'वाहिबा सँड्स' मधल्या 'Thousand Nights' कँम्पची सकाळ जराशी थंड होती आणि आसपासचे वाळवंट धुक्याची चादर लपेटून शांत बसलेले होते. आमच्यापैकी भल्या पहाटे उठून फिरायला जाणारी फक्त स्वातीच असल्याने, ती नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर गेलेली दिसली. सूर्यास्त पाहायची संधी हुकल्यामुळे कदाचित ती सूर्योदय पाहायला गेली असणार हा माझा अंदाज बरोबर होता. पण सूर्योदयाची वेळ उलटून गेल्यानंतरही बराच वेळ तिचा पत्ता नव्हता. ती एकटीच गेलेली असल्याने मला जरा काळजीच वाटू लागली. तिचा फोनही लागत नव्हता. काही वेळानंतर ती परत येताना मला दिसली. तोपर्यंतही धुके हटलेले नसल्याने तिचा सूर्योदय तर हुकलाच होता, पण चालता-चालता अचानक 'धुक्यात हरवली वाट' अशी तिची अवस्था झाली होती. मोकळ्या वाळवंटात दिशाहीन भटकण्याचा थरारही काही काळ तिने अनुभवला होता! मोबाईल जवळ असला तरी बराच काळ तिला सिग्नलच मिळत नव्हता. अखेर, एकदाचा सिग्नल मिळाल्यानंतर 'गूगल मॅप्स' च्या साहाय्याने ती कँम्पपर्यंत परत येऊ शकली होती असे तिने हसत-हसत मला सांगितले.
कँम्पमध्ये भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. पुन्हा ४X४ गाडीने बिदियाह गावात येऊन, आमच्या मिनी बसने आम्ही 'वादी बानी खालिद'च्या वाटेला लागलो. या वादीमध्ये पाण्याचे बारमाही झरे आहेत. खडकांमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्याची, काही खोलगट भागांमध्ये लहान-लहान तळी झालेली आहेत.ओमानवासीयांसाठी असे ठिकाण म्हणजे पर्यटनाचे एक मोठे आकर्षणस्थळ असल्यास काय नवल?
गाडी मुख्य रस्त्यावर ठेवून, एका उंच-सखल व खडकाळ रस्त्याने, सुमारे चार-पाचशे मीटर चालत झऱ्यापर्यंत जायचे होते. आधी ठरल्याप्रमाणे, दादांना अल नासर व ड्रायव्हरच्या सोबतीने बसमध्ये सोडून आम्ही झऱ्याकडे निघालो.
दोनेकशे मीटरवर जरासे विस्तीर्ण तळे दिसले. "स्थानिक रीती-रिवाजानुसार, संपूर्ण अंगभर कपडे घालूनच तळ्यामध्ये पोहणे अपेक्षित आहे" अशा मजकुराचे बोर्ड तळ्याजवळ लावलेले होते. अल नासरने आम्हाला आधीच सांगितले होते की ज्या स्त्री-पुरुषांना पोहण्याच्या वेषात (Swimming Costumes घालून) डुंबायचे असेल त्यांनी पुढे झऱ्याजवळच्या भागात जावे. आम्ही आपापले पोहण्याचे कपडे सोबत घेतलेही होते. त्यामुळे, जराश्या उंचीवर असलेल्या धबधब्याकडे आम्ही चढत गेलो. डोंगरातून पडणारा धबधबा आणि त्याचे स्वच्छ निळेशार पाणी पाहताच आमचे मन उल्हसित झाले.
पाण्याच्या एका बाजूच्या कड्यालगत, एका व्यक्तीला जेमतेम उभे राहून कपडे बदलता येतील इतपत मोठे असे दोन तंबू लावलेले होते. "तंबू वापरल्यास पेटीमध्ये स्वेच्छेने काही पैसे टाकावेत" असे लिहिलेली एक दानपेटी बाहेर ठेवलेली होती. मात्र, कोणीही मनुष्य पैसे-वसुलीसाठी तिथे नव्हता. हे पाहून मला जरा नवलच वाटले. आम्ही झटपट कपडे बदलून पाण्याकडे धाव घेतली. पाण्याची खोली कडेकडेने पायाच्या घोट्याएवढी, तर प्रवाहाच्या मध्यभागी, काही ठिकाणी ८-१० फुटांइतकी होती. ते निळे पाणी इतके स्वच्छ होते की तळातले सफेद, गुळगुळीत गोटे आणि पाण्यात पोहत असलेले लहान-लहान मासे अगदी सहज दिसू शकत होते.
पाण्यामध्ये मी उभा राहिलो आणि क्षणार्धात मला जाणवले की अनेक लहान-लहान माश्यांनी माझ्या पावलांना बारीक-बारीक चावे घ्यायला सुरुवात केली होती. आधी जरा विचित्र वाटले खरे, पण थोड्या वेळाने सवय झाली. चावे घेऊन तळपायाची मृत कातडी ते मासे खाऊन टाकतात आणि आपले पाय स्वच्छ होतात. त्या नैसर्गिक 'पेडिक्युअर'चा लाभ घेत मी बराच वेळ तिथे उभा राहिलो. नंतर डोंगरातून पडणाऱ्या धबधब्यापर्यंतही जाऊन आलो. देशोदेशीचे लोक वादी बानी खालिदमध्ये डुंबायला आलेले होते. एक वयस्कर बाई आणि तिच्यासोबतची काही मंडळी पूर्व युरोपमधल्या लिथुआनिया देशातले होते. एक मध्यमवयीन पुरुष, त्याची पत्नी आणि तरुण मुलगी केरळी हिंदू परिवारातले असावेत असा माझा कयास होता. त्यांच्यासोबत माझा काही जुजबी संवाद झाला. तो मनुष्य मूळचा केरळमधील पालघाट या गावाचा होता (आता त्या गावाला पालक्कड म्हणतात). पण गेली बरीच वर्षे तो ओमानमध्येच स्थायिक होता.
प्राचीलाही धबधब्यापर्यंत जाऊन यायचे होते, पण खोल पाण्यात जायला ती बिचकत होती. आमच्या जवळच, पंजाबी-मिश्रित हिंदी भाषेत बोलणारी काही मुले लाईफ जॅकेट्स घालून कड्यावरून पाण्यात उड्या टाकत होती. त्यातल्या एका तरुणाला, त्याचे जॅकेट प्राचीला थोडा वेळ वापरायला देण्याची विनंती स्वातीने केली. परंतु, "यहाँ बाहरही किराए पर आपको मिल जायेगा" असे उत्तर देऊन तो तरुण कड्यावर जाऊन बसला. नंतर त्याला काय वाटले कोण जाणे? त्याने वरूनच ते जॅकेट प्राचीकडे टाकले. आम्ही त्याला 'धन्यवाद" असे म्हणताच तो तरुण प्रसन्नतेने हसला आणि मनमोकळेपणाने म्हणाला, "हम पाकिस्तान से हैं, पर आप के दुश्मन नहीं है!"
बराच काळ आम्ही पाण्यात डुंबत आणि नैसर्गिक 'पेडिक्युअर' करून घेत राहिलो. आम्ही आल्यापासून तीन तास होत आले होते. आमचा पाय निघत नव्हता. पण वेळेचे भान ठेवून, पाण्यातून बाहेर पडावेच लागले. बसमध्ये येऊन दादांची चौकशी केली तेंव्हा त्यांनी सांगितले की अल नसरने त्यांना केळी, केक आणि थंड पेय आणून दिले होते. शिवाय दोन वेळा त्यांना स्वच्छतागृहापर्यंतही नेऊन आणले होते. साधारण दादांच्या नातवाच्याच वयाच्या त्या ओमानी तरुणाने जणू काही स्वतःच्याच आजोबांची काळजी घेत असल्याप्रमाणे दादांना पाहिले होते हे जाणवून आम्ही भारावून गेलो.
संध्याकाळपर्यंत आम्ही मस्कतच्या 'फ्रेझर स्युईटस' मध्ये पुन्हा येऊन पोहोचलो. आमचे ओमानभ्रमण जवळजवळ पूर्ण झाले होते. पुढचा एक दिवस मस्कतमध्ये शॉपिंगसाठी राखीव होता आणि त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी मुंबईला परतायचे होते.
ओमानसफरीवर निघण्यापूर्वी, "ओमानला कसे काय चाललात?" "तिथे काही पाहण्यासारखे आहे का?" "अगदीच ऑफ-बीट जागा कशी निवडलीत तुम्ही?" असे अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले होते. त्या-त्या वेळी सुचतील ती उत्तरे देऊन आम्ही वेळ मारून नेली होती. परत आल्यावर मात्र, "भटो भटो, काय पाहिलंत?" असा प्रश्न कुणी विचारायच्या आतच आपण 'ओमाननामा' लिहून काढायचा असे ठरवून, मी 'ओह मॅन' लिहायला सुरुवात केली. इथे भेटलेल्या लोकांशी झालेल्या संवादाचे ओझरते उल्लेखच फक्त केले असल्याने त्याबद्दल जरासे विस्ताराने लिहिणे आवश्यक आहे.
ओमानमध्ये आम्हाला ठिकठिकाणी अनेक दक्षिण आशियाई लोक भेटले. अधिकांश लोक भारतीयच किंवा बांगलादेशी असल्यामुळे भाषेची अडचण कुठेच आली नाही. मस्कतमध्ये 'फ्रेझर स्युईटस'च्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांशी येता-जाता गप्पा व्हायच्या. श्रीलंकेचा एक तरुण आणि एक तरुणी रोजच भेटत असत. आम्ही त्यांना म्हटले, "गेल्या वर्षी मलेशियाला जाताना, कोलंबोजवळच्या नेगोंबो या उपनगरात आम्ही एक रात्र राहिलो होतो. जाता-येताना जेवढे काही नेगोंबोचे दर्शन झाले ते फार छान होते आणि आम्हाला पुन्हा श्रीलंकेला जायची इच्छा आहे." आमच्याकडून हे शब्द ऐकताच, मातृभूमीच्या आठवणीने ते दोघेही अगदी हरखून गेले होते.
बांगलादेशी लोक तर आम्हाला 'फ्रेझर स्युईटस'मध्ये, मस्कत किंवा सूरमधल्या कापड बाजारात, भाजी बाजारात आणि इतरही अनेक ठिकाणी भेटले. नुकत्याच बांगलादेशात झालेल्या सत्तापालटासंबंधी आम्ही सहजच विचारल्यासारखे करून त्यांचे मत जाणून घेतले. जे झाले त्याबद्दल बहुतेकांनी हळहळ बोलून दाखवली. एका तरुणाने तर खूपच चीड व्यक्त करत म्हटले, "शेख मुजिबुर रहमान आणि त्यांची मुलगी शेख हसीना यांनी आमच्या देशासाठी जे केले, त्याला तोड नाही. अमेरिकेने फुसलावून आमचा देश भडकवलेला आहे आणि सत्तापालट करवून आणलेला आहे. पण आज ना उद्या, जनता त्यांना योग्य उत्तर नक्की देईल!"
सूरमधल्या हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर, सफाईदार इंग्रजीत बोलणारी एक तरतरीत पाकिस्तानी महिला गिरीशला भेटली होती. आम्हाला हॉटेलांमधून भेटलेल्या सर्वच मुला-मुलींनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले असल्याने, गिरीशने तिलाही विचारले, "तू कुठे ग्रॅज्युएशन केलेस? पाकिस्तानातच का?" त्यावर ती हसून म्हणाली, "सर, यू विल नॉट बिलीव्ह, पण मी फक्त चौथीपर्यंत शिकलेली आहे!" काहीशा अविश्वासानेच गिरीशने तिच्याबद्दल माहिती विचारली. तिने सांगितले की पाकिस्तानात झेलम नदीच्या पश्चिम तीरावरच्या 'झेलम' नावाच्या (भारत-पाक सीमेजवळच्या) गावी तिचा जन्म झाला होता. वडील तिच्या लहानपणीच वारले होते. केवळ कानावर पडेल ते ऐकून-ऐकून ती इंग्रजी बोलायला शिकली होती. कुणाच्या तरी मदतीने, दुबईमध्ये काम करण्यासाठी गेली आणि तिथे अंगावर पडेल ते काम करत तिने हळूहळू प्रगती केली. दुबईमध्ये तिने बरीच वर्षे काम केले होते. पण तिथल्यापेक्षा ओमानमध्ये कामाचे प्रेशर कमी आणि पगारदेखील चांगला असल्याने ती इथे आलेली होती. गिरीशने सहजच तिला पाकिस्तानबद्दल काही प्रश्न विचारले. पाकिस्तानात सर्वच बाबतीत, सैन्यदलांच्या असलेल्या वर्चस्वावर तिने खूप टीका केली. ती असेही म्हणाली की भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र होऊनदेखील आज भारत पाकिस्तानपेक्षा सर्वच बाबतीत कैक पटींनी वरचढ झाला आहे. पाकिस्तानातली एकंदर परिस्थिती इतकी वाईट आहे की तिच्या झेलम गावातल्या घराचे विजेचे बिल घरभाड्यापेक्षा जास्त येते!
ओमानमध्ये भेटलेल्या भारतीयांकडूनही आम्हाला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. सूरच्या हॉटेलात भेटलेली वेट्रेस शौमिता आणि सुपरवायझर शॉप्तर्षि चॉक्रोबॉरती या दोघांनीही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले होते. शौमिता मला म्हणाली की तिला प्रवासाची खूप आवड आहे. पण जगभर फिरता-फिरताच पैसे कमवण्याची तिची इच्छा होती. भारतात, तसेच सिंगापूर व मलेशियामध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ती ओमानमध्ये आली होती. शॉप्तर्षिनेही भारतात नोकरी केली होती व काही काळ तो पुण्याजवळ शिरूरला राहिलेला होता. श्री. मित्रा नावाचे एक बंगाली गृहस्थ सूरमधल्या त्या हॉटेलचे जनरल मॅनेजर होते. त्यांच्या शिफारशीने अनेक बंगाली कर्मचारी त्या हॉटेलात नोकरीसाठी आलेले होते. एक केरळी कर्मचारी तर त्याच हॉटेलात गेली २५ वर्षांहून अधिक काळ कामाला आहे!
वाहिबा सँड्स वाळवंटामधल्या Thousand Nights कँम्पमध्येही काळे नावाचे नाशिकचे गृहस्थ जनरल मॅनेजर होते. त्यांच्या ओळखीने अनेक मराठी मुले तिथे कामाला लागलेली होती. नाशिकच्या एयरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट (AHA) कॉलेजमध्ये शिकलेली आणि ओमानमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरी करत असलेली किमान १५ ते १८ मुले-मुली आम्हाला भेटली. जेमतेम २१ वर्षे वयाच्या त्या मुलांना वर्षातून एकदा भारतात जाण्या-येण्याचा विमानखर्च मिळत होता. कँम्पमध्येच राहून व जेवूनखाऊन, दरमहा सुमारे पंधरा ते पंचवीस हजार रुपये (करमुक्त) त्यांना वाचवता येत होते. जगभरातल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव मिळत होता तो वेगळाच! त्या सगळ्या मुलांकडून एकमुखाने हेच ऐकू आले की या देशातली कार्यसंस्कृती खूपच चांगली आहे.
ओमानमध्ये आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मोठमोठ्या जाहिरातींचा एकही बोर्ड आम्हाला दिसला नाही. रस्त्यांवर प्लास्टिकचा कचरा किंवा घाण पडलेली नव्हती. शहरांमध्ये स्वच्छ उद्याने होती. अगदी लहान गावांमध्येही सरकारी शाळांच्या पक्क्या आणि नेटक्या, दुमजली, वातानुकूलित इमारती होत्या. प्रत्येक शाळेच्या आवारात खेळांची मैदाने, तसेच अगदी लहान मुलांसाठी घसरगुंड्या/झोपाळे वगैरे होते. दुकानांमध्ये आणि इतरत्र ठिकठिकाणी पुरुषांसोबत बायकादेखील काम करीत होत्या. आम्हाला जागोजागी दिसलेले-भेटलेले ओमानी लोकदेखील मृदुभाषी वाटले. संयुक्त अरब अमिरातीप्रमाणेच ओमानमध्येही खनिज तेलाचा मुबलक पैसा आहे. इथेही अनेक श्रीमंत लोक आहेत. मस्कतमध्ये मोठमोठे मॉलही आहेत. पण आम्हाला कुठेही श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन दिसले नाही किंवा कुणामध्येही पैशाचा माज जाणवला नाही. कदाचित ओमानमध्ये शिक्षणाला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा तो परिणाम असू शकेल, किंवा या देशाची एकंदर संस्कृतीच अशी असेल.
ओमानमध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे, आणि त्या देशाकडून खूप काही शिकण्यासारखेही आहे.
कालच भेटलेला एक मित्र मला म्हणाला, "बापट, हाऊ डिड यू गो टू ओमान, ऑफ ऑल द प्लेसेस?"
मी त्याला इतकेच म्हणालो, "ओह मॅन , यू टू मस्ट गो देअर वन्स!"
(समाप्त)
©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)