शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (अंतिम भाग)

'वाहिबा सँड्स' मधल्या 'Thousand Nights' कँम्पची सकाळ जराशी थंड होती आणि आसपासचे वाळवंट धुक्याची चादर लपेटून शांत बसलेले होते. आमच्यापैकी भल्या पहाटे उठून फिरायला जाणारी फक्त स्वातीच असल्याने, ती नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर गेलेली दिसली. सूर्यास्त पाहायची संधी हुकल्यामुळे कदाचित ती सूर्योदय पाहायला गेली असणार हा माझा अंदाज बरोबर होता. पण सूर्योदयाची वेळ उलटून गेल्यानंतरही बराच वेळ तिचा पत्ता नव्हता. ती एकटीच गेलेली असल्याने मला जरा काळजीच वाटू लागली. तिचा फोनही लागत नव्हता. काही वेळानंतर ती परत येताना मला दिसली. तोपर्यंतही धुके हटलेले नसल्याने तिचा सूर्योदय तर हुकलाच होता, पण चालता-चालता अचानक 'धुक्यात हरवली वाट' अशी तिची अवस्था झाली होती. मोकळ्या वाळवंटात दिशाहीन भटकण्याचा थरारही काही काळ तिने अनुभवला होता! मोबाईल जवळ असला तरी बराच काळ तिला सिग्नलच मिळत नव्हता. अखेर, एकदाचा सिग्नल मिळाल्यानंतर 'गूगल मॅप्स' च्या साहाय्याने ती कँम्पपर्यंत परत येऊ शकली होती असे तिने हसत-हसत मला सांगितले. 

कँम्पमध्ये भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. पुन्हा ४X४ गाडीने बिदियाह गावात येऊन, आमच्या मिनी बसने आम्ही 'वादी बानी खालिद'च्या वाटेला लागलो. या वादीमध्ये पाण्याचे बारमाही झरे आहेत. खडकांमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्याची, काही खोलगट भागांमध्ये लहान-लहान तळी झालेली आहेत.ओमानवासीयांसाठी असे ठिकाण म्हणजे पर्यटनाचे एक मोठे आकर्षणस्थळ असल्यास काय नवल?

गाडी मुख्य रस्त्यावर ठेवून, एका उंच-सखल व खडकाळ रस्त्याने, सुमारे चार-पाचशे मीटर चालत झऱ्यापर्यंत  जायचे होते. आधी ठरल्याप्रमाणे, दादांना अल नासर व ड्रायव्हरच्या सोबतीने बसमध्ये सोडून आम्ही झऱ्याकडे निघालो. 

दोनेकशे मीटरवर जरासे विस्तीर्ण तळे दिसले. "स्थानिक रीती-रिवाजानुसार, संपूर्ण अंगभर कपडे घालूनच तळ्यामध्ये पोहणे अपेक्षित आहे" अशा मजकुराचे बोर्ड तळ्याजवळ लावलेले होते. अल नासरने आम्हाला आधीच  सांगितले होते की ज्या स्त्री-पुरुषांना पोहण्याच्या वेषात (Swimming Costumes घालून) डुंबायचे असेल त्यांनी पुढे झऱ्याजवळच्या भागात जावे. आम्ही आपापले पोहण्याचे कपडे सोबत घेतलेही होते. त्यामुळे, जराश्या उंचीवर असलेल्या धबधब्याकडे आम्ही चढत गेलो. डोंगरातून पडणारा धबधबा आणि त्याचे स्वच्छ निळेशार पाणी पाहताच आमचे मन उल्हसित झाले. 

पाण्याच्या एका बाजूच्या कड्यालगत, एका व्यक्तीला जेमतेम उभे राहून कपडे बदलता येतील इतपत मोठे असे दोन तंबू लावलेले होते. "तंबू वापरल्यास पेटीमध्ये स्वेच्छेने काही पैसे टाकावेत" असे लिहिलेली एक दानपेटी बाहेर  ठेवलेली होती. मात्र, कोणीही मनुष्य पैसे-वसुलीसाठी तिथे नव्हता. हे पाहून मला जरा नवलच वाटले. आम्ही झटपट कपडे बदलून पाण्याकडे धाव घेतली. पाण्याची खोली कडेकडेने पायाच्या घोट्याएवढी, तर प्रवाहाच्या मध्यभागी, काही ठिकाणी ८-१० फुटांइतकी होती. ते निळे पाणी इतके स्वच्छ होते की तळातले सफेद, गुळगुळीत गोटे आणि पाण्यात पोहत असलेले लहान-लहान मासे अगदी सहज दिसू शकत होते. 

पाण्यामध्ये मी उभा राहिलो आणि क्षणार्धात मला जाणवले की अनेक लहान-लहान माश्यांनी माझ्या पावलांना बारीक-बारीक चावे घ्यायला सुरुवात केली होती. आधी जरा विचित्र वाटले खरे, पण थोड्या वेळाने सवय झाली. चावे घेऊन तळपायाची मृत कातडी ते मासे खाऊन टाकतात आणि आपले पाय स्वच्छ होतात. त्या नैसर्गिक 'पेडिक्युअर'चा लाभ घेत मी बराच वेळ तिथे उभा राहिलो. नंतर डोंगरातून पडणाऱ्या धबधब्यापर्यंतही जाऊन आलो. देशोदेशीचे लोक वादी बानी खालिदमध्ये डुंबायला आलेले होते. एक वयस्कर बाई आणि तिच्यासोबतची काही मंडळी पूर्व युरोपमधल्या लिथुआनिया देशातले होते. एक मध्यमवयीन पुरुष, त्याची पत्नी आणि तरुण मुलगी केरळी हिंदू परिवारातले असावेत असा माझा कयास होता. त्यांच्यासोबत माझा काही जुजबी संवाद झाला. तो मनुष्य मूळचा केरळमधील पालघाट या गावाचा होता (आता त्या गावाला पालक्कड म्हणतात). पण गेली बरीच वर्षे तो ओमानमध्येच स्थायिक होता. 

प्राचीलाही धबधब्यापर्यंत जाऊन यायचे होते, पण खोल पाण्यात जायला ती बिचकत होती. आमच्या जवळच, पंजाबी-मिश्रित हिंदी भाषेत बोलणारी काही मुले लाईफ जॅकेट्स घालून कड्यावरून पाण्यात उड्या टाकत होती. त्यातल्या एका तरुणाला, त्याचे जॅकेट प्राचीला थोडा वेळ वापरायला देण्याची विनंती स्वातीने केली. परंतु, "यहाँ बाहरही किराए पर आपको मिल जायेगा" असे उत्तर देऊन तो तरुण कड्यावर जाऊन बसला. नंतर त्याला काय वाटले कोण जाणे? त्याने वरूनच ते जॅकेट प्राचीकडे टाकले. आम्ही त्याला 'धन्यवाद" असे म्हणताच तो तरुण प्रसन्नतेने हसला आणि मनमोकळेपणाने म्हणाला, "हम पाकिस्तान से हैं, पर आप के दुश्मन नहीं है!" 

बराच काळ आम्ही पाण्यात डुंबत आणि नैसर्गिक 'पेडिक्युअर' करून घेत राहिलो. आम्ही आल्यापासून तीन तास होत आले होते. आमचा पाय निघत नव्हता. पण वेळेचे भान ठेवून, पाण्यातून  बाहेर पडावेच लागले. बसमध्ये येऊन दादांची चौकशी केली तेंव्हा त्यांनी सांगितले की अल नसरने त्यांना केळी, केक आणि थंड पेय आणून दिले होते. शिवाय दोन वेळा त्यांना स्वच्छतागृहापर्यंतही नेऊन आणले होते. साधारण दादांच्या नातवाच्याच वयाच्या त्या ओमानी तरुणाने जणू काही स्वतःच्याच आजोबांची काळजी घेत असल्याप्रमाणे दादांना पाहिले होते हे जाणवून आम्ही भारावून गेलो. 

संध्याकाळपर्यंत आम्ही मस्कतच्या 'फ्रेझर स्युईटस' मध्ये पुन्हा येऊन पोहोचलो. आमचे ओमानभ्रमण जवळजवळ पूर्ण झाले होते. पुढचा एक दिवस मस्कतमध्ये शॉपिंगसाठी राखीव होता आणि त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी मुंबईला परतायचे होते. 

ओमानसफरीवर निघण्यापूर्वी, "ओमानला कसे काय चाललात?" "तिथे काही पाहण्यासारखे आहे का?" "अगदीच ऑफ-बीट जागा कशी निवडलीत तुम्ही?" असे अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले होते. त्या-त्या वेळी सुचतील ती उत्तरे देऊन आम्ही वेळ मारून नेली होती. परत आल्यावर मात्र, "भटो भटो, काय पाहिलंत?" असा प्रश्न कुणी विचारायच्या आतच आपण 'ओमाननामा' लिहून काढायचा असे ठरवून, मी 'ओह मॅन' लिहायला सुरुवात केली. इथे भेटलेल्या लोकांशी झालेल्या संवादाचे ओझरते उल्लेखच फक्त केले असल्याने त्याबद्दल जरासे विस्ताराने लिहिणे आवश्यक आहे. 

ओमानमध्ये आम्हाला ठिकठिकाणी अनेक दक्षिण आशियाई लोक भेटले. अधिकांश लोक भारतीयच किंवा बांगलादेशी असल्यामुळे भाषेची अडचण कुठेच आली नाही. मस्कतमध्ये 'फ्रेझर स्युईटस'च्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांशी येता-जाता गप्पा व्हायच्या. श्रीलंकेचा एक तरुण आणि एक तरुणी रोजच भेटत असत. आम्ही त्यांना म्हटले, "गेल्या वर्षी मलेशियाला जाताना, कोलंबोजवळच्या नेगोंबो या उपनगरात आम्ही एक रात्र राहिलो होतो. जाता-येताना जेवढे काही नेगोंबोचे दर्शन झाले ते फार छान होते आणि आम्हाला पुन्हा श्रीलंकेला जायची इच्छा आहे." आमच्याकडून हे शब्द ऐकताच, मातृभूमीच्या आठवणीने ते दोघेही अगदी हरखून गेले होते.

बांगलादेशी लोक तर आम्हाला 'फ्रेझर स्युईटस'मध्ये, मस्कत किंवा सूरमधल्या कापड बाजारात, भाजी बाजारात आणि इतरही अनेक ठिकाणी भेटले. नुकत्याच बांगलादेशात झालेल्या सत्तापालटासंबंधी आम्ही सहजच विचारल्यासारखे करून त्यांचे मत जाणून घेतले. जे झाले त्याबद्दल बहुतेकांनी हळहळ बोलून दाखवली. एका तरुणाने तर खूपच चीड व्यक्त करत म्हटले, "शेख मुजिबुर रहमान आणि त्यांची मुलगी शेख हसीना यांनी आमच्या देशासाठी जे केले, त्याला तोड नाही. अमेरिकेने फुसलावून आमचा देश भडकवलेला आहे आणि सत्तापालट करवून आणलेला आहे. पण आज ना उद्या, जनता त्यांना योग्य उत्तर नक्की देईल!"

सूरमधल्या हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर, सफाईदार इंग्रजीत बोलणारी एक तरतरीत पाकिस्तानी महिला गिरीशला भेटली होती. आम्हाला हॉटेलांमधून भेटलेल्या सर्वच मुला-मुलींनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले असल्याने, गिरीशने तिलाही विचारले, "तू कुठे ग्रॅज्युएशन केलेस? पाकिस्तानातच का?" त्यावर ती  हसून म्हणाली, "सर, यू विल नॉट बिलीव्ह, पण मी फक्त चौथीपर्यंत शिकलेली आहे!" काहीशा अविश्वासानेच गिरीशने तिच्याबद्दल माहिती विचारली. तिने सांगितले की पाकिस्तानात झेलम नदीच्या पश्चिम तीरावरच्या 'झेलम' नावाच्या (भारत-पाक सीमेजवळच्या) गावी तिचा जन्म झाला होता. वडील तिच्या लहानपणीच वारले होते. केवळ कानावर पडेल ते ऐकून-ऐकून ती इंग्रजी बोलायला शिकली होती. कुणाच्या तरी मदतीने, दुबईमध्ये काम करण्यासाठी गेली आणि तिथे अंगावर पडेल ते काम करत तिने हळूहळू प्रगती केली. दुबईमध्ये तिने बरीच वर्षे काम केले होते. पण तिथल्यापेक्षा ओमानमध्ये कामाचे प्रेशर कमी आणि पगारदेखील चांगला असल्याने ती इथे आलेली होती. गिरीशने सहजच तिला पाकिस्तानबद्दल काही प्रश्न विचारले. पाकिस्तानात सर्वच बाबतीत, सैन्यदलांच्या असलेल्या वर्चस्वावर तिने खूप टीका केली. ती असेही म्हणाली की भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र होऊनदेखील आज भारत पाकिस्तानपेक्षा सर्वच बाबतीत कैक पटींनी वरचढ झाला आहे. पाकिस्तानातली एकंदर परिस्थिती इतकी वाईट आहे की तिच्या झेलम गावातल्या घराचे विजेचे बिल घरभाड्यापेक्षा जास्त येते! 

ओमानमध्ये भेटलेल्या भारतीयांकडूनही आम्हाला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. सूरच्या हॉटेलात भेटलेली वेट्रेस शौमिता आणि सुपरवायझर शॉप्तर्षि चॉक्रोबॉरती या दोघांनीही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले होते. शौमिता मला म्हणाली की तिला प्रवासाची खूप आवड आहे. पण जगभर फिरता-फिरताच पैसे कमवण्याची तिची  इच्छा होती. भारतात, तसेच सिंगापूर व मलेशियामध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ती ओमानमध्ये आली होती. शॉप्तर्षिनेही भारतात नोकरी केली होती व काही काळ तो पुण्याजवळ शिरूरला राहिलेला होता. श्री. मित्रा नावाचे एक बंगाली गृहस्थ सूरमधल्या त्या हॉटेलचे जनरल मॅनेजर होते. त्यांच्या शिफारशीने अनेक बंगाली कर्मचारी त्या हॉटेलात नोकरीसाठी आलेले होते. एक केरळी कर्मचारी तर त्याच हॉटेलात गेली २५ वर्षांहून अधिक काळ कामाला आहे!

वाहिबा सँड्स वाळवंटामधल्या Thousand Nights कँम्पमध्येही काळे नावाचे नाशिकचे गृहस्थ जनरल मॅनेजर होते. त्यांच्या ओळखीने अनेक मराठी मुले तिथे कामाला लागलेली होती. नाशिकच्या एयरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट (AHA) कॉलेजमध्ये शिकलेली आणि ओमानमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरी करत असलेली किमान १५ ते १८ मुले-मुली आम्हाला भेटली. जेमतेम २१ वर्षे वयाच्या त्या मुलांना वर्षातून एकदा भारतात जाण्या-येण्याचा विमानखर्च मिळत होता. कँम्पमध्येच राहून व जेवूनखाऊन, दरमहा सुमारे पंधरा ते पंचवीस हजार रुपये (करमुक्त) त्यांना वाचवता येत होते. जगभरातल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव मिळत होता तो वेगळाच! त्या सगळ्या मुलांकडून एकमुखाने हेच ऐकू आले की या देशातली कार्यसंस्कृती खूपच चांगली आहे. 

ओमानमध्ये आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मोठमोठ्या जाहिरातींचा एकही बोर्ड आम्हाला दिसला नाही. रस्त्यांवर प्लास्टिकचा कचरा किंवा घाण पडलेली नव्हती. शहरांमध्ये स्वच्छ उद्याने होती. अगदी लहान गावांमध्येही सरकारी शाळांच्या पक्क्या आणि नेटक्या, दुमजली, वातानुकूलित इमारती होत्या. प्रत्येक शाळेच्या आवारात खेळांची मैदाने, तसेच अगदी लहान मुलांसाठी घसरगुंड्या/झोपाळे वगैरे होते. दुकानांमध्ये आणि इतरत्र ठिकठिकाणी पुरुषांसोबत बायकादेखील काम करीत होत्या. आम्हाला जागोजागी दिसलेले-भेटलेले ओमानी लोकदेखील मृदुभाषी वाटले. संयुक्त अरब अमिरातीप्रमाणेच ओमानमध्येही खनिज तेलाचा मुबलक पैसा आहे. इथेही अनेक श्रीमंत लोक आहेत. मस्कतमध्ये मोठमोठे मॉलही आहेत. पण आम्हाला कुठेही श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन दिसले नाही किंवा कुणामध्येही पैशाचा माज जाणवला नाही. कदाचित ओमानमध्ये शिक्षणाला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा तो परिणाम असू शकेल, किंवा या देशाची एकंदर संस्कृतीच अशी असेल. 

ओमानमध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे, आणि त्या देशाकडून खूप काही शिकण्यासारखेही आहे. 

कालच भेटलेला एक मित्र मला म्हणाला, "बापट, हाऊ डिड यू गो टू ओमान, ऑफ ऑल द प्लेसेस?"  

मी त्याला इतकेच म्हणालो, "ओह मॅन , यू टू मस्ट गो देअर वन्स!"

(समाप्त)

©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ८)

सूरमधल्या हॉटेलात नाश्ता उरकून आम्ही ओमानच्या शार्किया प्रांतात असलेल्या 'वाहिबा सँड्स' च्या दिशेने निघालो. आम्ही आज जिथे राहणार होतो ते 'रिसॉर्ट' एका वैराण वाळवंटाच्या आत होते. तिथपर्यंत जायला एक कच्चा वालुकामय रस्ता होता. अशा रस्त्यांवर साध्या मोटरगाड्या किंवा बसेसची चाके घसरतात. त्यामुळे आम्हाला '४ X ४, किंवा फोर व्हील ड्राइव्ह' गाडीने जाणे भाग होते (जिच्या चारही चाकांना इंजिनाची चाल मिळते अशी गाडी). आम्हाला 'बिदियाह' नावाच्या गावातल्या एका पूर्वनियोजित ठिकाणापासून पिकअप करायला आमच्या रिसॉर्टनेच दोन ४ X ४ गाड्यांची व्यवस्था केलेली होती.

त्या गावाजवळच आम्ही एका ठिकाणी हलके अरबी जेवण जेवलो आणि आमची बस 'बिदियाह' गावात येऊन थांबली. आम्हाला घेऊन जायला आलेल्या दोन मोटारगाड्या तिथे येऊन आधीच थांबलेल्या होत्या. बिदियाह गावापासून  'Thousand Nights' कँम्प सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. आमच्या गाडीचा ड्रायव्हर स्थानिक 'बैदू' जमातीतला एक तरुण होता. त्याच्या बोलण्याचा 'लहेजा' निश्चितच अल नासर किंवा इतर ओमानी माणसांच्यापेक्षा वेगळा होता. अल नासरसोबत त्याची टकळी अखंड चालू होती. त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो त्या वालुकामय रस्त्यावरून वेगात पण अत्यंत सफाईदारपणे गाडी चालवत होता. आमच्या गाडीत दादा असल्यामुळे, "गाडी शक्यतो कमी वेगात आणि हादरे बसणार नाहीत अशा पद्धतीनेच चालवावी लागेल" ही आम्ही अल नसरला दिलेली सक्त ताकीद त्याने ड्रायव्हरला कळवली असावी असे वाटले. कारण आमच्या कुटुंबाचीच दुसरी गाडी सुसाट पुढे निघून गेली होती. 
चहूकडे रेताड जमीन आणि वाळूच्या टेकड्या दिसत होत्या. अधूनमधून 'वाळवंटातली जहाजे' - म्हणजे उंट-चरताना दिसत होतेच. एका झोपडीवजा घरापाशी आमची गाडी थांबली. त्या झोपडीशेजारीच तारांच्या कुंपणाच्या  आत उंट होते.  "ही वाळवंटातच वास्तव्य करणाऱ्या 'बैदू' लोकांची झोपडी आहे. त्यांच्या 'जीवनशैलीचे दर्शन' होऊ शकेल" असे अल नासरने आम्हाला सांगितले होते. मात्र, 'बैदू' जीवनशैलीचा आभास निर्माण करण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता इतकेच मला जाणवले. तिथे आलेले काही गोरे पर्यटक मात्र त्या वातावरणामुळे 'भारावून गेलेले' वाटले. पुढच्या वाटेला लागल्यावर अल नासर हळूच म्हणाला, "आजकाल या वाळवंटांमध्ये 'बैदू' राहतच नाहीत. तुम्ही बिदियाह गावात एक पक्क्या घरांची वस्ती पाहिलीत ना? हे 'बैदू' तिकडे राहतात आणि दिवसा फक्त उंट चारायला वाळवंटात येतात!" 

काही वेळातच, 'Thousand Nights' कँम्पच्या समोर येऊन गाडी थांबली. वाळवंटात अचानक समोर दिसलेले ते 'रिसेप्शन लाउंज' पाहून गंमतच वाटली. आमच्या 'तंबू'च्या किल्ल्या घेण्यासाठी आम्ही काउंटरपाशी थांबलो होतो. आजच्या जमान्यात प्राणवायूइतकेच अत्यावश्यक झालेले 'वाय-फाय' कनेक्शन इथे उपलब्ध आहे म्हटल्यावर 'हुश्श' झाले. काउंटरवरची मुलगी गिरीशला 'वाय-फाय'चा पासवर्ड सांगू लागताच, तिच्या उच्चारांची ढब मला अगदी ओळखीची वाटल्यामुळे मी कान टवकारले. तिने पासवर्ड सांगताच मी तिच्याकडे पाहून म्हटले, "अरे वा! सोप्पा आहे" त्यावर डोळे विस्फारत ती शुद्ध मराठीत म्हणाली , "हो SSS ! अगदीच सोपा आहे!" लगेच चौकशी केली, तर ती नाशिकची ईशा आहे असे समजले. तिच्याच शेजारी उभा असलेला, नाशिकचाच हर्षवर्धनही लगबगीने पुढे आला. ओमानच्या वाळवंटी रिसॉर्टमध्ये आमच्या चक्क मराठीत गप्पा सुरु झाल्या. पण  गप्पा आवरत्या घेणे भाग होते, कारण सूर्यास्ताच्या आत आम्हाला वाळवंटातले काही विशेष अनुभव घ्यायला जायचे होते. 

खास वाळवंटात चालणाऱ्या स्कूटरवरून किंवा उंटांवरून फेरफटका मारता येणार होता, 'Dune Bashing Ride' घेता येणार होती.अर्थात, यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार होते.  Dune Bashing म्हणजे काय, तर एका ४ X ४ गाडीत बसवून वाळूच्या टेकड्यांवर रफ राईड! आर्मीच्या नोकरीत असताना, ईशान्य भारतात आणि राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या 'रफ राइड्स' मी केलेल्या असल्याने, पैसे भरून हाडे खिळखिळी करून घ्यायची मला अजिबात इच्छा नव्हती. स्वाती आणि गिरीशही इच्छूक नव्हते, आणि दादांना न्यायची तर कल्पनाही अशक्य होती. गिरीशची पत्नी प्राची आणि मुलगी दीपशिखा भलत्याच उत्साही असल्यामुळे त्या जायला निघाल्या. तिथेच त्यांना वाळवंटातला सूर्यास्तही दाखवणार होते. खरे पाहता सूर्यास्त सगळीकडे सारखाच असतो. तरीदेखील, समुद्राच्या पुळणीवरून, महाबळेश्वर किंवा माथेरानच्या 'सनसेट पॉईंट' वरून आपण तितक्याच औत्सुक्याने सूर्यास्त पाहतो हेही मानलेच पाहिजे!

सर्वप्रथम तंबूमध्ये सामान टाकून, जरा ताजे-तवाने होण्यासाठी आम्ही तंबूत गेलो. त्या वातानुकूलित तंबूमध्ये सर्व पंचतारांकित सोयी होत्या. खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. मी आणि गिरीश पाय मोकळे करायला अल नासरसोबत बाहेर पडलो आणि स्वाती दादांजवळ थांबली. अल नासर सहजच म्हणाला, "चला, आपल्याच गाडीतून तुम्हाला सूर्यास्त पाहायला नेतो. कोणत्या पॉईंटवरून बेस्ट दिसेल ते मला माहिती आहे !"
प्राची आणि दीपशिखा जो अनुभव पैसे भरून घेणार होत्या, तो आम्हाला फुकटात (आणि मुख्य म्हणजे आम्हाला हव्या त्या वेगाने) घ्यायला मिळतोय म्हटल्यावर आम्ही आनंदाने अल नासरसोबत निघालो. वाळूच्या टेकडीवर चढायला रस्ता असा नव्हताच, पण घाटामध्ये घेतात तशी वळणे घेत-घेत गाडी सफाईदारपणे चढत निघाली. पण टेकडीवर गेल्यावर मात्र 'योग्य जागे'च्या शोधात अनेक खड्ड्यांमधून आणि उंचवट्यांवरच्या अरुंद मार्गावरून आमचा बैदू चालक हिंडत निघाल्यामुळे आम्हालाही थोडेफार Dune Bashing करता आले. अर्थात, वेग जास्त नसल्यामुळे हाडे मात्र शाबूत राहिली! गाडीतून अनवाणी पायांनी उतरल्यावर मऊसूत वाळूत पावले लोळवत फिरायलाही मजा आली. अल नसरला अचानक मला 'शेख' बनवण्याची हुक्की आल्याने त्याने माझ्या डोक्यावर खास ओमानी पद्धतीचा फेटा बांधून माझा फोटोही काढला!

आसपास चिटपाखरूही नव्हते. वाऱ्यामुळे वाळूच्या टेकडीच्या कपाळावर पडलेल्या सुबक आठ्या मोजण्यात, आणि त्यावरून चालत गेलेल्या किड्यांच्या पायांच्या ठशांचा माग काढता-काढता, माझ्या आयुष्याची अनेक वर्षे नकळतच गळून पडली आणि मी पुन्हा शाळकरी मुलगा झालो! हळूहळू खाली जात चाललेल्या सूर्याकडे पाहत, 'कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा' असे म्हणेपर्यंत निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसल्यानंतर अल नसरने घोषणा केली की आता आपण वळणे-वळणे घेत नव्हे तर वाळूच्या उभ्या कड्यावरून सरळ खाली उतरणार आहोत! कड्यांवरून गाड्या चढवण्या-उतरवण्याच्या अशा 'साहसी खेळां'चे व्हिडिओ मी पूर्वी पाहिले होते, पण अनुभव कधीच घेतलेला नव्हता. जी टेकडी चढायला आम्ही १५ मिनिटे घेतली होती, ती अक्षरशः तीस सेकंदात उतरून आम्ही खाली आलो आणि पुढच्या दोन मिनिटात कँम्पमध्ये परत पोचलोदेखील! तो अनुभव थरारक खरा, पण पुन्हा-पुन्हा घ्यावासा वाटण्यासारखा होता.  

वाळवंटातली संध्याकाळ तिथल्या दिवसाच्या तुलनेमध्ये खूपच आल्हाददायक असते, कारण तापमान बरेच खाली येते. रिसेप्शनला लागूनच एक 'कँम्प फायर'ची जागा होती. तिथे सात वाजल्यापासून शेकोटी पेटवलेली होती. त्या भोवती गोल रिंगण करून गाद्या घातलेल्या होत्या. लोक शांत बसून 'माहौल' चा आनंद घेत होते. शेजारी काही बैदू लोक आगीवर भाजलेल्या छोट्या-छोट्या गरम रोट्या खायला देत होते. तिथेच भेटलेल्या मुंबईच्या एका तरुण जोडप्याबरोबर माझ्या छान  गप्पा झाल्या. ते नवरा-बायको उत्साही पर्यटक होते आणि आजवर दोघे-दोघेच अनेक देश हिंडलेले होते. आता तर त्यांच्या वर्षभराच्या तान्ह्या मुलाला सोबत घेऊन, स्वतःच भाड्याची गाडी चालवत ओमानमधे सगळीकडे हिंडत होते! 
जवळच जेवणाच्या हॉलमध्ये बुफे लावलेला होता. पंचतारांकित हॉटेलात असतात तशा प्लेट्स, काटे-चमचे आणि सजावट होती. जेवणाचा मेनूदेखील पंचतारांकित आणि भरगच्च होता. तिथे जेवण बनवणारे, बुफे लावणारी मुले आणि तिथला केटरिंग व्यवस्थापक हे सगळे भारतीय व बांगलादेशी होते. त्यामुळे आमची विचारपूस ते अधिक आपुलकीने करीत होते. व्यवस्थापकानेही आवर्जून येऊन आम्हाला काय हवे-नको ते विचारून तशी सोय केली. 

जेवण झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एका हेलिपॅडवर गेलो. अहमद नावाचा एक खगोलशास्त्राचा अभ्यासक आमच्यासोबत होता. आसपास मनुष्यवस्ती अजिबात नसल्याने गडद अंधार होता. आकाशदर्शनाची मला तशी फारशी कधी गोडी लागलेली नाही. पण आमच्या दोन्ही मुलांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताकरता पदके जिंकलेली आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी केलेल्या आकाशदर्शन मोहिमांमध्ये त्यांच्यासोबत जाण्याइतपतच माझा सहभाग असे. पण अहमद इतक्या उत्साहाने आणि आत्मीयतेने सगळी माहिती सांगत होता आणि प्रश्नांची उत्तरे देत होता, की माझ्यासारख्यालाही त्यात रस वाटावा. न राहवून मी त्याला त्याचे कारण विचारलेच. तो म्हणाला की, त्याला लहानपणापासून या विषयात रस होता. आता तर खगोलशास्त्राचा प्रचार-प्रसार करणे हाच त्याचा व्यवसाय होता. इथल्या पर्यटकांच्या गर्दीच्या काळात तो या कँम्पमध्ये येतो आणि इतर महिन्यांमध्ये इतरत्र जाऊन हेच काम करतो, असे त्याने सांगितले. 

अर्ध्या दिवसाच्या वास्तव्यात, वाळवंटातील भ्रमणाचा आनंद आम्ही पुरेपूर घेतला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही मस्कतला परतणार होतो. अल नासरने रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला बजावून सांगितले की, "उद्या मस्कतच्या वाटेवर, 'वादी बिन खालिद' या जागी आपण थांबायचे आहे. तिथल्या स्वर्गीय अनुभवासाठी तुम्हाला तीन तास देखील कमीच पडतील. त्यामुळे इथून सकाळी लवकर निघू या." 

उद्याचा विचार करता-करता, वाळवंटातल्या त्या शांत वातावरणात आम्हाला केंव्हा झोप लागली समजलेही नाही... 

(क्रमशः)

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ७)

सफरीच्या पाचव्या दिवशी, नाश्ता लवकर उरकून आम्ही हॉटेल सोडले. आमच्या सफरीचा कप्तान देवाशीष आणि आमची सून आकांक्षा आमच्यासोबत येणार नव्हते. पुढचे तीन दिवस त्या दोघांचाच संयुक्त अरब अमिरातीमध्ये दौरा होता. तो आटोपल्यावर ते आम्हाला परतीच्या मस्कत-मुंबई प्रवासासाठी थेट मस्कत विमानतळावरच भेटणार होते. 

ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर मस्कतपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर नावाच्या शहराकडे आमच्या मिनीबसने आम्ही निघालो. वाटेत एक-दोन प्रेक्षणीय 'वादियाँ' पाहत दुपार-संध्याकाळपर्यंत सूरला पोहोचायचे होते. आमचा गाईड, अल  नासर आमच्यासोबत होताच. मस्कत सोडल्यानंतरचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगत जात नसल्याने, आजूबाजूचे निसर्गचित्र रुक्षच दिसत होते. चाकाखालचा रस्ता तेवढा मऊसूत असल्याने प्रवासाचा शीण अजिबात जाणवत नव्हता. 

मस्कतपासून अंदाजे १०० किलोमीटर अंतरावर समुद्राच्या किनारी कुरियात नावाच्या एका लहान गावाकडे जाणारा फाटा लागला. आम्ही आधी वाचलेल्या वर्णनावरून असे समजले होते की ते एक पुरातन 'फिशिंग व्हिलेज' असून तिथल्या मच्छीमारांच्या बोटी आणि मासळी बाजार पाहण्यासारखा आहे. वर्णनावरून तरी आम्हाला अशी शंका आली होती की ते पर्यटकांना भुलवण्यासाठी केलेले एखादे 'फिशी' ठिकाण असावे. अल नसरनेही आमच्या शंकेला दुजोराच दिला. ज्याने कोकणातली कोळ्यांची वस्ती आणि मासळीबाजार पाहिलेला आहे त्यांना वाळवंटातलगतच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर विलक्षण अद्भुत असे काही पाहायला मिळायची शक्यता कमी असल्याने, कुरियातच्या फाट्याला आम्ही फाटा दिला आणि सरळ पुढे निघालो. 

काही अंतर गेल्यावर हमरस्ताच आपसूक किनाऱ्याच्या दिशेने वळला आणि समुद्रकिनाऱ्याला समांतर धावू लागला. किनाऱ्यापासून सुमारे ६०० मीटर आत असलेल्या 'बिम्माह सिंक-होल' नामक ठिकाणी आमची बस थांबली. या जागेचे वर्णनदेखील आम्ही आधी वाचलेले होते. या भागात चुनखडीच्या दगडांचे प्रमाण खूप आहे. कदाचित हजारो वर्षांपूर्वी, एका ठिकाणची चुनखडी भुसभुशीत होऊन ती जमीन खचली आणि एक मोठा खड्डा तयार झाला. त्या खड्ड्याखाली पाण्याचा झराही असल्याने तिथे एक छोटे सरोवर तयार झाले. जमिनीपासून सुमारे ६०-६५ फूट खाली असलेले, नीलमण्याच्या रंगाचे हे तळे सव्वादोनशे फूट लांब आणि दीडेकशे फूट रुंद आहे. कडे-कडेने पाण्यातून चालत जाण्यासारखे किंवा डुंबण्याजोगे असले तरी मध्यभागी त्या तळ्याची खोली अंदाजे ३०० फूट आहे असे वाचले होते. जमिनीवरून खाली तळ्याजवळ उतरण्यासाठी जिना केलेला होता. आम्ही पाहिले तेंव्हा त्या सिंक-होल'मध्ये काही पर्यटक डुंबत असलेले दिसले. एक मनुष्य तळ्याशेजारच्या कपारीतून वर चढत जाऊन त्या तळ्यात उड्यादेखील मारत होता. कडक उन्हाची वेळ असल्याने जमिनीवर तापमान बरेच होते. पण खाली तळ्याजवळ उतरताच आल्हाददायक गारवा जाणवला. पुढे प्रवास करायचा असल्याने, कितीही मोह झाला तरी आम्हाला डुंबायला वेळ नव्हता. फक्त फोटो काढले आणि तिथून परत फिरलो.

पुढे सूरपर्यंतचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगतच होता. आम्हाला अल नासरने सांगितले होते की सूरच्या अलीकडे 'वादी शब' आणि आणि 'वादी तिवी' अशा दोन 'वादियाँ' पाहण्यासारख्या होत्या. वाळवंटातल्या लोकांना दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व माहीत असल्यामुळे वादीचे अप्रूप असणे स्वाभाविकच आहे, कारण, डोंगरात एखादा झरा असल्यास त्याचे पाणी वादीमधूनच वाहत येते. 'वादी शब'जवळ पुष्कळ पर्यटक दिसले. वाहत्या पाण्यातून ते लोक बोटीने कुठेतरी जात होते. बोटीची फेरी करून परत येणाऱ्या एका भारतीय तरुणाकडून मी माहिती घेतली. १०-१५ मिनिटे बोटीतून जाऊन पलीकडच्या तीरावर ते डोंगरावर चढून आले होते. पण विशेष वेगळे असे काही पाहण्यासारखे नव्हते असे तो म्हणाला. थोडा वेळ तिथे थांबून आणि फोटो काढून आम्ही 'वादी तिवी'च्या दिशेने पुढे निघालो. 

'वादी तिवी' मध्ये मात्र खूपच हिरवाई आणि फुलाफळांच्या बागा दिसत होत्या. आम्हाला बसमधून उतरवून अल  नासर एका खासगी फार्ममध्ये घेऊन गेला. आपल्यासारख्या देशातील लोकांना अशा बागांचे फारसे कौतुक असायचे कारण नाही. पण या रुक्ष देशात फिरत असताना अचानक समोर आलेली, केळी, संत्री, पपयांनी लगडलेली झाडे व डेरेदार आंब्याची झाडे पाहून मन प्रसन्न झाले. पाणी साठवण्याकरता उंचावरच्या भागात हौद बांधून घेतलेले होते. एकमेकांना जोडणारे उभे-आडवे पाट संपूर्ण बागेतून काढलेले होते. उपलब्ध होणारे सगळे पाणी खुबीने वापरण्याची योजना केलेली होती. या वादीच्या दोन्ही बाजूंना बागा करण्यासाठी, ओमान सरकारने स्थानिक रहिवाश्यांना जमीन वाटून दिलेली आहे. इथे इतर व्यवसायाशी संबंधित बांधकामे करायला मनाई आहे, अशी माहिती अल  नासरने आम्हाला पुरवली.

सूरमध्ये पोचायला दुपार होऊन गेली असल्याने भूक कडाडली होती. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका बऱ्यापैकी हॉटेलात बसून आम्ही अरबी जेवणावर ताव मारला. आता सूरमध्ये पाहण्यासारखे असे एकच महत्वाचे ठिकाण राहिले होते - ते म्हणजे काही शतकांपासून इथे कार्यरत असलेला बोटींचा कारखाना. 

सहाव्या शतकापासूनच ओमानमधल्या ग्वादर, मस्कत, सूर, सलालाह येथील बंदरांचे महत्व व्यापाऱ्यांना समजलेले होते. बलुचिस्तानमधल्या कलात राज्याच्या खानाने अठराव्या शतकात, ग्वादर हे बंदर सांभाळण्यापुरते ओमानच्या राजाला देऊ केले होते. ते पुढची १५० वर्षे ओमानच्याच कब्जात राहिले. १९४७ नंतर बलुचिस्तानमधील सर्व संस्थाने पाकिस्तानात विलीन केली गेली. ओमानकडून ग्वादर बंदर परत मिळवण्यात पाकिस्तानला १९५८ साली यश आले. आज पाकिस्तानच्या संमतीनेच, चीनमधील शिंजियांग प्रांतातून ग्वादर बंदरापर्यंत, ३००० किलोमीटरचा थेट रस्ता बांधला जात आहे. आणि भारतासाठी दुर्दैवाची, आणि चीड आणणारी गोष्ट अशी, की पाकिस्तानने व्यापलेल्या, गिलगिट-बाल्टिस्तान या भारतीय भूभागातून तो 'China-Pakistan Economic Corridor' नावाचा रस्ता  काढला जात आहे!

पूर्वीच्या काळी ओमानच्या मार्गाने होत आलेला व्यापार पाहता, सूरमध्ये बोटींचा कारखाना (Dhow Factory) उभारला गेला नसता तरच नवल वाटले असते. सध्या अस्तित्वात असलेला कारखाना सतराव्या शतकात सुरु झाला. त्यामध्ये पूर्वीपासून काम करणारे पुष्कळसे कारागीर भारतीय होते आणि आजही आहेत. या कारखान्यात आता लाकडी सांगाडा असलेल्या मोटरबोटी बनवल्या जातात. गेल्या तीन वर्षांपासून तिथे बनत असलेली एक मोठी लक्झरी बोट आम्ही पाहिली. सुमारे २१ कोटी रुपयांची ती बोट एक ओमानी व्यापारी बनवून घेत आहे असे समजले. 

त्या फॅक्टरीच्या आवारातच एक भेटवस्तूंचे दुकान आणि एक छोटेसे संग्रहालय आहे. दुकानामध्ये बोटींच्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या ज्यांची लांबी हातभरापासून ते ४-६ फुटांपर्यंत होती. घरोघरी किंवा संस्थांच्या दर्शनी दालनात काचेच्या शोकेसमध्ये घालून त्या ठेवता येण्यासारख्या होत्या. खलाश्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या सुकाणू सारख्या इतरही अनेक वस्तू तिथे विकायला ठेवल्या होत्या. संग्रहालयामध्ये हिंडताना खूप नवीन माहिती मिळाली. बोट कारखान्याचा सतराव्या शतकांपासूनचा इतिहास, बोटी बनवताना वापरले जाणारे साहित्य आणि त्याची कृती, पूर्वापार होत आलेल्या सागरसफरींमध्ये वापरलेल्या विविध वस्तू, खलाशांनी वापरलेले जुने नकाशे, अनेक फोटो, शंभर वर्षांपूर्वीचे बोटीचे तिकीट, अशा अनेकविध वस्तू आम्ही पाहिल्या. 

दिवसभराची आमची भटकंती पूर्ण झालेली होती. सूरमध्ये फक्त रात्रीपुरता मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहिबाच्या वाळवंटाकडे कूच करायचे होते. हॉटेलमध्ये गेल्या-गेल्या समोर वेलकम ड्रिंक घेऊन एक मुलगी उभी होती. तिच्या ड्रेसवर लावलेले 'सौमिता' हे नाव वाचून ती बंगाली असावी असा मी अंदाज केला आणि हात जोडून 'धोंनोबाद' म्हटले. पाहुण्यांनी तिच्या मातृभाषेत आभार मानल्यामुळे अर्थातच ती सुखावली होती. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेला शौमिता आणि शॉप्तर्षि या दोघांसोबत माझ्या थोड्या गप्पा झाल्या. दरम्यान गिरीश काउंटरवरून आमच्या खोलीच्या किल्ल्या घेत होता. तिथे ड्यूटीवर असलेल्या पाकिस्तानी तरुणीकडून त्याला काही आश्चर्यकारक माहिती मिळाली. 

पण ते नंतर... 

(क्रमशः)

©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ६)

ओमान सफरीमधला आमचा चौथा दिवस 'सागरसृष्टी-दर्शना'साठी राखीव होता. त्यासाठी लवकर नाश्ता उरकून, आठ वाजायच्या आत समुद्रकिनाऱ्यावरच्या, अल मौज येथील 'मोला-मोला डायव्हिंग सेन्टर' ला पोहोचणे आवश्यक होते. हॉटेलमधून निघून समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणे आणि संध्याकाळी परत येणे, इतकाच प्रवास असल्याने आम्ही आमच्या मिनीबसला सुट्टी दिलेली होती. 'जाण्या-येण्यासाठी टॅक्सी करू' असा विचार आम्ही केला होता. मस्कतमध्ये 'ऊबर' उपलब्ध नाही. काही स्थानिक ऍप आहेत, पण ते वापरून मागवलेल्या टॅक्सी लवकर येत नाहीत. कशाबशा आम्हाला दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही वेळेत अल मौज येथे पोचलो.  

आमचा भाचा देवाशीष याने 'मोला-मोला डायव्हिंग सेन्टर' सोबत आगाऊ संपर्क करून, मोटरबोट सफर, स्कुबा डायव्हिंग, आणि स्नॉर्केलिंग चे आयोजन आम्हा सर्वांसाठी केलेले होते. मी व गिरीश वगळता बाकी सगळे स्कुबा-डायव्हिंगचा अनुभव घेणार होते. स्कुबा-डायव्हिंगसाठी माझ्या डॉक्टरांची पूर्वपरवानगी मी घेतलेली नसल्याने मी फक्त स्नॉर्केलिंग करणार होतो. दादा, म्हणजे माझे ९२ वर्षाचे सासरे समुद्रात उतरणार नसले तरी ते आमच्यासोबत बोटीवर येणार होते. मनाने अजूनही तरुण असल्याने, ते हसून म्हणाले, "तुम्हा सर्वांना मजा करताना पाहण्याची मजा मी घेणार आहे!" तरीही आयोजकांनी तीन-तीनदा आम्हाला विचारून खात्री करून घेतली की दादा निश्चितपणे बोटीवर येऊ इच्छित आहेत आणि त्यांना मोटारबोटीच्या प्रवासाचा त्रास होणार नाही. दादांनी ठासून होकार दिल्यानंतर आयोजकांना त्यांचे खूप कौतुक वाटल्याचेही जाणवले. 

'मोला-मोला' च्या बोटीवर चढण्यापूर्वी आम्हाला आमचे 'किट' दिले गेले. बोटीवर कप्तानाव्यतिरिक्त सुमारे २५ पर्यटक आणि 'मोला-मोला' चे चार मदतनीस/प्रशिक्षक होते. आमच्याव्यतिरिक्त इतर सर्व पर्यटक आणि 'मोला-मोला'चे चारपैकी तीन मदतनीस युरोपमधल्या वेगवेगळ्या देशातले होते. एकमेव भारतीय (आणि आशियाई) गट म्हणजे केवळ आमचाच परिवार होता. 'विल' (कदाचित विल्यम) नावाचा एक उंचापुरा आणि बलदंड तरुण त्या चौघांचा नेता होता असे दिसले. जेमतेम पंचविशी-तिशीच्या त्या तरुणांनी ओमानसारख्या परदेशात राहून चालवलेला हा उपक्रम कौतुकास्पद होता. बोट सुटण्याआधी एका मदतनीसाने सर्व पर्यटकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर प्रत्येकाला एकेक 'संमतीपत्र' दिले गेले जे वाचून प्रत्येकाने सही करणे भाग होते. समुद्रात ज्या धाडसी क्रीडाप्रकारात आम्ही सहभागी होणार होतो त्यातील धोक्यांसंबंधी आम्हाला कल्पना आहे व आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर त्यात सामील झालो असल्याचे ते पत्र होते. 

त्यानंतर त्या मदतनीसाने आम्हा सर्वांना दिवसभराच्या कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. सकाळच्या सत्रात एकदा आणि दुपारच्या सत्रात एकदा, असे दोन वेळा आम्हाला स्कुबा-डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करता येणार होते. आमचे दुपारचे जेवण बोटीवरच असणार होते. एका शीतपेटीमधे पाण्याच्या बाटल्या व थंड पेये, आणि शेजारीच चिप्सची पाकिटे, केळी वगैरे ठेवलेले होते. मनाला आवडेल ते, हवे तेंव्हा खायची-प्यायची मुभा होती. पुरुष व स्त्रियांसाठी एकेक टॉयलेटही बोटीवर होते. बोटीच्या टपावर गाद्या अंथरलेल्या होत्या व एका वेळी दहा जणांना टपावर बसण्याची (लोळण्याचीही) सोय होती. 

अल मौजपासून सुमारे ३० किलोमीटर दूर समुद्रात असलेल्या, 'अल दिमानियात' नावाच्या एका द्वीपसमूहाच्या दिशेने आमची मोटरबोट निघाली. आम्ही आनंदात गप्पा मारत, हास्यविनोद करत होतो, फोटो काढत होतो. अधूनमधून कुणी खाद्यपेयांचा आस्वाद घेत होते. 

आमच्यापैकी दोघा-दोघांना एकत्र बोलावून 'विल' काही सूचना देऊ लागला. स्कुबा डायव्हिंगचे किट व पाठीवरचा ऑक्सिजन सिलिंडर घालण्याची पद्धत, पाण्याखाली जाताना आणि गेल्यावर करायच्या (आणि न करायच्याही) हालचाली, त्या संपूर्ण काळात बाळगायची सावधगिरी वगैरे तो समजावून सांगत होता. डोळ्यांवर लावायचा चष्मा व त्यालाच जोडलेला, नाकावर लावायचा मास्क आम्हा सर्वांच्या किटमध्ये होताच. पर्यटकांपैकी काहीजण अगदी सराईत पाणबुडे असावेत असे वाटले. त्यांना कोणत्याच सूचनांची गरज नव्हती आणि त्यांच्या किटमध्ये तर रबरी डायव्हिंग सूटदेखील होता जो त्यांनी अंगावर चढवला. आपापले किट व ऑक्सिजन सिलिंडरही अंगावर चढवून ते झटकन तयार झाले. 

'अल दिमानियात' द्वीपसमूहापैकी एका बेटाच्या बरेच अलीकडे आमची बोट थांबली. पर्यटकांपैकीच २-४ सराईत पाणबुडे (Deep Sea Divers) समुद्रात उतरले आणि खोल पाण्यात बुडून दिसेनासे झाले. मग बोट जराशी पुढे जाऊन त्या बेटाजवळ उभी राहिली. तिथे पाण्याची खोली काही ठिकाणी सुमारे २० फूट तर काही ठिकाणी ४० फूट होती. आमचा प्रशिक्षक, 'विल', आमच्यापैकी दोन-दोन अननुभवी पर्यटकांना एकाचवेळी बरोबर घेऊन पाण्याखाली जात होता. कमी-अधिक फरकाने, ५ ते १५ मिनिटे पाण्याखाली राहून लोक वर येत होते. पाण्याखाली जाण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येकाच्याच मनातला काहीसा घाबरलेला, अनिश्चिततेचा भाव चेहऱ्यावर दिसत असल्याने, त्यांचे चेहरे 'फोटो काढण्यासारखे' झालेले होते. बुडी मारून वर आल्यानंतर मात्र एका नवीन, व चित्तथरारक अनुभवामुळे मिळालेला आनंद, आणि 'आपण हे करू शकलो' अश्या अर्थाची त्यांची विजयी मुद्राही कॅमेऱ्यात टिपण्यासारखी होती. 

'विल'सोबत जोड्या-जोड्या डायव्हिंगसाठी जात असताना, 'ऍना' नावाची दुसरी प्रशिक्षक उरलेल्या लोकांचा गट घेऊन स्नॉर्केलिंगसाठी निघाली. मीही त्याच गटात होतो. दोन वर्षांपूर्वी मी थायलंडच्या सफरीवर असताना, आयुष्यात पहिल्यांदाच स्नॉर्केलिंग केलेले होते. त्यामुळे ते कसे करायचे याची माहिती होती. स्नॉर्केलिंग करताना आपण पाण्याच्या पृष्ठभागाच्या थोडेसेच खाली बुडून पोहत जायचे असते. आपल्या डोळ्यांवर पाण्यात घालायचा चष्मा आणि नाकावर मास्क लावलेला असतो. एक फूटभर लांबीची, कडक प्लॅस्टिकची नळी चष्म्याच्या जोडलेली असते. त्या नळीचे एका टोकाकडचे भोक तोंडात घेऊन, दातांखाली पक्के दाबून तोंड मिटायचे असते. नळीचे दुसरे भोक पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहते, ज्यातून आपण तोंडाद्वारे हवा खेचत व सोडत राहायचे असते. या सर्व काळात नाक मास्कचा आत बंदिस्त असते व नाकाने श्वासोच्छवास करता येत नाही. पोहताना सावधगिरी म्हणून, हवे असल्यास अंगात लाईफ जॅकेट घालता येते. 

पाण्याखालची जीवसृष्टी आणि समुद्रातळाशी असलेले प्रवाळ (Corals) पाहताना वेळेचे भानच सुटते. मला विविध रंगांचे लहान-मोठे मासे आणि कासवे दिसली. एक मोठे कासव खालून वर पोहत-पोहत अगदी माझ्या नाकाखालीच येऊ लागले. पण अगदी जवळ येताच त्याने मार्ग बदलला आणि माझ्याशेजारीच त्याने पाण्याबाहेर डोके काढले. थोडा वेळ हवेत श्वास घेऊन ते पुनः पाण्याखाली गेले. मग मी त्याच्या पाठलागावर निघालो. पुढे पोहत निघालेल्या त्या कासवाच्या मानेभोवती एक मोठा मासा सतत गिरक्या घालत-घालत पोहत होता. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता. जणू काही जमिनीवरून त्यांच्या जगात फिरायला आलेल्या माझ्यासारख्या पाहुण्याचे मनोरंजन करण्याची जबाबदारी त्या दोघांनी उचलली होती! स्नॉर्केलिंग करताना नुसते वेळेचेच नव्हे, तर वयाचेही भान सुटते हे नंतर माझ्या लक्षात आले!

दुपारच्या जेवणात केळी, पिटा ब्रेड व हम्मस, दोन-तीन तऱ्हेच्या चटण्या व सॉस, शाकाहारी व मांसाहारी कबाब अशा गोष्टी होत्या. आम्हाला एक गोष्ट खूपच कौतुकास्पद वाटली. विल, ऍना, आणि इतर दोघा युवा आयोजकांनी आम्हाला सकाळी बोटीवर घेण्यापासून ते समुद्राच्या पाण्यामध्ये नेऊन आणण्यापर्यंत सर्व कामे केली होती. त्यांचीही बरीच दमणूक झालेली होती. तरीही जेवणाच्या वेळी अतिशय चपळाईने हालचाली करत, त्या छोट्याश्या बोटीच्या मध्यभागी त्या चौघांनीच एक बुफेचे टेबल मांडले. त्यावर टेबलक्लॉथ घालण्यापासून ते जेवणाच्या बशा मांडून सर्वांना आग्रहाने जेवू घालण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली. आम्ही या सफरीचे पैसे भरलेले असल्यामुळे या सेवा आम्हाला मिळणे अपेक्षितच होते. परंतु, ज्या उत्साहाने, हसतमुखाने आणि आपुलकीने ते तरुण ही कामे करीत होते ते वाखाणण्याजोगे होते. विलने तर स्वतःच्या मनानेच आमच्या दादांना पिटा ब्रेड व कबाबचा रोल करून खायला दिला आणि अगदी स्वतःच्या वडिलांप्रमाणे वागणूक त्यांना दिली.  

जेवणानंतर पुन्हा दुपारच्या सत्रातले सागरभ्रमण करून झाले. परतीची वेळही झाली होती आणि सगळेच दमलेलेही होते. मोटारबोट वेगाने किनाऱ्याकडे येत असताना बहुतांश पर्यटक काहीसे अंतर्मुख झालेले जाणवले. काही जण दिवसभरातल्या थरारक अनुभवांची उजळणी करत असावेत, तर काहींना नुसतेच परतीचे वेध लागले असावेत. मी आणि गिरीश बोटीच्या कप्तानासमोर असलेल्या छोटयाश्या डेकवर बसून अथांग सागराच्या दर्शनाचा आणि बोटीच्या वेगाचा आनंद घेत होतो. आमच्या बोटीशी जणू स्पर्धा करत असल्याप्रमाणे, काही पक्षी शेजारून उडत चालले होते. दूरवर मस्कतचा किनारा दिसायला लागला तसे आमच्यासह सगळेच पर्यटक आनंदी झालेले दिसले. गिरीशच्या व माझ्या मनात एकदमच विचार आला तो शेकडो वर्षांपूर्वी आपले घर-दार सोडून अज्ञाताच्या प्रवासावर निघणाऱ्या खलाशांचा! 

अनेक दिवसांच्या सागरी प्रवासानंतर किनारा दिसल्यावर त्यांना तर किती आनंद होत असेल?

पण त्याच वेळी मला कुसुमाग्रजांनी लिहिलेले 'कोलंबसाचे गर्वगीत'ही आठवले... 

 "अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला..."

(क्रमशः)

©कर्नल आनंद बापट 


शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ५)

मस्कत शहर पाहायला आम्ही बाहेर पडलो. आमच्या यादीमध्ये जुन्या शहरातला मत्रा 'सूक' नावाचा बाजार, जुना राजवाडा, रॉयल ऑपेरा हाऊस, आणि सुलतान काबूस मशीद या ठिकाणांचा समावेश होता. आमच्यातल्या हौशी 'शॉपर्स'ना सूकबरोबरच इथल्या मॉल्समध्येही जाऊन शॉपिंगचे सुख अनुभवायचे होते. पण अल नसरच्या सल्ल्यानुसार, सर्वप्रथम 'सुलतान काबूस ग्रँड मॉस्क' मध्ये जायचे ठरले, कारण ती मशीद सकाळी ११ नंतर दुपारच्या प्रार्थनेसाठी बंद होणार होती. ओमानमधल्या ठिकठिकाणच्या इमारतींना, उद्यानांना, संस्थांना ज्या व्यक्तीचे नाव दिलेले आहे त्या दिवंगत सुलतान काबूसबद्दल कुतूहल जागृत होणे स्वाभाविक आहे. 

इ.स. १७४४ मध्ये ओमानी वंशाच्या 'अल सैद' घराण्याचा पहिला शासक, 'इमाम अहमद बिन सैद अल बुसैदी' याने इराणी आक्रमकांना हुसकावून लावले आणि ओमान व झांझिबारमध्ये मध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. त्यापुढे आजतागायत याच घराण्याची सत्ता ओमानमध्ये कायम आहे. 'काबूस बिन सैद अल सैद' हा ओमानच्या राजघराण्यातील चौदावा सुलतान होता. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. सँडहर्स्ट येथील ब्रिटिश मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो पुढील दोन वर्षे ब्रिटिश सैन्यात अधिकारी होता. १९६४ साली तो मायदेशी परतला. पण त्याचे पुरोगामी आणि स्वतंत्र विचार पसंत न पडल्यामुळे त्याच्या वडिलांनीच त्याला पुढील सहा वर्षे राजमहालामध्ये नजरकैदेत ठेवले. २३ जुलै १९७० ला काबूसने वडिलांविरुद्ध रक्तपातविरहित बंड केले आणि त्यांना निष्कासित करून तो ओमानचा नवा सुलतान झाला. या बंडाला ब्रिटिशांची फूस आणि अप्रत्यक्ष मदत होती असे बोलले जाते. परंतु, जे झाले ते ओमानच्या भल्यासाठीच झाले असे आता म्हणता येईल. 

सुलतान काबूसने सत्ता हाती येताच काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. गेली अनेक वर्षे स्वतःच्याच कोषात बंद होऊन जगापासून तुटलेल्या ओमान देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध त्याने पुनर्स्थापित केले. १९६० च्या दशकात ओमानमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलसाठे सापडले होते. खनिज तेलाच्या निर्यातीमधून मिळत राहिलेला पैसा वापरून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सुलतान काबूसने चंग बांधला. १९७० साली संपूर्ण ओमानमध्ये केवळ तीन शाळा होत्या ज्यात फक्त ९०० मुले शिकत होती. ओमानमधल्या एकाही मुलीने शाळा पाहिलीदेखील नव्हती. आज त्या देशातल्या एकूण १८०० देशी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधून साडेसात लाख विद्यार्थी शिकत आहेत, आणि त्यापैकी मुलींची संख्या सुमारे ५० टक्के आहे. ओमानमध्ये २१ भारतीय शाळा आहेत ज्यामध्ये भारतीय संस्कृतीला अनुसरून शिक्षण दिले जाते. ही माहिती आम्हाला पुढे वाहिबाच्या वाळवंटात भेटलेल्या एका भारतीय हिंदू डॉक्टरकडून मिळाली. ओमानमध्येच जन्मलेली त्याची धाकटी मुलगी अशाच एका 'इंडियन स्कूल' मध्ये शिकत होती.  

जी गत शिक्षणाची, तीच पूर्वी आरोग्यव्यवस्थेची आणि मूलभूत सुविधांची होती. १९७० साली मस्कतच्या रस्त्यांवर पथदिवेही नसल्याने लोक कंदील घेऊन हिंडत असत. घरोघरी वीज आणि नळातून येणारे पाणी कुणी बघितलेही नव्हते. संपूर्ण देशभरात फक्त एक ब्रिटिश व एक अमेरिकी अशी दोनच रुग्णालये होती ज्यामध्ये केवळ १३ डॉक्टर कार्यरत होते. प्राथमिक आरोग्यसेवेसाठी कित्येकांना ३-४ दिवसांची पायपीट करावी लागे. आता ओमानमध्ये सरकारी व खाजगी मिळून ७० मोठी रुग्णालये आहेत. त्या मोठ्या रुग्णालयातून आणि लहान-सहान खाजगी दवाखान्यांमधून हजारो डॉक्टर सेवा देत आहेत. ओमानमध्ये कित्येक भारतीय डॉक्टर्सही काम करतात. ओमानसफरीला निघण्यापूर्वी अशा दोन वेगवेगळ्या डॉक्टरांशी आमचा संपर्क झाला होता जे दोन-अडीच दशके ओमानमध्ये राहून काम केल्यानंतर आता परत येऊन पुण्या-मुंबईत स्थायिक झाले आहेत.  

१९७० मध्ये ओमानमधल्या दळणवळणाची अवस्था तर अठराव्या शतकातल्या भारतात जी काही असेल त्यापेक्षा वाईट होती. देशभरात एकूण फक्त १० किलोमीटर पक्के आणि १८०० किलोमीटर कच्चे रस्ते होते. आज ओमानमध्ये ३०००० किलोमीटर पक्क्या रस्त्यांचे जाळे देशभर पसरलेले आहे. त्याशिवाय, वाळवंटातल्या वाड्यावस्त्यांना जोडणारे आणखी ३०००० किलोमीटर लांबीचे कच्चे रस्ते आहेत. आमच्या सफरीत ओमानमध्ये आम्ही पाहिलेले एकूणएक रस्ते भलतेच मुलायम होते. काही डोंगराळ भागात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे खराब झालेला तुरळक भाग वगळता, एकाही हमरस्त्यावर किंवा शहरातील सडकेवर एकही खड्डा नव्हता. 

ओमान हा पूर्वीपासूनच एक इस्लामी देश आहे. परंतु, १००-१२५ वर्षांपासून इथे व्यापारानिमित्त स्थायिक झालेल्या गैरमुस्लिमांची संख्या कमी नाही. १८७० साली गुजरातमधल्या मांडवीतून इथे येऊन व्यापाराला सुरुवात केलेले रामदास ठाकरसी व त्यांचा मुलगा खिमजी यांची 'खिमजी रामदास आणि कंपनी' आज ओमानमधील मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्थांपैकी एक आहे. शेठ खिमजींचा नातू, कनकसी गोकुळदास खिमजी यांना सुलतान काबूसने 'शेख' ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली. त्यामुळे, ते जगातील एकमेव हिंदू शेख ठरले आहेत! 

सुलतान काबूसच्या धर्मविषयक उदारमतामुळे ओमानमध्ये धार्मिक तेढ अस्तित्वात नाही. इथल्या कायद्यानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि धर्मा-धर्मात भेदभाव करणे वर्ज्य आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे साडेपाच टक्के लोक हिंदू आणि साडेसहा टक्के लोक ख्रिश्चन आहेत. या दोन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी सुलतान काबूसने सरकारी जमीन देऊ केली. त्यापूर्वीच काही सिंधी व्यापाऱ्यांनी १९०९-१० साली मस्कतमधल्या जुन्या  राजवाड्याजवळ मोतीश्वर महादेव मंदिर बांधलेले होते जे आजही अबाधित आहे. त्या मंदिरात पूजाअर्चा आणि विविध सण-उत्सव नियमितपणे साजरे होतात. मस्कत, सलाला, सूर या शहरांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि श्रीगणेशाची चार प्रमुख मंदिरे आहेत. अल नसरसोबत आमची विस्तृत चर्चा झाली. त्यातून असे लक्षात आले की या देशात सर्वच धर्म आणि धार्मिक कार्यक्रम मुख्यत्वे घराघरांपुरते आणि आपापल्या प्रार्थनास्थळांपुरते मर्यादित आहेत. तसेच  परधर्माविषयी सार्वजनिक स्वरूपाची चर्चा किंवा टीका-टिप्पणी करणे निषिद्ध मानले जाते.

मस्कतदर्शनातला आमचा पहिला पडाव 'सुलतान काबूस ग्रँड मॉस्क' या भव्य मशिदीत होता. स्वतः सुलतानाने या मशिदीचे उदघाटन २००१ साली केले होते. सुमारे १०० एकर खुल्या जमिनीवर मध्यभागी बांधलेल्या या मशिदीची व्याप्ती १० एकर आहे. आजूबाजूला उरलेल्या ९० एकर जागेत उद्याने, हिरवळ आणि पार्किंग व इतर सोयी केलेल्या आहेत. भारत, इजिप्त, इटली, व ओमानमधील विविधरंगी संगमरवरी दगड आणि भारतातून आयात केलेला तीन लाख टन राजस्थानी लाल दगड वापरून ही मशीद बांधलेली आहे. या मशिदीत पुरुषांना व महिलांना प्रार्थना करण्यासाठी दोन स्वतंत्र दालने आहेत. त्यामध्ये ६५०० पुरुष व ७५० स्त्रिया एकावेळी प्रार्थना करू शकतात. त्याशिवाय,  चहूबाजूंनी असलेल्या ओसरीवर आणखी १५००० लोक गुडघे टेकून प्रार्थना करू शकतील इतकी जागा आहे. परंतु, अल नसरच्या सांगण्याप्रमाणे, मस्कतमध्ये इतरही मशिदी असल्याने आजपर्यंत अगदी ईदच्या प्रार्थनेसाठीही कधी इथे एवढी गर्दी जमलेली नाही. मशिदीच्या मुख्य दालनाच्या ४६७५० चौरस फूट फरशीवर एक मोठा इराणी गालिचा अंथरलेला आहे (चिकटवलेला नाही). एकवीस टन वजनाचा हा गालिचा २८ विविध रंगाच्या धाग्यांनी विणलेला आहे. इराणमधून आलेल्या ६०० स्त्री-पुरुष कारागिरांनी चार वर्षे खपून हा गालिचा त्या जागेवरच स्वतःच्या हातांनी विणून तयार केला होता. त्यावेळी तो जगातला सर्वात मोठा एकसंध गालिचा होता. अल नासरने आम्हाला हसत-हसत सांगितले की या मशिदीच्या उदघाटन सोहळ्यात उपस्थित राहून परत गेल्या-गेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या सुलतान झाएदने एका इराणी कंपनीकडे याहीपेक्षा मोठ्या गालिच्याची ऑर्डर नोंदवली. त्यामुळे, २००७ साली उदघाटन झालेल्या अबू धाबी येथील 'शेख झाएद मशिदी'मध्ये आज इथल्यापेक्षाही मोठा गालिचा अंथरलेला आहे!

ओमानमध्ये १९७० सालापर्यंत संगीत-नृत्य-कला यांना मज्जावच होता. रेडिओ बाळगणे हा गुन्हा होता आणि त्यासाठी कडक शिक्षेची तरतूद होती. संपूर्ण देशात केवळ एक मिलिटरी बँड होता, पण त्यातील वादकही ओमानी नव्हे तर बलुची सैनिक होते. सुलतान काबूसने ओमानी आणि बैदू जमातीच्या लोकसंगीत व नृत्याच्या प्रसाराला प्रोत्साहन दिले आणि देशभरात या सर्व कलांना व्यासपीठ मिळवून दिले. स्वतः सुलतान काबूस याला संगीत-नृत्य-कला यांमध्ये रुचि होती. त्याची साक्ष म्हणून, भारताचे ओमानमधील माजी राजदूत श्री. अनिल वाधवा यांनी लिहिलेला अनुभव पुरेसा बोलका आहे. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्वागतार्थ २००९ साली आयोजित केलेल्या शाही भोजनादरम्यान वाजणाऱ्या संगीतासोबत सुलतान काबूसने अभावितपणेच टेबलावर ठेका धरलेला वाधवांनी स्वतः पाहिला होता!

मस्कतमधले 'रॉयल ऑपेरा हाऊस' सुलतान काबूसच्या कलाप्रेमाचे एक सुंदर प्रतीक आहे. याचेही उदघाटन स्वतः सुलतान काबूसनेच २०११ साली केले होते. कलात्मक पद्धतीने रचलेले-सजवलेले हे संगीत-नाट्यगृह अतिशय प्रेक्षणीय आहे. खुर्च्या आणि बॉक्सेस मिळून यात ११०० प्रेक्षकांना बसायची सोय आहे. इथला रंगमंच केवळ फिरता किंवा सरकताच नव्हे तर खाली-वर हलणाराही आहे. एक कळ दाबताच रंगमंचासमोरचे 'पिट' आणि खुर्च्यांच्या पहिल्या दोन रांगा जमिनीखाली जातात, आणि दुसरी कळ दाबून स्टेजची लांबी (खोली) वाढवता येते. ओमानी संगीताच्या मैफली, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सैनिकी बँडच्या सांगीतिक कवायती, देशोदेशीचे वाद्यवृंद, ऑपेरा संच, अशा अनेक प्रकारच्या  कार्यक्रमांनी या संगीत-नाट्यगृहाचे वार्षिक वेळापत्रक भरगच्च असते. आम्ही तिथे गेलो तेंव्हा, म्हणजे ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान जॉर्डन व ऑस्ट्रियाच्या सैन्यदलांच्या बँड्सचे सादरीकरण होणार होते. नुकताच, म्हणजे ३०-३१ ऑक्टोबरला तिथे भारतीय सतारवादक उस्ताद निशात खान यांचा कार्यक्रम होऊन गेला होता. तो कार्यक्रम ऐकून आलेली एक ऑस्ट्रियन बाई आम्हाला क्रूझच्या बोटीवर भेटली होती व तिने त्याचे फोटोही आम्हाला दाखवले होते.

मत्रा 'सूक' हा आमचा दिवसभरातला शेवटचा थांबा होता. खरे सांगायचे तर मला तिथे जाण्यात काडीचाही रस नव्हता. पण आमच्यापैकी उत्साही 'शॉपर्स' आणि 'विंडो शॉपर्स' तिथे हिंडून आले. सर्वसाधारणपणे पर्यटकांना आकर्षित करणारी जी दुकाने गावोगावी असतात तशीच तिथेही होती. 'आलोच आहोत तर काहीतरी घ्यावे' अशा विचाराने प्रेरित होऊन काहींनी तिथे अत्तरे, 'लोबान' वगैरे खरेदीही केली. परतीच्या वाटेवर जुना राजवाडा, म्हणजे 'अल आलम पॅलेस' आम्हाला बाहेरूनच पाहता आला. आत जाण्याची परवानगी नसल्याने, राजवाड्यासमोर उभे राहून आम्ही फोटो मात्र काढून घेतले.

पुढच्या दिवशी, आम्ही मस्कत किंवा ओमान-दर्शन करणार नव्हतो. एका निराळ्याच जगात आम्हाला जायचे होते. कमालीची उत्सुकता आमच्या मनात होती... 

(क्रमशः)

©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)


बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ४)

निझवा आणि बाहला या दोन ठिकाणचे किल्ले आम्ही पाहिले, आणि त्यांचा इतिहासही ऐकला-वाचला. ते पाहून एकीकडे असे वाटले की, "यात काय आहे? यापेक्षा कितीतरी उंच, आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेले अनेक गड आमच्या महाराजांच्या राज्यात आहेत." पण ओमानमधल्या त्या दोन्ही किल्ल्यांची डागडुजी व रंगरंगोटी, आणि तिथली स्वच्छता पाहून मात्र वैषम्य जाणवले. आपल्या गडकोटांची होणारी दुर्दशा आठवली आणि ती दुर्दशा दूर करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किती तोकडे पडत आहेत हेही जाणवले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात, म्हणजे सतराव्या शतकात ओमानमध्ये बांधल्या गेलेल्या निझवा किल्ल्याची उंची आणि व्याप्ती आपल्या सिंहगड, रायगडाच्या जवळपासही नाही. परंतु, आणखी एक मोठा फरक आहे. या किल्ल्यांनी फारशी तुंबळ युद्धेही पाहिलेली नाहीत, आणि आपल्या देशावर झाली तितकी विध्वंसक आक्रमणेही ओमानवर कधी झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच हे किल्ले आजपर्यंत बऱ्यापैकी सुस्थितीत राहिले असावेत. बाहलाचा किल्ला आणखी जुना, म्हणजे बाराव्या शतकात बांधला गेलेला आहे. आज तो एक 'युनेस्को हेरिटेज साईट' म्हणून गणला जातो. 

दोन्ही किल्ल्यांची रचना पुष्कळशी सारखीच आहे. आपल्या गडांना असतात तसेच भक्कम दरवाजे, त्या दरवाजांमध्ये ठोकलेले अणकुचीदार व जाडजूड लोखंडी खिळे, दरवाज्यातून शत्रू आत शिरलाच तर वरून उकळते तेल ओतण्याची योजना, बंदूकधारी सैनिकांसाठी बुरुजात केलेली भोके, किल्ल्याच्या एका कोपऱ्यात कैद्यांना ठेवण्यासाठी केलेली अंधारकोठडी, हे सर्व काही ओळखीचे होते. एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे तर दोन्ही किल्ल्यात एक-एक खजूराचे कोठार होते. त्यातल्या कट्टयांवर खजूर भरलेली पोती ठेवली जात असत. ते सैनिकांचे आणीबाणीकरता साठवलेले अन्न असे. त्या कट्टयांना थोडासा उतार केलेला होता. उतरंडीच्या टोकाखाली एक खळगा होता. खजूराच्या पोत्यातून वाहणारा रस त्या खळग्यात जमा होत असे. तो रस रोटीवर फासून खाल्ला जाई!

किल्ले पाहून झाल्यावर आम्ही जेवून पुढे निघेपर्यंत तीन वाजून गेले होते. आजचे शेवटचे ठिकाण म्हणजे ओमानचे राष्ट्रीय संग्रहालय होते. तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला साडेतीन-पावणेचार होतील आणि पाच वाजता संग्रहालय बंद होईल, असा इशारा अल नासरने दिला होता. या संग्रहालयाबद्दल मी आधी फारसे काही वाचले नव्हते. शिवाय, ओमानचा इतिहासही मला तितकासा चित्तवेधक वाटलेला नव्हता. त्यामुळे, "संग्रहालय काय, तासाभरात पाहून होईल." असा माझा कयास होता. 

'Oman Across Ages' नावाचे ते संग्रहालय अतिशय भव्य, प्रेक्षणीय आणि माहितीपूर्ण होते. आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून बनवलेले एकन्एक दालन पाहत राहावे असे होते. ते संग्रहालय मन लावून पाहायला मला एक पूर्ण दिवसभरही कमी पडला असता. सुंदर चित्रे, ध्वनिफिती आणि लेखांच्या माध्यमातून, आदिमानवाच्या काळापासूनचा ओमानी इतिहास तिथे साकारलेला होता. आश्चर्यकारक माहिती म्हणजे, हजारो वर्षांपूर्वी या प्रदेशात नद्या, वने आणि वन्यजीव अस्तित्वात होते. पर्यावरणात होत गेलेल्या बदलांमुळे, काही अपवाद वगळता आज इथे खडकाळ-डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नाही. संग्रहालयाच्या शेवटच्या दालनात सुलतान काबूसचा जीवनपट, आणि त्याने ओमानमध्ये घडवून आणलेला आमूलाग्र बदल, यांचे प्रदर्शन होते. एकूणात, 'चुकवू नये असे' हे शब्द या संग्रहालयाच्या बाबतीत सार्थ ठरतील. 

पाच वाजता संग्रहालय बंद व्हायची वेळ होती. पण आम्ही एकदा संग्रहालयात शिरलो म्हटल्यावर पाचच्या पुढेही काही काळ आम्ही पाहत राहू शकू असे आम्हाला वाटले होते. परंतु, ४.५० पासूनच तिथल्या सुरक्षारक्षकांनी आमच्या कानाशी, "निघा निघा" अशी घाई सुरू केली. नाइलाजाने आम्ही बाहेर पडलो. बाहेरच्या कॉफी शॉपमध्ये मात्र बसायला परवानगी होती. 

कॅफेतल्या नेपाळी मुलाने आम्हाला थांबायला सांगितले कारण कॉफी मशीनवरचा 'डॅनी' नावाचा भारतीय तरुण कुठेतरी गेलेला होता. 'डॅनी' परत आल्यावर उलगडा झाला की तो पुण्याचा ज्ञानेश पाटील होता! जेमतेम पंचविशीतल्या, अविवाहित ज्ञानेशने पुण्यात 'वेस्टीन' हॉटेल आणि इतरत्र कुठेतरी पूर्वी नोकरी केलेली होती. गेली चारपाच वर्षे तो इथे होता. प्रत्यक्षात तो कॉफीमशीन चालवणारा कर्मचारी नसून त्या कॅफेचा ऑपरेशन्स मॅनेजर होता. स्टाफ कमी असल्याने त्या दिवसापुरते तो हे काम पाहत होता. त्याच्याकडून आम्हाला बरीच मोलाची माहिती मिळाली. ओमानमध्ये नोकरी मिळवून देणाऱ्या काही भारतीय एजन्सी आहेत. पण त्यांच्यातर्फे नोकरी मिळाल्यास पगाराचा घशघशीत हिस्सा एजन्सीला द्यावा लागतो. ज्ञानेश मात्र कोणाच्यातरी थेट ओळखीतून आल्यामुळे त्याला दरमहा ४०-४५ हजार रुपये वाचवता येत होते. शिवाय त्याला राहायला घर आणि येण्या-जाण्यासाठी मोटरकार विनामूल्य मिळालेली होती. ओमानमध्ये नोकरदारांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. फक्त मोठ्या व्यापाऱ्यांना कर भरावा लागतो. "कोणा भारतीय मुलांना इकडे येऊन नोकरी करण्यासाठी काही माहिती किंवा मदत हवी असल्यास तर मी नक्की देईन" असे आश्वासन ज्ञानेशने मला दिले. 

दिवसभरात आम्हाला बरेच काही पाहायला मिळाले होते. पण संग्रहालयात वेळ कमी पडल्याची चुटपुट मात्र मनात राहिली. पुढचा दिवस मस्कत शहरासाठी राखीव होता. दिवसभरात काय काय पाहायचे-करायचे याची उजळणी करत 'फ्रेझर स्युईट्स' मधे परतलो...
(क्रमशः)
©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ३)

ओमानमधल्या ऐतिहासिक किल्ल्यांचा आणि राष्ट्रीय संग्रहालयाचा दौरा करायला आम्ही दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर बाहेर पडलो. 

यात्रा कंपनीसोबत जाणाऱ्यांना, यात्रा संयोजकांकडून मिळणाऱ्या "उद्या ६-७-८" किंवा "उद्या ७-८-९" अशा सूचनांची सवय असेल. "उद्या ६-७-८" या संक्षिप्त सूचनेचा अर्थ असा असतो की "बेड टी सहा वाजता मिळेल, नाश्ता सात वाजता खायचाय, आणि बस आठ वाजता निघेल"! 
यातली अखेरची वेळ सर्वात महत्त्वाची असते. तिचे पालन न करणाऱ्यांची, संयोजकांकडून सौम्य शब्दात, आणि सहप्रवाशांकडून तिखट शब्दात, किंवा बोलके हातवारे आणि नेत्रपल्लवीद्वारे 'पूजा' होते हेही अनेकांना माहीत असावे! 

पण आमची कौटुंबिक सहल असल्याने हे सगळे आम्हाला लागूच नव्हते! कारण आमच्यातले 'लेट लतीफ' निवांतच होते आणि इतरांच्या सौम्य कोपरखळ्यांचाही आनंद लुटत होते! परंतु, सगळे वेळापत्रक आमच्याच हातात असल्याने आम्ही फारशी फिकीर करत नव्हतो. या निमित्ताने यात्रा कंपनीच्या संयोजकांना त्यांच्या संयमासाठी मनोमन सलाम मात्र करावासा वाटला!

आज आमच्यासोबत 'अल-नासर' नावाचा एक जेमतेम तिशीचा तरुण, स्थानिक वाटाड्या म्हणून आला होता. आमची मिनीबस मस्कतहून निझवाच्या दिशेने निघाली. खिडकीतून मस्कत दिसत होते. इथल्या जवळपास सर्वच इमारती उदी रंगाच्या किंवा पांढऱ्याशुभ्र आहेत. शहरी भागात बहुमजली इमारती आहेत, परंतु इतरत्र बहुतांशी बैठी अथवा दुमजली घरेच दिसतात. काही घरांच्या आवारात तुरळक फुलझाडे दिसली. पण मोठ्या हमरस्त्यावर आल्यानंतर मात्र दुतर्फा खडकाळ, डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नव्हते. एक वैशिष्ट्य मात्र सगळीकडे जाणवले, की गावातले रस्ते आणि मुख्य हमरस्ते हे सगळे इतके छान, मखमली होते की पोटातले पाणीही कधी हलले नाही!

आमचा गाईड अल-नासर म्हणाला होता, "वाटेत तुम्हाला मी 'डेट फॅक्टरी' दाखवणार आहे." निझवाच्या अलीकडे एका 'सूक' जवळ आमची मिनीबस थांबली. अरबी भाषेत बाजाराला 'सूक' म्हणतात. उत्साहात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांना हा शब्द ऐकून निश्चितच सुख होईल!
डेट, म्हणजेच खजूर हे फळ म्हणजे वाळवंटातल्या लोकांसाठी हापूस आंब्याहूनही श्रेष्ठ! या प्रदेशात कॉफी प्यायची प्रथा आपल्याकडच्या चहापानासारखीच आणि तितकीच जुनी आहे. वेलची घातलेल्या काळ्या कॉफीच्या घुटक्यांसोबत खजूराचा आस्वाद इथे सर्रास घेतला जातो. 
अल नासरने आम्हाला जिथे नेले ते कदाचित त्या 'डेट फॅक्टरी' चे आऊटलेट असावे. त्या दुकानात किमान १५ ते २० प्रकारचे खजूर मोठमोठ्या काचेच्या बरण्यांमधे मांडून ठेवलेले होते. त्यापैकी कोणत्याही बरणीतून कितीही खजूर उचलून खायची मुभा होती (लोकलाज हा एकच अंकुश मनावर होता!) वेगवेगळ्या चवीचे खजूर चाखायला मजा आली. दालचिनी, आले, तीळ असे अनेक पदार्थ लावलेले खजूर होते. तीळ व पिस्ते घोटून केलेल्या एका 'ताहिनी' नावाच्या चटणीत बुडवून ते खायचे होते. तो अप्रतिम स्वाद अविस्मरणीय आहे. त्याच दुकानात वेगवेगळ्या स्वादाचे मधही चाखायला मिळाले. सुमाक, झातर, केशर, रोझ वॉटर असे निरनिराळे एसेन्स आणि मसालेही तिथे विकायला ठेवले होते. 

मग आम्ही शेजारीच असलेल्या, ओमानी हलव्याच्या दुकानात शिरलो. इथला हलवा म्हणजे आपल्याकडे बॉंबे हलवा/कराची हलवा किंवा इतरही नावांनी प्रसिद्ध असलेला चिवट हलवा. खजूर, अक्रोड, बदाम, असे वेगवेगळे मेवे घालून बनवलेले, विशिष्ट चवींचे हलवे विकायला आणि चाखायलाही ठेवलेले होते. हलवेदेखील चाखून पाहायचा मोह झाला होता. पण खजूर बऱ्यापैकी 'चापून' झालेले असल्याने आणि अचानक कॅलरीज् चा हिशोब आठवू लागल्यामुळे हलव्याच्या दुकानातला मुक्काम आम्ही 'सूक'मधल्या इतर दुकानात हलवला. 

एका दुकानात संत्र्याचा व उसाचा ताजा रस समोरच काढून मिळत होता. वाटाड्या अल नासर म्हणाला, "तुम्हा भारतीयांना याचे काही अप्रूप नसणार! चला, पुढे जाऊ या!" पुढे एका दुकानात 'लोबान'चे खडे विकायला ठेवले होते. लोबान म्हणजे एका विशिष्ट झाडाचा सुकवलेला चीक असतो, ज्याला आपण ऊद म्हणून ओळखतो. लोबान निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर तर केला जातोच, पण इथे खाद्यपदार्थांमधेही याचा वापर होतो. नंतर मस्कतमधल्या एका हॉटेलात आम्हाला 'वेलकम ड्रिंक' म्हणून लोबानचे पाणी प्यायला मिळाले!

त्याच 'सूक'मधे भाजी व फळबाजारही होता. एक ओमानी रियाल २२० रुपयांइतका असतो. साहजिकच (रुपयांच्या हिशोबात) सर्व काही महाग असेल असे आम्हाला वाटले. चौकशा करून भारतातल्या भाजीपाल्यांच्या किंमतीशी तुलना केली गेली. पुष्कळशा भाज्यांचे दर भारतातल्या दरांच्या जवळपासचेच होते. तिथे अगडबंब कलिंगडे, पपया, डाळिंबे वगैरे विकायला होती. डाळिंबे तुरळकच दिसली, पण पुन्हा 'मस्कती डाळिंबां'ची आठवण झाली आणि आम्ही चौकशी करायला गेलो. पण त्या डाळिंबाचे रूप फारसे आकर्षक वाटेना. एकाच ठिकाणी खूप मोठी आणि आकर्षक डाळिंबे दिसताच आम्ही अल नासरला विचारले, "हीच का ती सुप्रसिद्ध मस्कती डाळिंबे?" तर तो म्हणाला, "नाही नाही. इतकी छान आहेत म्हणजे ती इजिप्ती डाळिंबे असावीत." फळवाल्यानेही ती डाळिंबे इजिप्ती असल्याचे सांगितले. आम्ही कपाळाला हात लावत पुढे झालो. 

आम्ही हिंदुस्थानी आहोत हे पाहून एक बांगलादेशी खजूरविक्रेता आमच्या प्रेमात पडला. त्याने आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात खजूर विकला आणि वजन करतानाही झुकते माप दिले. आम्ही खूष झालो. पण निघताना आमच्या लक्षात आले की त्या दुकानाचा खरा मालक एक वृद्ध ओमानी गृहस्थ होता. तो कुठेतरी गेलेला असताना त्याच्या नोकराने परस्पर ही 'बंगाली जादू' केली होती! 

जवळच एक म्हातारा ओमानी माणूस ओले खजूर विकायला बसला होता. आम्ही खरेदी केली नाही तरी त्याच्यासोबत फोटो काढून हवाय म्हटल्यावर तो खूश झाला.
'सूक'मधे आमचा बराच वेळ गेला होता. अजून आम्हाला निझवा आणि बाहला या दोन ठिकाणचे किल्ले पाहायचे होते. अल नासरने आठवण करून देताच आम्ही घाईघाईने बसमध्ये चढलो...

(क्रमशः)

© कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)