रविवार, ८ मे, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १९

 #काश्मीरचे_अश्रू 

(भाग १८ नंतर पुढे चालू...)


पाकिस्तानने महत्प्रयासाने आखलेले 'ऑपरेशन जिब्राल्टर' सपशेल फसले. 'इस्लामच्या रक्षणा'साठी दिलेली हाक ऐकून, समस्त काश्मिरी जनता उत्स्फूर्तपणे उठाव करेल, आणि व्याप्त काश्मीरमधून खोऱ्यामध्ये घुसलेल्या आपल्या धर्मबांधवांना साथ देईल, ही अपेक्षा साफ चुकीची ठरली होती. 

भारतीय गुप्तहेर यंत्रणा, भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे युद्धबंदीरेषेपलीकडून आलेल्या जवळजवळ सर्व घुसखोरांना वेचून काढणे शक्य झाले. युद्धबंदीरेषा पार करण्यासाठी कारगिल, उरी आणि हाजीपीर खिंड, ही तीन ठिकाणे घुसखोरांना सोयीची होती. ऑगस्ट १९६५ मध्ये, भारतीय सैन्याने त्या तिन्ही ठिकाणचे छुपे मार्ग बंद करण्यासाठी कारवाई केली. महावीरचक्र विजेते मेजर रणजित सिंग दयाळ (लेफ्टनंट जनरल पदावरून सेवानिवृत्त) यांच्या नेतृत्वाखाली, पहिल्या पॅराशूट बटालियनच्या शूर सैनिकांनी प्रसंगावधान, श्रेष्ठ युद्धनीती, व असामान्य साहसाच्या बळावर अतिशय दुर्गम अशी हाजीपीर खिंड, २९ ऑगस्ट १९६५ रोजी पाकिस्तानच्या ताब्यातून हिरावून घेतली. [पुढे ताश्कंद करारामध्ये भारताने ही खिंड पाकिस्तानला परत बहाल केली आणि आपल्याच सैनिकांच्या कामगिरीवर बोळा फिरवला!]

'ऑपरेशन जिब्राल्टर'चा अपयशातून काही बोध घेण्याऐवजी, पाकिस्तान इरेला पेटला. पाकिस्तानने भारताविरुद्ध उघड-उघड युद्ध पुकारले, आणि या युद्धाला त्यांनी नाव दिले, 'ऑपरेशन ग्रँड स्लॅम' !
 

राष्ट्रपती व लष्करशहा, जनरल आयूब खान यांच्याकडून 'आगे बढो' चा इशारा मिळताच, पाकिस्तानचे सेनाध्यक्ष जनरल मोहम्मद मुसा यांनी आपल्या सेनेला भारतावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. जनरल मुसाच्या म्हणण्याप्रमाणे, "आपण योग्य वेळी, आणि योग्य ठिकाणी, एक-दोन जोराचे दणके दिले, तर या हिंदूंचे मनोबलच कोलमडून पडेल..." 
राष्ट्रपती जनरल आयूब खान यांनी तर अशीही गर्वोक्ती केली की, "आम्ही आज जर भारतावर हल्ला केला, तर उद्याचा नाश्ता आम्ही दिल्लीमध्ये करू शकतो ..." 
[संदर्भ : "My  Frozen Turbulence in  Kashmir" (पृष्ठ १०३) - लेखक : जगमोहन]

पाकिस्तान्यांनी अचानक सुरु केलेले हे युद्ध  भारताला काहीसे अनपेक्षित असल्याने, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये  पाकिस्तानला मर्यादित यश मिळू शकले. 

१ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानने पहिला मोठा हल्ला जम्मू-काश्मीरमध्ये छम्ब चौकीवर केला. तेथून पुढे अखनूर येथील चिनाब नदीवरचा पूल काबीज करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. तसे झाल्यास जम्मूहून पूंछपर्यंत जाणारा रस्ता त्यांच्या ताब्यात आला असता. परंतु, भारतीय सैन्याने निकराची लढत देऊन अखनूरचे रक्षण केले. 

जम्मू-काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य फक्त तेथेच आपले सगळे लक्ष केंद्रित करेल अशी पाकिस्तानची बाळबोध कल्पना होती. त्यामुळे, पंजाबमध्ये भारतीय सैन्याकडून फारश्या प्रतिकाराची अपेक्षा पाकिस्तानने केली नव्हती. पण जम्मू-काश्मीरमधील छम्ब-जौडियां-अखनूर या महत्वाच्या भागाला उत्पन्न झालेला धोका टाळण्यासाठी भारताने पंजाबमध्ये नवीन आघाडी उघडली. 

अमृतसरकडून आगेकूच करीत, लाहोरच्या तीन बाजूंनी भारताने आपला फास आवळायला सुरुवात केली. लाहोरच्या रक्षणासाठी तयार केलेल्या इछोगिल कॅनॉलच्या काठावर पाकिस्तानी सैन्य काँक्रीट बंकरमध्ये सज्ज होते. त्यांना भक्कम संरक्षण द्यायला पाकिस्तानी रणगाडेही तेथे तैनात होते. 

लेफ्टनंट कर्नल डेस्मंड हेड यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या जाट बटालियनने (३ जाट) लाहोरपासून जवळच असलेल्या डोगराई या गावावर हल्ला चढवला व ६ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता डोगराई जिंकले. परंतु, पाकिस्तानी रणगाडे व पायदळाच्या जोरदार प्रतिहल्ल्यांमुळे त्यांना तेथून माघार घ्यावी लागली. पुढील १५ दिवसांमध्ये डोगराई पुन्हा काबीज करण्यासाठी ३ जाट कडून अनेक वेळा प्रयत्न केले गेले. 

अखेर, २१ सप्टेंबर १९६५ च्या रात्री ३ जाट पलटणीने निकराचा हल्ला चढवला. "एक भी आदमी पीछे नहीं हटेगा। जिंदा या मुर्दा, मैं भी आप को डोगराई में ही मिलूंगा।" हे लेफ्टनंट कर्नल डेस्मंड हेड यांचे शब्द कानात साठवून प्रत्येक जाट सैनिक प्राणपणाने लढला. २२ सप्टेंबरच्या पहाटे डोगराई पुन्हा एकदा भारताच्या ताब्यात आले आणि लाहोरमध्ये घुसण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु, त्याच रात्री पाकिस्तान व भारताच्या दरम्यान युद्धबंदी जाहीर झाली आणि लाहोर वाचवण्यात पाकिस्तानला यश आले. 
[लेफ्टनंट कर्नल डेस्मंड हेड यांच्यासहित चार महावीरचक्र, चार वीरचक्र, सात सेना मेडल अशी पदकांची यादी वाचल्यावर डोगराईच्या लढाईबद्दल थोडीफार कल्पना येऊ शकते]
 
महावीर चक्र विजेते लेफ्टनंट कर्नल डेस्मंड हेड  

लाहोरपासून काही किलोमीटर अंतरावरचे बर्की गाव जिंकण्यासाठी, लेफ्टनंट कर्नल जे.एस. भुल्लर (मेजर जनरल पदावरून सेवानिवृत्त) यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सोळाव्या पंजाब बटालियननेदेखील पराक्रमाची शर्थ केली. या बटालियनने पाकिस्तानी रणगाडे, तोफखाना, लढाऊ विमाने आणि पायदळाच्या संयुक्त प्रतिहल्ल्याला न जुमानता, तीन दिवसांच्या तुंबळ लढाईनंतर, १० सप्टेंबर १९६५ रोजी बर्की जिंकले.

लाहोरच्या दिशेने सुरु झालेली भारताची मुसंडी रोखण्यासाठी, ८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने मोठ्या ताकदीनिशी पंजाबमधील खेमकरण गावावर प्रतिहल्ला चढवला. खेमकरणहून पुढे ग्रँड ट्रंक रस्त्यावरून आगेकूच करीत अमृतसरवर चालून जाण्याचा पाकिस्तानी सैन्याचा इरादा होता. खेमकरण जिंकून, रणगाड्यांच्या एका संपूर्ण डिव्हिजनसह पाकिस्तानी पायदळ 'असल उत्तर' गावाच्या दिशेने आगेकूच करू लागले. पण तेथेच भारतीय सैन्याने त्यांच्यासाठी एक सापळा रचून ठेवलेला होता, ज्याबद्दल पाकिस्तानला तिळमात्र कल्पना नव्हती. 

भारतीय पायदळाच्या चार बटालियन्स आणि रणगाड्यांचे एक रेजिमेंट 'असल उत्तर' गावाच्या तीन बाजूंनी सज्ज होते. जवळून वाहणाऱ्या रोही कॅनॉलला, भारतीय जवानांनी रात्रीच्या अंधारात एक भगदाड पाडून ठेवले होते. त्यातून वाहिलेल्या पाण्यामुळे, घोड्याच्या नालेच्या आकाराच्या त्या तिहेरी वेढ्याच्या मध्यभागी असलेल्या उसाच्या शेतांमध्ये पाणी साठून, सर्वत्र दाट चिखल माजला. 

अमेरिकेकडून मिळालेल्या, पॅटन, शेरमन आणि शफी या तीन प्रकारच्या रणगाड्यांसह एक पूर्ण पाकिस्तानी डिव्हिजन खेमकरणकडून 'असल उत्तर'च्या दिशेने दणदणत येत होती. पाकिस्तानी सैन्य भारताच्या वेढ्यामध्ये अलगद येऊन पोहोचले आणि शेतांमधल्या दाट चिखलात त्यांचे रणगाडे रुतले. शत्रू जाळ्यात पूर्णपणे अडकल्याची खात्री होताच, भारतीय डिव्हिजनचे कमांडर, मेजर जनरल गुरबक्ष सिंग यांनी आपल्या सैन्याला हल्ला करण्याचा आदेश दिला. भारताचे रणगाडे आणि पायदळाच्या रणगाडावेधी तोफांनी एकेका पाकिस्तानी रणगाड्याचा वेध घ्यायला सुरुवात केली. 

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या शंभरहून अधिक रणगाड्यांना, अक्षरशः तळ्यामधली बदके टिपावीत तसे खलास केले. इतका मोठा दणका बसल्याने पाकिस्तानचे कंबरडेच मोडले, आणि संपूर्ण युद्धाला कलाटणी मिळाली. आजही असल उत्तरजवळील त्या जागेला 'पॅटननगर' या नावानेच ओळखले जाते! चौथ्या ग्रेनेडियर बटालियनचा योद्धा, आणि मरणोत्तर परमवीरचक्र विजेता हवालदार अब्दुल हमीद, याने याच युद्धामध्ये आपले असामान्य शौर्य दाखवले. 
[असल उत्तर लढाईमध्ये पाकिस्तानी तोफखान्यातर्फे लढलेल्या, आणि भविष्यात पाकिस्तानामध्ये 'नावारूपाला' आलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव होते लेफ्टनंट परवेझ मुशर्रफ!] 

भारताकडून झालेल्या कडव्या प्रतिकारामुळे, जम्मू-काश्मीर जिंकण्याचे आपले दिवास्वप्न भंगत चालल्याचे दिसताच, पाकिस्तानी लष्करशहा जनरल अयूब खानांनी १९ ऑक्टोबर १९६५ रोजी चीनकडे धाव घेतली. परंतु, चीनच्या मदतीचाही फारसा उपयोग होण्याची चिन्हे न दिसल्याने अखेर त्यांनी भारतासोबत युद्धबंदीकरिता प्रयत्न सुरु केले. २३ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी अमलात आली आणि ऑपरेशन  'ग्रँड स्लॅम'वर पडदा पडला. 

जम्मू-काश्मीर हडपण्यासाठी पाकिस्तानने केलेले आणखी एक दुस्साहस जरी बारगळले असले तरी, त्यांनी  अनेक वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने पेरलेली विषवेलीची बीजे मूळ धरून होती. 'ऑपरेशन जिब्राल्टर'च्या निमित्ताने १९६४ साली कार्यरत झालेला 'मास्टर सेल', पुढे 'ऑपरेशन ग्रँड स्लॅम' च्या काळात, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर १९६५ मध्येही बारीक-सारीक अतिरेकी कारवाया करीतच राहिला होता. १९६५ च्या युद्धानंतर भारतीय गुप्तहेर यंत्रणा आणि पोलीस व सैन्यदलांनी मिळून 'मास्टर सेल' चे प्रमुख कार्यकर्ते आणि समर्थकांचा एकेक करून छडा लावला आणि त्यांचे काम बंद पाडले. 

परंतु, पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेने, असंतुष्ट काश्मिरी युवकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम चालूच ठेवले. 'प्लेबिसाईट फ्रंट' या राजकीय चळवळीचे कार्यकर्ते, आणि काही कट्टर इस्लामधर्मियांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा या कारवायांना मिळत राहिला. 

१९६६ साली, जम्मू-काश्मीरमध्ये एक नवीन अतिरेकी संघटना जन्माला आली. तिचे नाव होते 'अल-फतेह'... 

[संदर्भ : "India, Pakistan, and  the Secret Jihad: The covert war in Kashmir, 1947–2004" - लेखक : प्रवीण स्वामी]
  

(क्रमशः)
(भाग १९ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

१३ टिप्पण्या:

सुरेश भावे. म्हणाले...

बर्याच माहिती नसलेल्या गोष्टी समजत आहेत. मजा वाटत आहे.

नीलिमा माईणकर म्हणाले...

अचानक युद्धबंदी करुन हातातोंडाशी आलेला घास जिथे आपल्या जवांनांचे रक्तसांडले ती भूमी परत करायचा आदेश येतो हे लढणार्या सैनीकांच्या सहनशिलतेचा अंत बघणारा आदेश आहे.
लहानलहान मुलही आपल खेळण दुसर्याला देत नाहीत आणि आपले राजकारणी काय आदेश देतात.
खरोखर हे दुर्दैवी आहे.






Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

☺️धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

खरंआहे. 😢

अनामित म्हणाले...

Intresting आहे, ताश्कंद करारात आपण कमावले कि गमावले, यावरही एक सेनाधिकारी म्हणून आपल्याकडून लिखाणाची अपेक्षा आहे.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

तहाचं हे असंच असतं. 😒

Arun Sarade म्हणाले...

आपल्या जिगरबाज सैनिकांनी प्राणपणाने जिंकलेला भाग, परत सोडावा लागला.. यापेक्षा मोठे दुर्भाग्य आणि काय असू शकते.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

खरंच 😢

Ajit vaidya म्हणाले...

Very nice information sir. Nice style of writing. Great sir. Many facts I was not knowing. Came to know only after reading

अनामित म्हणाले...

Thanks 🙂🙏

Milind Ranade म्हणाले...

Thanks so much for the detailed narrative. And for highlighting the role that our Armed Forces and heroic soldiers played in maintaining the integrity of the country. We as a nation must proudly talk of Col Haydes, Havaldar Abdul Hameed (4 Grenadiers is it?), Maj Somnath Sharma,.Maj K S Chandpuri...and various units - formations that have put the Tricolour higher than everything else. Its heart rending to note that we gave back what was won by spilling blood and bearing immense anguish by our uniformed brethren. Colonel reading your articles keeps the spirit alive - do tell us more about Kashmir, other frontiers and our gallant jawans -officers.
Milind Ranade

अनामित म्हणाले...

Sure, Milind.
Thanks for penning this thoughtful and heartfelt, appreciative comment. 🙏🙂

Ajit vaidya म्हणाले...

Very nice writeup and eye opener information of facts which many may not be aware of. Atleast I am not aware of same