुल्ला खान आणि मकबूल भट यांच्यासोबत उभे राहून, हातात बंदूक घेऊन, डॉ. फारूक अब्दुल्लांनी जाहीरपणे शपथ घेतली, "अखेरच्या श्वासापर्यंत मी जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढेन. जर माझ्या वडिलांनी भारतासोबत जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्याचा सौदा केला तर माझ्या वडिलांच्या विरोधात सर्वप्रथम मी उभा राहीन!" 
[संदर्भ: पृष्ठ १२८-१२९, "India, Pakistan, and  the Secret Jihad: The covert war in Kashmir, 1947–2004" - लेखक : प्रवीण स्वामी]

जम्मू-काश्मीरमध्ये १९७२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवर 'प्लेबिसाईट फ्रंट' ने बहिष्कार टाकलेला होता. एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यापलीकडे शेख अब्दुल्लांचाही निवडणुकीत अजिबात सहभाग नव्हता. हीच संधी साधून, नॅशनल कॉन्फरन्सच्या परंपरागत मतदारांना जमात-ए-इस्लामी पक्षाने आपल्याकडे खेचायचा प्रयत्न केला. त्याला यश आले आणि जमात-ए-इस्लामी पक्षाने ५ जागा जिंकून काश्मीर खोऱ्यात आपले खाते उघडले. हळूहळू, त्या पक्षातर्फे असा प्रचार केला जाऊ लागला की, जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामचा पगडा कमी करून, राज्याचे 'हिंदूकरण' करण्याचा डाव भारत सरकार खेळत आहे.

जमात-ए-इस्लामी पक्षाने संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये लहान-मोठे मदरसे सुरु केले. त्यामध्ये पद्धतशीरपणे भारतविरोधी शिकवण दिली जात होती. १९७५ साली देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच जमात-ए-इस्लामी पक्षावरही बंदी घालण्यात आली. त्यावेळी, काश्मीर खोऱ्यातील मदरसे बंद करण्यात आले. त्या १२५ मदरशांमध्ये सुमारे २५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ५५० शिक्षक कार्यरत होते! 

राज्यातले मदरसे बंद पडल्यानंतर राज्य सरकारने एक घोडचूक केली. मदरशांमधली नोकरी गमावलेल्या त्या शिक्षकांची, चक्क सरकारी शाळांमध्ये नियुक्ती करून टाकली! म्हणजेच, पूर्वी मदरशांमधून जे भारतविरोधी विष विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये भरवले जात होते, ते आता राजरोसपणे शाळा-शाळांमधून घडू लागले! कालांतराने, बंद पडलेले अनेक मदरसे, 'खाजगी शाळा' या रूपामध्ये पुन्हा कार्यरत झाले, आणि एकूणच शिक्षणाचे इस्लामीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला!

शेख अब्दुल्ला आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरम्यान १९७५ साली झालेल्या करारामुळे जम्मू-काश्मीर सरकारमध्ये काही अंशी स्थैर्य आले. परंतु, राज्यामध्ये सरकार काँग्रेस पक्षाचे, आणि राज्यकारभाराच्या नाड्या मात्र बिगरकॉंग्रेसी मुख्यमंत्री, म्हणजेच शेख अब्दुल्लांच्या हातात, अशी काहीशी विचित्र परिस्थिती झालेली होती. 

मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्लांची अवस्थाही फारशी सुखद नव्हती. अनेक वर्षे राज्याच्या राजकारणातून बाहेर राहिल्यामुळे, त्यांच्या आसपास विश्वासू माणसेच उरली नव्हती. शेख अब्दुल्लांच्या पत्नी, बेगम अकबर जहाँ अब्दुल्ला, त्यांचा मुलगा डॉ. फारूक अब्दुल्ला, त्यांचे जावई गुलाम मोहम्मद शाह, आणि जुने सहकारी मिर्झा अफझल बेग, अशा काही मोजक्या माणसांना हाताशी धरून शेख अब्दुल्ला राज्यकारभार हाकत होते. अर्थातच, त्या काळात भ्रष्टाचार आणि 'जी-हुजूरी' प्रचंड प्रमाणात बोकाळली होती. 

१९७७ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये, काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी म्हणून, जमात-ए-इस्लामी पक्षाने जनता पक्षासोबत युती केली. त्या युतीमध्ये, नॅशनल कॉन्फरन्सच्या विचारधारेचा हाडवैरी असलेला भारतीय जनसंघ हा पक्षदेखील सामील होता. त्याचे भांडवल करून शेख अब्दुल्लांनी काश्मिरी जनतेच्या धार्मिक भावनांना साद घालायला सुरुवात केली. 

"मुस्लिमांच्या रक्ताने ज्याचे हात माखलेले आहेत अशा भारतीय जनसंघासोबत युती करणारा जमात-ए-इस्लामी पक्ष, मुस्लिमांचे काय भले करणार?" असा प्रश्न जनतेला विचारून लोकांना आपल्याकडे खेचायला शेख अब्दुल्लांनी मागे-पुढे पाहिले नाही. एकेकाळी धर्मनिरपेक्षतेची शपथ घेणाऱ्या शेख अब्दुल्लांनी तात्कालिक राजकीय फायद्यासाठी, काश्मीरमध्ये फोफावत असलेली धार्मिक तेढ अधिकच पक्की केली. 

असे असले तरी, शेख अब्दुल्ला उघडपणे आणि टोकाची भारतविरोधी भूमिका घेत नव्हते. मात्र, काही गर्भित धमक्या द्यायला ते चुकत नव्हते. आपल्या प्रचार भाषणात ते म्हणत, "जम्मू-काश्मीर राज्य हे भारताचे अविभाज्य अंग आहे. परंतु, आम्हाला योग्य तो सन्मान जर या देशात मिळणार नसेल तर आम्हाला वेगळे व्हावे लागेल!" 

मिर्झा अफझल बेग हे शेख अब्दुल्लांच्या इतकी सावधानताही बाळगत नव्हते. प्रचारसभांमध्ये भाषण करताना, एका खिशातून भारतीय समुद्री मीठ, व दुसऱ्या खिशातून हिरव्या रुमालात बांधलेले, पाकिस्तानी सेंधव मिठाचे खडे काढून ते लोकांना दाखवीत असत. मिर्झा अफझल बेग साहेबांची निष्ठा कोणत्या देशाच्या बाजूने होती हे लोकांना समजणे अजिबात अवघड नव्हते. नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते तर, मतदारांना पवित्र कुराणावर हात ठेवायला लावून, आपल्या पक्षाला मत देण्याची शपथ घ्यायला सांगत होते!  
[संदर्भ: पृष्ठ १२६,"India, Pakistan, and  the Secret Jihad: The covert war in Kashmir, 1947–2004" - लेखक : प्रवीण स्वामी]
 
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीतले हे सगळे तमाशे पाहून-ऐकून, सीमेपार बसलेल्या पाकिस्तान्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या तरच नवल होते! जम्मू-काश्मीरमध्ये अप्रत्यक्ष युद्ध (Proxy War) खेळण्याची जी नीती त्यांनी १९६५ नंतर अवलंबली होती ती आता मूळ धरू लागली होती. त्या विषवेलीला खतपाणी घालायचीही पाकिस्तानला फारशी गरज नव्हती. भारतातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते ते काम परस्परच करीत होते. त्या वेलीला विषारी फळे कधी येतात याचीच वाट पाकिस्तानी पाहत होते. आणखी १०-१२ वर्षांनी ती फळे येणार होती, पण त्यावेळी मात्र कोणालाच त्याची कल्पना असणे अशक्य होते.

निवडणुकांपूर्वीच्या प्रचारसभांमध्ये जरी शेख अब्दुल्लांनी काश्मिरी मुसलमानांच्या धार्मिक भावनांना साद घातली असली तरी, जून १९७७ मध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मात्र, त्यांनी पुन्हा सावध पवित्र घेतला. काँग्रेसच्या नाकावर टिच्चून, स्वबळावर सत्ता काबीज करण्याचे त्यांचे ध्येय साध्य झाले होते. जम्मू-काश्मीर भारतापासून तोडण्याची भाषा तर त्यांनी काढलीच नाही, परंतु, बहुसंख्य मुस्लिम जनतेला धार्जिणी असलेली नीतीदेखील त्यांनी उघडपणे राबवली नाही. त्यामुळे, निदान पुढील पाच वर्षे तरी, फुटीरतावादी अतिरेकी संघटनांना जम्मू-काश्मीरमध्ये फारसे डोके वर काढता आले नाही.  

१९७७ ते १९८२ या काळात, मोठ्या प्रमाणावर दहशतवाद जम्मू-काश्मीरमध्ये उफाळला नसला तरी, दहशतवादी लोक भूमिगत राहून कार्य करीतच होते. त्याच काळात, दक्षिण व मध्य-पूर्व आशिया खंडामधील काही देशांमध्ये अत्यंत महत्वाच्या उलाढाली झाल्या, ज्यांचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला पुढील अनेक दशके भेडसावणार होते. 

५ जुलै १९७७ रोजी, पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तोंना पदच्युत करून, जनरल मोहम्मद झिया-उल-हक हे पाकिस्तानचे लष्करशहा व राष्ट्रपती झाले. इस्लामचे अत्यंत कडवे पुरस्कर्ते असलेले जनरल झिया यांनी पुढील ११ वर्षे पाकिस्तानवर एकहाती राज्य केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत पाकिस्तानी लष्करासहित संपूर्ण देशाचे रूपांतर कट्टर इस्लामी देशात करून, निझाम-ए-मुस्तफ़ा (अर्थात प्रेषित पैगंबरांचे राज्य) लागू केले. साहजिकच, पाकिस्तानातील या मोठ्या बदलाचे परिणाम जम्मू-काश्मीर राज्याचे इस्लामीकरण करू पाहणाऱ्या कट्टरवाद्यांवरही झाले.  

जानेवारी १९७९ मध्ये आयतुल्लाह खोमेनीच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या इस्लामवादी अतिरेक्यांनी, इराणचे शहा, मुहम्मद रझा पेहेलवीच्या विरुद्ध बंड केले. प्रगतिशील इराणचे रूपांतर एका कट्टर इस्लामी राजवटीमध्ये झाले. पाठोपाठ डिसेंबर १९७९ मध्ये, अफगाणिस्तानात इस्लामी मुजाहिदीन घुसखोरांनी राज्य बळकावण्यासाठी संघर्ष सुरु केला. या मुजाहिदीन लोकांना अमेरिकेकडून अर्थसाहाय्य आणि पाकिस्तानमध्ये लष्करी प्रशिक्षण मिळत होते. इराण व अफगाणिस्तानातील उठावांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये अशाच प्रकारची स्वप्ने पाहणाऱ्या दहशतवाद्यांना मोठीच प्रेरणा मिळाली. 

एकेकाळी स्वतंत्र जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहिलेल्या शेख अब्दुल्लांनी त्यांच्याकडे चालत येणाऱ्या 'काळा'ची पावले वेळीच ओळखली होती. भारतीय राजकारणातल्या घराणेशाहीची परंपरा जपत, ऑगस्ट १९८१ मध्ये त्यांनी आपला मुलगा, डॉ. फारूक अब्दुल्ला याला जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचा अध्यक्ष नियुक्त केले. डॉ. फारुख अब्दुल्लांना तोपर्यंत राजकारणाचा अनुभव जवळजवळ नव्हताच. शिवाय, काही दशकांच्या संघर्षातून शेख अब्दुल्लांना आलेली राजकीय समज आणि परिपक्वता तर फारुख अब्दुल्लांकडे अजिबात नव्हती. तरीही, 'राजा' मरण पावल्यास 'राजपुत्र' गादीवर बसणार हे जणू ठरलेलेच होते. 

८ सप्टेंबर १९८२ रोजी शेख अब्दुल्लांचा मृत्यू झाला आणि डॉ. फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाले...    

(क्रमशः)
(भाग २४ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शनिवार, २८ मे, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग २२

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग २१ नंतर पुढे चालू...) 

भारतीय सुरक्षा यंत्रणेने १९७१ साली 'अल फतेह' आणि त्याआधी 'मास्टर सेल', या दोन्ही संघटना नेस्तनाबूत केल्या खऱ्या, पण त्यामध्ये सहभागी असलेले काश्मिरी कार्यकर्ते मात्र जिथल्या तिथेच होते. त्यापैकी काही प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात असले तरी इतर अनेक सदस्य मोकाटच होते. मात्र, पूर्व बंगालमधील जनतेच्या उठावामुळे त्रस्त झालेले पाकिस्तान सरकार, जम्मू-काश्मीरमध्ये काहीही नवीन कुरापत करण्याच्या परिस्थितीत नव्हते.

दिशाहीन आणि नेतृत्वहीन अवस्थेत असलेल्या काश्मिरी बंडखोर तरुणांना पुन्हा कधीही पाकिस्तानच्या हातातले बाहुले बनू न देता, त्यांना योग्य दिशा देऊन भारताच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते. परंतु, त्यासाठी त्यांना प्रथम योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. एकीकडे त्यांची 'काश्मिरीयत' जपणे, आणि दुसरीकडे, त्यांच्या मनांत भारतीय नागरिकत्वाची भावना व त्याचा सार्थ अभिमान जागवणे, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या.  

ही सर्व पावले उचलण्यासाठी, मुळात एक सक्षम आणि लोकप्रिय सरकार जम्मू-काश्मीरमध्ये असणे अत्यावश्यक होते, आणि नेमका त्याचाच अभाव होता. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री, सय्यद मीर कासिम यांचे काँग्रेस सरकार प्रत्यक्षात दिल्लीमधूनच चालवले जात असल्याचीच भावना सर्वसामान्य जनतेच्या मनांमध्ये प्रबळ होती. त्यामुळे, झटपट काहीतरी करून, जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या उद्देशाने, सय्यद मीर कासिम सरकारने दहशतवाद्यांच्या बाबतीत अक्षरशः संतवृत्तीच धारण केली!  

'अल फतेह' चे संपूर्ण जाळे तोडणारे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक, पीर गुलाम हसन शाह (जे भविष्यात जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिदेशक झाले) यांच्यावर, राज्य सरकारने एक निराळीच जबाबदारी सोपवली. आता त्यांना 'अल फतेह' च्या 'भरकटलेल्या' तरुणांना मुख्य प्रभावात आणायचे होते!

राज्य सरकारच्या नीतीनुसार, 'अल फतेह'च्या ज्या कार्यकर्त्यांवर बारीक-सारीक आरोप होते त्यांना सोडूनच दिले गेले. मोठ्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या सर्वांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी तुरुंगातच पुरवल्या गेल्या. हे एक अतिशय सकारात्मक पाऊल होते. पुष्कळ तरुणांनी याचा योग्य तो फायदा घेतला आणि ते दहशतवादापासून दूर गेले. परंतु, राज्य सरकारच्या अति उदार धोरणाचा काही लोकांनी गैरफायदाही घेतला.

फझल-उल-हक कुरेशी, व नाझीर अहमद वाणी यांच्यासारख्या कट्टर अतिरेक्यांचे उपद्रवमूल्य नीट न ओळखणे, आणि त्यांनादेखील सोडून देणे, ही सरकारची घोडचूकच होती. फझल-उल-हक कुरेशीला तर, त्याच्या जुन्या सरकारी नोकरीमध्ये, पूर्वीच्याच पदावर पुन्हा नेमले गेले. राज्य सरकारच्या या चुका फक्त जम्मू-काश्मीरलाच नव्हे तर संपूर्ण देशाला पुढे चांगल्याच भोवल्या. 

पाकिस्तान सरकारच्या छुप्या समर्थनावर आणि त्यांच्या मदतीने 'अल फतेह' जेंव्हा कार्यरत होती त्याच सुमारास, म्हणजे १९६५च्या आसपास, 'नॅशनल लिबरेशन फ्रंट' (NLF) नावाची एक स्वयंभू संस्था काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये उदयाला आली होती. मोहम्मद मकबूल भट आणि अमानुल्ला खान हे या संघटनेचे मुख्य शिलेदार होते. परंतु, त्या काळात पाकिस्तान सरकारचे धोरण काहीसे बदललेले होते, आणि त्याला सबळ कारणही होते. 

१९४७-४८ आणि १९६५ ही दोन्ही युद्धे पाकिस्तानने मुख्यत्वे काश्मीर डोळ्यासमोर ठेवूनच सुरु केली होती. दोन्ही वेळा भारताकडून कडवा प्रतिकार झाल्याने पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती. त्यामुळेच, यापुढे जम्मू-काश्मीरमधील बंडखोरांना केवळ अप्रत्यक्षपणे मदत करून तेथे अस्थिरता आणायची, आणि फुटीरतावाद पेटवायचा, असा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतलेला होता. अर्थातच, सक्रिय पाकिस्तानी पाठबळाच्या अभावी NLF कडून कोणतीही मोठी भारतविरोधी कारवाई घडू शकली नाही. त्यामुळे, पाकिस्तानच्या बाबतीत NLF च्या नेत्यांचा नुसता भ्रमनिरासच झाला असे नव्हे, तर काश्मीर आणि काश्मिरी लोकांच्या भवितव्याशी पाकिस्तानला एका काडीचेही देणे-घेणे नाही याबद्दल त्यांची खात्री पटली.  

अमानुल्ला खान व मोहम्मद मकबूल भट या NLF च्या जोडगोळीनेच पुढे १९७७ साली लंडनमध्ये, 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' (JKLF) ही संघटना स्थापन केली. JKLF आणि हिझबुल मुजाहिदीन हीच दोन नावे पुढील जवळ-जवळ अडीच-तीन दशके जम्मू-काश्मीरमध्ये प्रामुख्याने चर्चेत राहिली. दोन्ही संघटना भारतविरोधीच होत्या. परंतु, त्यांच्यामधला मूलभूत फरक असा होता की, JKLF ही संघटना जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती, आणि हिझबुल मुजाहिदीनचे अतिरेकी जम्मू-काश्मीर पाकिस्तानात विलीन करण्यासाठी लढत होते. [याच JKLF चा भविष्यातला एक प्रमुख दहशतवादी नेता, क्रूरकर्मा यासीन मलिक हा अगदी काल-परवापर्यंत चर्चेत राहिलेला आहे]

१९७१ साली इंदिराजी आपल्या कारकीर्दीच्या सुवर्णशिखरावर होत्या. मार्च १९७१ मध्ये त्या पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या होत्या. त्यानंतर, डिसेंबर १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली होती. बांगलादेशाची निर्मिती केल्यानंतर, पाकिस्तानचे ९३००० युद्धकैदी व त्यांचे परिवार भारताच्या ताब्यात होते. शिवाय, आंतरराष्ट्रीय नियमानुसार, पूर्व बंगाली लोकांवर पाकिस्तानी सेनेने केलेल्या अत्याचारांची चौकशी  करण्याचा हक्क भारताकडे होता. 

१९७२ साली शिमल्यामध्ये झालेल्या वाटाघाटीत, कदाचित, हे दोन्ही हुकुमाचे पत्ते अधिक प्रभावीपणे  वापरता आले असते. पाकिस्तानने अनधिकृतपणे व्यापलेली जम्मू-काश्मीरची जमीन त्यांच्या ताब्यातून भारताला सोडवून घेता आली असती. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरसंबंधी होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम देता आला असता. 

शिमला वाटाघाटींमध्ये तसे का घडले नाही याची नेमकी कारणमीमांसा करणे कठीण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान, झुल्फिकार अली भुट्टो हे इंदिरा गांधींपेक्षा वरचढ प्रतीचे मुत्सद्दी ठरले, इतकेच कदाचित आज नाईलाजाने म्हणावे लागेल.  

१ मार्च ते १० मार्च १९७१ दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीवर, जम्मू-काश्मीरमध्ये शेख अब्दुल्लांनी बहिष्कार टाकला होता. परंतु, एके काळचे शेख अब्दुल्लांचे सहकारी, आणि १९५३ साली त्यांच्या विरोधात गेलेले बक्षी गुलाम मोहम्मद, यांना हरवण्यासाठीच म्हणून शेख अब्दुल्लांनी एका अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला. तो अपक्ष उमेदवार जिंकला आणि काश्मिरी जनतेवरचा शेख अब्दुल्लांचा पगडा अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले. 

परंतु, शेख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्समधून फुटून काँग्रेसमध्ये गेलेल्या 'गयारामां'नी जम्मू-काश्मीरची विधानसभा आधीच बळकावलेली होती. राज्य काँग्रेसमध्येही फूट पडण्याची चिन्हे होती. माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शाह व तत्कालीन मुख्यमंत्री सय्यद मीर कासिम यांचे गट आमने-सामने उभे ठाकले होते. ही संधी साधून, सय्यद अली शाह गीलानी यांच्या पुढाकाराने, जमात-ए-इस्लामी हा पाकिस्तानधार्जिणा राजकीय पक्ष विधानसभेत काही जागा मिळवण्यात यशस्वी झालेला होता.  

राज्यातील राजकीय अस्थिरतेला, आणि काश्मीर खोऱ्यात फोफावत चाललेल्या फुटीरतावादाला व दहशतवादाला आळा घालण्यासाठी शेख अब्दुल्ला उपयोगी पडतील असा विश्वास इंदिराजींना वाटत होता. नॅशनल कॉन्फरन्समधून फुटून काँग्रेसमध्ये आलेल्या 'बुजगावण्यां'पेक्षा, (जम्मू व लडाखमध्ये नाही तरी,) काश्मीर खोऱ्यामध्ये, 'शेर-ए-काश्मीर' शेख अब्दुल्ला अधिक लोकप्रिय होते हे इंदिराजी ओळखून होत्या. 

जम्मू-काश्मीरमध्ये स्थैर्य आणण्याच्या प्रबळ इच्छेने, इंदिराजींनी तोपर्यंतच्या आपल्या राजकीय भूमिकेला एक कलाटणी दिली व १९७२ साली शेख अब्दुल्लांना मैत्रीची साद घातली. काहीश्या निराशाजनक परिस्थितीमध्ये अडकलेल्या, आणि राजकारणातून जवळजवळ बाजूला फेकल्या गेलेल्या शेख अब्दुल्लांना, इंदिराजींकडून मैत्रीची हाक येताच, अक्षरशः 'अचानक धनलाभ' व्हावा तसे झाले. 

त्या काळात देशावर आर्थिक संकट घोंघावत होते. त्याशिवाय, पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे विरोधक हळूहळू एकत्र येऊन, इंदिराजींच्या राजकीय अस्तित्वावरच सावट आणू पाहत होते. या दोन्ही मुद्द्यांवरून देशातील जनतेचे लक्ष हटवण्याकरिता, आणि स्वतःची राजकीय प्रतिमा जपण्यासाठी, काश्मीर प्रश्नावर एखादा झटपट तोडगा काढणे ही इंदिराजींची तात्कालिक निकड होती. शेख अब्दुल्लांच्या बुडत्या राजकीय नौकेलाही भक्कम आधार हवाच होता. 

केंद्र सरकारचे वरिष्ठ सनदी अधिकारी, गोपालस्वामी पार्थसारथी हे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वतीने चर्चेत सहभागी झाले होते. आणि शेख अब्दुल्लांच्या वतीने वाटाघाटी करणारी व्यक्ती होती, मिर्झा अफझल बेग!
तेच मिर्झा अफझल बेग, ज्यांच्या 'प्लेबिसाईट फ्रंट'चे आणि दहशतवादी गट 'अल फतेह'चे साटेलोटे असल्याचा सुगावा जम्मू-काश्मीर पोलिसांना जानेवारी १९७१ मध्ये लागला होता!
 
१९७२ पासून सुरु झालेल्या वाटाघाटी दोन वर्षे  चालू होत्या. १९५३ साली जम्मू-काश्मीर राज्याची संवैधानिक स्थिती जशी होती तशीच ती पूर्ववत केली जावी, अशी  शेख अब्दुल्लांची मागणी होती. परंतु, आता तसे होऊ देणे केंद्र सरकारला शक्य नव्हते. त्यानंतरच्या दोन दशकांत झेलममधून बरेच पाणी वाहून गेले होते. 

१९५३ ते १९७२ या काळात, केंद्र सरकारच्या मर्जीतले चार मुख्यमंत्री जम्मू-काश्मीरमध्ये राज्य करून गेले होते. वझीर-ए-आझम आणि सद्र-ए-रियासत ही पदे नामशेष होऊन, इतर राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्येही मुख्यमंत्री व राज्यपाल हीच पदे रूढ झालेली होती. भारताचे केवळ एक घटक राज्य, या नात्याने जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणाच्या दृष्टीने इतरही अनेक ठोस पावले टाकली गेली होती. अखेर, प्रदीर्घ चर्चेनंतर, १३ नोव्हेंबर १९७४ रोजी कराराचा मसुदा तयार झाला. २४ फेब्रुवारी १९७५ रोजी इंदिरा गांधी व शेख अब्दुल्ला यांच्या प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

इंदिरा-शेख अब्दुल्ला करारामध्ये काही लक्षवेधी मुद्दे सामील होते. जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग असल्याचे, आणि जम्मू-काश्मीरचे भारतात झालेले विलीनीकरण अंतिम व निर्विवाद असल्याचे, या करारामध्ये पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले. देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते नियम व कायदे करण्याचे सर्वाधिकार भारतीय संसदेला असतील व ते जम्मू-काश्मीर सरकारवर बंधनकारक असतील हेही स्पष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर राज्य व भारत गणराज्य यांच्यादरम्यानचे संबंध, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३७० प्रमाणेच राहतील या मुद्द्यावरही या करारात शिक्कामोर्तब झाले.

इंदिरा-शेख अब्दुल्ला करार अमलात आल्यानंतर दोनच दिवसांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक अभूतपूर्व घटना  घडली. एके काळी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाकडून जम्मू-काश्मीरचे 'पंतप्रधान' राहिलेले, आणि काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यदेखील नसलेले शेख अब्दुल्ला, एकमुखाने (अर्थातच 'पक्षश्रेष्ठीं'च्या आदेशानुसार) काँग्रेस विधिमंडळाचे नेता म्हणून निवडले गेले!

२६ फेब्रुवारी १९७५ रोजी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शेख अब्दुल्लांनी शपथ घेतली!  

इंदिरा-शेख अब्दुल्ला कराराचे संमिश्र पडसाद जम्मू-काश्मीरमध्ये उमटले. एकीकडे, भारतीय जनसंघाने जम्मूमध्ये नव्याने आंदोलन छेडले. संविधानाचा अनुच्छेद ३७० रद्दच करून, जम्मू-काश्मीर राज्य भारतामध्ये बिनशर्त विलीन करावे ही त्यांची मागणी मात्र जुनीच होती. 

दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात, मिरवाईझ मौलवी मोहम्मद फारूक, व 'प्लेबिसाईट फ्रंट'च्या प्रमुख नेत्यांनी या कराराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेख अब्दुल्लांनी स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी, म्हणजेच मुख्यमंत्री बनण्यासाठी, राज्यातील जनतेचा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया काश्मीर खोऱ्यामध्ये उमटली. 

जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्याविषयी, किंवा जम्मू-काश्मीर राज्य पाकिस्तानात सामील करण्याविषयी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न इंदिरा-शेख अब्दुल्ला कराराद्वारे केला गेला. वरकरणी पाहता, शेख अब्दुल्लांचे पंख छाटून, जम्मू-काश्मीरच्या राजकारणात त्यांचे पुनर्वसन करण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या होत्या. परंतु, ते यश अल्पकाळच टिकणार आहे, याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती. 

लवकरच देशभरात 'आणीबाणी' जाहीर करून, इंदिराजींनी आपल्या सर्व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबले. १९७७ साली आणीबाणी उठवून इंदिराजींनी लोकसभेची निवडणूक जाहीर केली. त्या निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. 

दिल्लीमध्ये जनता पक्षाची राजवट सुरु झाल्यानंतर दोनच दिवसांनी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री शेख अब्दुल्लांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. अब्दुल्ला सरकार पडताच, राज्यपालांची राजवट लागू करून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने, काँग्रेसने शेख अब्दुल्लांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. 

परंतु, शेख अब्दुल्लांसारखा मुरलेला राजकारणी काँग्रेसचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नव्हता. निवडणुकीत भरघोस बहुमताने निवडून येण्याची शेख अब्दुल्लांना खात्री होती. त्यामुळे, विधानसभेत अविश्वास ठराव येण्याआधीच शेख अब्दुल्लांनी राज्यपालांना शिफारस केली की विधानसभा भंग करून निवडणूक घेतली जावी. संवैधानिक मुद्दयांवर लढल्या गेलेल्या अटीतटीच्या कायदेशीर लढाईनंतर शेख अब्दुल्लांची खेळी यशस्वी झाली. 

जून १९७७ मध्ये, राज्यपालांच्या देखरेखीखाली जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांचा जुना पायंडा मोडला गेला. राज्यात प्रथमच, कोणताही गैरप्रकार न होता निवडणूक पार पडली.
 
जम्मू-काश्मीर विधानसभेतील ७६पैकी ४७ जागा शेख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या. 
शेख अब्दुल्ला, स्वबळावर, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले ...  


(क्रमशः)
(भाग २३ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)