मंगळवार, २९ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग-६

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग ५ नंतर पुढे चालू...)


१९३० चे दशक काश्मीरच्या राजकीय घडणीकरिता अतिशय महत्वाचे ठरले. 

१९३२ साली शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' या राजकीय पक्षाची स्थापना झाली. काश्मीरचे तत्कालीन मिरवाईझ, मौलाना मोहम्मद युसूफ शाह यांच्या भक्कम पाठिंब्यावरच शेख अब्दुल्लांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. पण हळूहळू त्यांच्यामधील वैचारिक मतभेदांमुळे त्यांचे परस्परसंबंध बिघडत गेले. भविष्यात काश्मीरमध्ये फोफावलेल्या कट्टर इस्लामवादाची पाळे-मुळे, काही अंशी त्या मतभेदांमध्ये सापडतात.  

'मिरवाईझ' हे अनुवांशिक, धार्मिक पद फक्त काश्मिरी मुस्लिम समाजातच अस्तित्त्वात होते. काश्मिरी जनतेमध्ये या पदाला पूर्वीपासूनच खूप मान होता. १८९० ते १९०९ या काळात मिरवाईझ असलेले मौलाना गुलाम रसूल शाह, हे प्रगत विचारसरणीचे होते, आणि सामान्य मुस्लिम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय होते. राजाचे व त्यांचे संबंधही सलोख्याचे होते. मुस्लिम जनतेसाठी आधुनिक शिक्षण, आणि मुस्लिम समाजसुधारणा यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. 

एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत बहुसंख्य काश्मिरी मुसलमान अशिक्षित होते. काही लोक मदरशांमध्ये, केवळ धार्मिक शिक्षण घेत असत. इंग्रज मिशनरींनी काश्मीरमध्ये काही प्राथमिक शाळा सुरु केल्या असल्या तरी त्यामध्ये उच्चभ्रू कुटुंबातील मुलेच जात असत. मिरवाईझ मौलाना गुलाम रसूल शाह यांनी १८९९ साली मुसलमानांसाठी पहिली प्राथमिक शाळा चालू केली. त्याचेच रूपांतर १९०५ साली 'इस्लामिया हायस्कूल' मध्ये झाले. या शाळेसाठी त्यांनी राजाकडून अनुदानही मिळवले. पुढे शेख अब्दुल्लांचे माध्यमिक शिक्षण त्याच शाळेत झाले. 

पण, मिरवाईझ मौलाना गुलाम रसूल शाह अल्पायुषी होते. १९०९ साली त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा त्यांचा मुलगा  मोहम्मद युसूफ शाह केवळ ९-१० वर्षांचाच होता. त्यामुळे, १९३१ सालापर्यंत, गुलाम रसूल शाह यांच्या भावाने 'मिरवाईझ' हे पद सांभाळले. त्यांनीही मौलाना रसूल शाह यांचेच धोरण पुढे चालू ठेवले. त्यामुळे, हळूहळू मुसलमानांची प्रगती होत राहिली. राज्यातील अल्पसंख्य हिंदू प्रजेसोबत सर्वसामान्य मुस्लिमप्रजेचे संबंधही शांतीपूर्णच होते. 

मोहम्मद युसूफ शाह १९३१ साली काश्मीरचे मिरवाईझ बनले. त्यांचे सुरुवातीचे धार्मिक शिक्षण उत्तर प्रदेशात, देवबंद येथील 'दार-उल-उलूम' मध्ये झाले होते. त्या संस्थेत, कट्टर 'वहाबी' इस्लामची शिकवण मिळत असे. वहाबी शिकवणीनुसार, दर्ग्यांमध्ये जाणे, कबरींवर नतमस्तक होणे, सूफी संतांची प्रवचने ऐकणे, सूफी भक्तिसंगीत गाणे-ऐकणे, अशा सर्व गोष्टी इस्लाममध्ये वर्ज्य होत्या. 'अहमदिया', 'इस्माइली', वगैरे इस्लाम धर्माच्याच इतर पंथांना ते गैर-इस्लामी मानत असत. 

दार-उल-उलूम देवबंद मधून शिकून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद युसूफ शहांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून 'मौलवी फाझिल' ही पदवी प्राप्त केली होती. ज्या प्रकारचे शिक्षण त्यांना मिळाले होते त्यानुसार, मिरवाईझ मौलाना मोहम्मद युसूफ शाह हे मध्ययुगीन इस्लामच्या चालीरीतींना मानत होते. सामाजिक बदल, आणि  'प्रगतिशील'  इस्लामची कल्पना त्यांना पसंत नव्हती. तसेच, गैर-इस्लामी लोकांविरुद्ध त्यांची भूमिका उघड-उघड आक्रमक जरी नसली तरी, केवळ काश्मिरी मुस्लिम लोकांचे हित, आणि मुस्लिम धर्माचे वर्चस्व, हेच त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक  महत्वाचे होते. 

चौधरी गुलाम अब्बास हेहीदेखील कट्टर मुसलमान होते. पण काश्मीरपेक्षा, जम्मू प्रदेशातील मुस्लिमांच्या हिताचा विचार त्यांच्याकरता अधिक महत्वाचा होता. कदाचित, या दोन्ही कट्टरपंथी मुस्लिम नेत्यांच्या नजरेसमोर, कवि 'अल्लामा' मुहम्मद इक्बाल यांचा आदर्श असावा. कारण, त्याच काळात, म्हणजे डिसेंबर १९३० मध्ये अलाहाबाद येथे पार पडलेल्या 'मुस्लिम लीग' च्या अधिवेशनात, अल्लामा इकबाल यांनी भारतातील मुसलमानांसाठी स्वतंत्र देशाची कल्पना सर्वप्रथम मांडली होती. 

'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षाच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांशी शेख अब्दुल्ला सहमत नव्हते. त्यांच्या मते, पक्ष फक्त मुस्लिमांच्याच नव्हे तर, समस्त काश्मिरी जनतेच्या नेतृत्वासाठी कटिबद्ध होता. काश्मीरमधील हिंदू नेते पंडित प्रेमनाथ बजाज यांच्यासोबत शेख अब्दुल्लांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. काँग्रेसची विचारसरणी व नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचाही त्यांच्या मनावर पगडा होता. काश्मीरमधील अहमदिया मुस्लिमांसोबत शेख अब्दुल्लांचा सलोखा होता. शेख अब्दुल्लांचे हे विचार आणि वागणूक त्यांच्या पक्षातील सुन्नी मुस्लिम नेत्यांच्या डोळ्यात सलत होते. 

मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या, मायकल हॅरी नेडू नावाच्या एका इंग्रज माणसाच्या मुलीशी १९३३ साली शेख अब्दुल्लांनी केलेला विवाह, त्यांच्या विरोधकांच्या पचनी पडणे अवघडच होते. 

एकीकडे, "कट्टर मुस्लिम नेत्यांची विचारसरणी सामान्य जनतेच्या हिताची नसून, फक्त समाजातील उच्चवर्गीय मुस्लिमांनाच धार्जिणी आहे", असे शेख अब्दुल्ला आपल्या जाहीर भाषणात सांगत होते. त्याउलट, "मिरवाईझ यांचे विचार न मानणारे लोक मुसलमानच नव्हेत" असे वक्तव्य खुद्द मिरवाईझ यांनीच केले होते. चौधरी गुलाम अब्बास,  मिरवाईझ मुहम्मद यसुफ शाह आणि त्यांच्या समर्थकांनी उघडपणे शेख अब्दुल्लांचा विरोध सुरु केला. पक्षाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या विचारसरणीमधील मूलभूत फरकांमुळे, 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षामध्ये हळूहळू फूट पडू लागली.

१९३४ साली झालेल्या प्रजासभा निवडणुकीमध्ये शेख अब्दुल्लांनी जोरदार प्रचार केला. 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' मधून फुटलेले बंडखोर उमेदवार हरले, आणि श्रीनगरमधील सर्व जागा शेख अब्दुल्ला गटाने जिंकल्या. मिरवाईझ युसुफ शहांसारख्या कट्टर धर्मगुरूंचा प्रचंड प्रभाव जनतेवर असूनही त्यांच्या समर्थकांऐवजी, काश्मिरी जनतेने शेख अब्दुल्लांच्या बाजूने कौल दिला ही बाब अतिशय लक्षणीय होती. त्यामुळेच, 'शेर-ए-काश्मीर' हा खिताब शेख अब्दुल्लांकडे आपोआप चालत आला!  

१९३४ नंतर शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या काही समविचारी मित्रांनी मिळून, जम्मू-काश्मीरच्या विचारधारेला एक निश्चित दिशा देण्याचे काम सुरु केले...   
   

(क्रमशः)
(भाग  पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

९ टिप्पण्या:

नितीन चौधरी म्हणाले...

वस्तुनिष्ठ विवेचन

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂धन्यवाद नितीन! 🙏

Ajit vaidya म्हणाले...

Exact narrative sir. Nice to read and know

प्रमोद खरे . म्हणाले...

सुंदर विवेचन आहे. पण भारतीय सैन्याने काश्मीर मुक्त केल्यावर शेख अब्दुल्लाची नियत फिरल्या सारखी वाटते.फक्त मुसलमानांचे हित न पाहाणारे शेख अब्दुल्ला काश्मीरचा (मुक्त) सर्वेसर्वा होण्याची स्वप्ने पाहातात. पंडीतजी कडून विश्वासघाताने ३७० कलमाचा घटनेत समावेश करून घेतात. पंडीतजींनी काश्मीरचा प्रश्न युनोत नेल्यामुळे रेंगाळत तरी पडला.
पंडीतजी शेखवर विश्वास ठेवून स्वस्थ बसले असते तर
पाकिस्तानने ( ICJ) इंटर नॕशनल कोर्ट आॕफ जस्टीस मध्ये नेऊन कदाचित काश्मीर वर ताबा मिळवला असता.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Thanks. 🙂🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

पुढील भागात... 🙂🙏

Milind Ranade म्हणाले...

Its been a gripping series of articles Colonel. Waiting for the next one.
Milind Ranade

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Thanks, Milind! 🙂🙏
I have been postings one article every second day. The reason being that I am writing and posting the very same day. 😀

Unknown म्हणाले...

Very much interesting
Sir u must write a book on it